जेएनपीटी बंदरातील वाढत्या वाहतुकीवर उपाययोजना म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक व राज्यमार्ग मंत्रालयाने उरणमधील जेएनपीटी ते पळस्पे फाटा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ब व जेएनपीटी (करळ) ते आम्रमार्ग नवी मुंबईदरम्यानच्या दोन्ही रस्त्यांचे सहा व आठ पदरीकरण करण्याची योजना आखली आहे. या दोन्ही रस्त्यांवरून वाहतूक करणाऱ्या हलक्या व दुचाकी वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका (सव्‍‌र्हिस रोड) तयार करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाने दिली आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत अपघातांमुळे ८० कुटुंबे उद्ध्वस्त करणाऱ्या कंटेनर वाहनरूपी यमदूतांचे संकट दूर होणार आहे. या दोन्ही रस्त्यांना खालच्या बाजूने गावांना दोन्ही बाजूंनी जोडणारे रस्ते तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये करळ ते गव्हाण फाटय़ादरम्यान सहा पदरी तर पुढील रस्ते आठ पदरी करण्यात येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जेएनपीटीमध्ये गेल्या वर्षी १६ ऑगस्टला झालेल्या या दोन्ही रस्त्यांचे सहा व आठ पदरी रुंदीकरण करण्याच्या योजनेचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानुसार केंद्रीय रस्ते वाहतूक व राज्य मार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय राज्य महामार्ग अधिनियम १९५६ नुसार भूसंपादनासाठीची अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेसंदर्भात हरकतीही मागविण्यात आल्या आहेत. या रस्त्याच्या रुंदीकरणामुळे सध्याच्या उरण-पनवेल रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होईल.
जेएनपीटी ते गव्हाण फाटादरम्यानच्या ४३ किलोमीटरच्या रस्त्याचे रुंदीकरण यामुळे होणार असल्याचे राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाचे उरण-पनवेल विभागाचे प्रकल्पाधिकारी प्रशांत फेगडे यांनी सांगितले. प्रत्यक्ष रस्ता रुंदीकरणाच्या कामाला डिसेंबरमध्ये सुरुवात होऊन दोन वर्षांत हे काम पूर्ण हाईल, असे ते म्हणाले.