श्री गणेश सहकारी गृहनिर्माण संस्था, नेरुळ घाऊक बाजारपेठेतील व्यापारी आणि कर्मचाऱ्यांकरिता शासनाकडून अत्यल्प दरात घरे मिळवून देण्यासाठी राखीव भूखंड देण्यात आले होते. त्यापैकी नेरुळ येथील श्री गणेश सहकारी संस्था एक आहे. नवी मुंबईत सर्व घाऊक बाजारपेठा स्थलांतरित झाल्या होत्या. त्यासह स्थलांतरित होणाऱ्या व्यापारी आणि कर्मचारी वर्गासाठी शासनाने सिडकोच्या मदतीने घाऊक व्यापारी, कर्मचाऱ्यांसाठी अत्यल्प दरात भूखंड वाटप केले आहेत. अशा पैकी दादर भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांना नेरुळ सेक्टर-२८ येथे सात एकर जागेत गृहनिर्माण संस्था उभारण्यात आली. या संकुलात वास्तव्यास असलेले रहिवासी हे दादर भाजीपाला मार्केटमधील स्थलांतरित आहेत. गृहनिर्माण संस्था उभारतानाच सर्वच जण भाजीपाला बाजारपेठेतील असतील असा नियम होता. आजतागायत तो नियम टिकून ठेवला असल्याचे संस्थेचे अध्यक्ष अशोक गावडे यांनी सांगितले. एकूण ५५४ कुटुंबातील सदस्यांची त्या वेळी गरीब परिस्थिती आणि कोणत्याही प्रकारची कागदपत्रे आणि आर्थिक पाठबळ नसल्याने त्यांच्याकडून एक हजार रुपये इतक्या रकमेवर सदस्यत्व देण्यात आले. अभुदय बँकेमार्फत त्यांना १९९६ साली घरे मिळवून दिली. या संकुलात सर्वधर्मीय आणि भाजीपाला घटकातील लोकांना सामावून घेऊन भारतीय संस्कार आणि संस्कृतीची जोपासना केली जात आहे. संकुलात सर्व जाती-जमातीचे सण नवरात्री, गणेशोत्सव, दसऱ्याला सोने सारे मोठय़ा उत्साहाने लुटून आनंदात भर टाकतातत. रहिवासी वर्गणीरूपाने गणेश मंदिरातील धार्मिक कार्याला आर्थिक मदत करतात. दानपेटीत हे दान टाकण्याची प्रथा आहे. यात कोणालाही सक्ती केली जात नाही. दानपेटीत सभासद वर्गणी जमा करीत असतात. गणेश मंदिराच्या परिसरात रोज भजने रंगतात. भजनी मंडळी हा उपक्रम मोठय़ा उत्साहाने पार पाडत असतात. संकुलातील रहिवासी व्यक्तिगत आणि जाहीर कार्यक्रमाच्या माध्यमातून पनवेल येथील आनंदवनात अन्नदान करीत असतात. ‘श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळा’च्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविले जातात. यात क्रिकेट, जलतरण आणि कुस्तीसारख्या स्पर्धा घेऊन राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तयार करण्यात आले आहेत. कुस्तीसारख्या नामशेष होणाऱ्या खेळालाही येथे प्रोत्साहन दिले जात आहे. या कुस्तीच्या माध्यमातून अनेक खेळाडू राष्ट्रीय पातळीवर गाजले आहेत. अशा तऱ्हेने एक भाजीपाला व्यवसायातील घटकांचे अस्तित्व टिकवून ठेवून त्यांना पुढे नेण्याचा वसा येथील नागरिकांनी घेतला आहे. संकुल बाग संकुलात पाच उद्याने आहेत. संकुलाभोवती वेगवेगळ्या प्रकारची ४३० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यात आंबा, नारळ, लिंब, अशोका अशा प्रकारची फुले आणि फळझाडे लावण्यात आली आहेत. नवी मुंबई महानगरपालिका आणि वृक्षारोपण प्राधिकरण यांच्या वतीने पुरस्कार देण्यात आले आहेत; मात्र सोसायटीत फक्त वृक्षलागवडीपुरती मर्यादित न ठेवता ठिकठिकाणी बसण्यासाठी बाके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामुळे संकुलाच्या आवारात फिरताना एकीकडे झाडे, खेळणारी मुले आणि ठिकठिकाणी आसनव्यवस्था दिसत आहे. सौरऊर्जेचा ध्यास प्रत्येक मजल्यावर सौरऊर्जेवर चालणारे दिवे आहेत. याशिवाय संकुलाच्या आवारातही असे दिवे लावण्यात येणार आहेत, कंपोस्ट खतनिर्मितीचा संकुल रहिवाशांचा मानस आहे. याच वेळी पर्जन्यजल संधारण यंत्रणा बसविण्याचा निर्णयही रहिवाशांनी घेतला आहे.