अतिक्रमणाचे दुष्परिणाम; प्रशासकीय यंत्रणांचा बेजबाबदारपणा उघड नागावचा पिरवाडी समुद्रकिनारा पावसाळ्यात उसळणाऱ्या समुद्राच्या लाटांमुळे उद्ध्वस्त होत आहे. गेल्या तीन दिवसांत किनाऱ्याची प्रचंड हानी झाली आहे. त्यामुळे किनाऱ्यावरील शेकडो वर्षांची झाडे उन्मळून पडली आहेत. पुढील तीन महिन्यांत अशाच प्रकारच्या लाटा धडकल्यास यावेळी नागाव गावात समुद्राच्या भरतीचे पाणी जाण्याचीही भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे. समुद्रातील वाढत्या अतिक्रमाणांचे हे दुष्परिणाम आहेत. प्रशासन आणि संबंधित विभाग मात्र एकमेकांवर जबाबदारी टाकून हात वर करत आहेत. नागावच्या किनाऱ्याची धूपप्रतिबंधक बंधाऱ्याअभावी धूप होऊ लागली आहे. या बंधाऱ्याच्या स्थितीची पाहणी २०१६ च्या पावसाळ्यात महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड, स्थानिक आमदार मनोहर भोईर आणि तहसीलदार तसेच स्थानिक संस्थानीही केली होती. यावेळी पावसाळ्यापूर्वी या बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु दुसरा पावसाळा सुरू होऊन पुन्हा धूप होऊ लागली आहे. या संदर्भात उरणचे आमदार मनोहर भोईर यांच्याशी संपर्क साधला असता हा बंधारा सीआरझेडमध्ये येत असल्याने त्याची परवानी मिळालेली नाही. त्यामुळे हे काम रखडल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. परंतु काम पूर्ण करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर तहसीलदार कल्पना गोडे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. बंधाऱ्याचा प्रस्ताव २०१५ मध्ये तयार करण्यात आला होता. त्यासाठी ५ कोटींचा निधीही मंजूर झाला होता. परंतु शासन पातळीवर हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. - सुधीर देवरे, रायगड जिल्हा कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र मत्स्य विभाग