३ लाख १९ हजार रुपयांची चांदीची कमान, वाळ्या हस्तगत करावे गावातील तलावाजवळील मंदिराचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्यास आणि त्याच्या साथीदारास एनआरआय पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ३ लाख १९ हजार रुपयांची चांदीची कमान आणि चांदीच्या वाळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. नोव्हेंबरमध्ये अज्ञात चोरटय़ांनी करावे गावातील गणेश मंदिराचे कुलूप तोडून चोरी केली होती. त्या संदर्भातील तक्रार मंदिराचे विश्वस्त दत्तात्रय तांडेल यांनी केली होती. तपासात कनीकलाल ऊर्फ कल्लू जैसवाल (२९) या रिक्षाचालकाच्या हालचालींवरून पोलिसांचा संशय बळावला. त्याच्यावर तपास पथकाने पाळत ठेवली आणि त्याला नेरुळ येथील बालाजी मंदिराजवळ अटक केली. त्याने दिलेल्या माहितीनुसार प्रमुख आरोपी शंकर कापसे (२६) याचा तपास करण्यात आला. एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे व सहायक पोलीस निरीक्षक अशोक फल्ले यांनी सखोल चौकशी केली. कल्लूने दिलेल्या माहितीनुसार मंदिर रात्री बंद असते, पहारेकरी नसतो आणि तिथे चांदीची कमान आहे, अशी माहिती आरोपींना मिळाली होती. संधी साधून चोरी करण्यात आल्याची कबुली आरोपींनी दिली. शंकर कापसेच्या घरातून चांदीची कमान व वाळ्या जप्त करण्यात आल्या. कापसे हा नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या अभिलेखात सराईत गुन्हेगार असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या गुन्ह्य़ाव्यतिरिक्त आणखी काही गुन्हे आरोपीने केले असण्याची शक्यता पोलीस व्यक्त करत आहेत. त्याअनुषंगाने तपास चालू असल्याचे परिमंडळ-१ चे उपायुक्त प्रशांत खैरे यांनी सांगितले. या चोरीचा उलगडा करण्यासाठी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, प्रकाश साळुंखे, सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक भूषण कापडणीस यांचे तपास पथक स्थापन केले होते.