नवी मुंबई टपाल कार्यालयातर्फे १ व २ डिसेंबर रोजी नेरुळ सेक्टर २४ येथील आगरी कोळी सांस्कृतिक भवनामध्ये नवी मुंबई टपाल तिकीट महोत्सव २०१५ आयोजित केला आहे. या महोत्सवामध्ये १८५४ पासून २०१५ पर्यंतची १ लाखापेक्षा अधिक टपाल तिकिटे पहाता येतील. महाराष्ट्र मंडलचे मुख्य पोस्ट मास्तर पी. एन. रंजित कुमार यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. नवी मुंबई टपाल कार्यालय महसुलाच्या बाबतीत देशात आघाडीवर असून हिमालच प्रदेश, हरियाणा व झारंखड या राज्यांच्या महसुलापेक्षा या कार्यालयाचा महसूल अधिक त्यामुळे नवी मुंबईला प्रदर्शनाचा हा बहुमान मिळाला आहे. टपाल कार्यालयाचे कामकाज कसे चालते, पत्र गोळा करणे आणि पत्र वाटणे याशिवाय या कार्यालयात काय काम चालते, याचीही माहिती या महोत्सवात मिळणार आहे. यावेळी एक सांस्कृतिक महोत्सवही होणार आहे.