अवधबिहारी लाल यांची वृक्षलागवडीसाठी पनवेलमध्ये जनजागृती

‘जंगल तोडण्याची किती मोठी किंमत मोजावी लागते, हे उत्तर प्रदेशातील लाखीमपूर जिल्ह्य़ातील चार हजार वस्ती असलेल्या गावाला आज कळालेय. १९८० साली गावकऱ्यांनी ३५ हेक्टर जमिनीवरील झाडे भुईसपाट केली आणि त्याच वर्षी पावसाळ्यात नदीला महापूर आला. त्याच पुरात ६० जणांचे कुटुंब वाहून गेले. त्या वेळी मी अवघा १३ वर्षांचा होतो. भिंतीवरून चढत छताला लटकलो. पुराचे पाणी ओसरले तेव्हा गावात नदीतून वाहून आलेल्या गाळाशिवाय दुसरे काहीच शिल्लक नव्हते. काही दिवसांनी इंदिरा गांधी पूरग्रस्त भागाच्या भेटीला आल्या. त्या दिवसापासून मी ‘हे विश्वची माझे घर’ असा वसा घेतला. तेव्हापासून आजवर रोज किमान ४० किलोमीटर चालायचं आणि जनतेला पर्यावरणाचा रक्षणाचा संदेश द्यायचा, हे व्रत हाती घेतले आहे, पर्यावरणासाठी पदयात्रा करणारे अवधबिहारी लाल सांगत होते..
मानवी विकासात वृक्षांचा फार मोठा वाटा आहे. देश वाचवायचा असेल तर झाडे जगवावी लागतील. म्हणूनच देशवासीयांमध्ये ही प्रेरणा जागृत करण्यासाठी विश्वभ्रमंती करणारे लाल आणि त्यांच्यासोबत आलेल्या महेंद्रप्रताप आणि जितेंद्रप्रताप यांचे शुक्रवारी पनवेलमध्ये आगमन झाले. वाहनांमधून कार्बनडायऑक्साईड बाहेर पडतो. त्यामुळे पर्यावरणाची सर्वाधिक हानी होत असते. त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाने वाहनाची नोंद करताना चालक आणि मालकांना परवाने देताना झाडे लावण्याचा संदेश दिला पाहिजे, असे ३६ वर्षांपासून पर्यावरणासाठी पदयात्रा करणारे अवधबिहारी लाल यांनी सांगितले. लाल यांनी आजवर तीन लाख ८ हजार किलोमीटरचा प्रवास पायी पूर्ण केला आहे. या प्रवासात त्यांना दोन तरुणांची साथ आहे. पायी प्रवासात सामान्य नागरिक आणि परिसरातील अधिकाऱ्यांना भेटून पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्याचे काम लाल आणि त्यांचे सहकारी करतात. यातील सर्व जण अविवाहित आहेत. प्रत्येक जिल्ह्य़ातील मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्याची भेट घेऊन रोपांची लागवड करण्याबाबत आवाहन केले जाते. यात जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, प्रादेशिक परिवहन विभागाची कार्यालय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ठाणे व मुंबईच्या प्रवासात या मंडळींशी संवाद साधण्यासाठी ०९४५५००४४७१ या मोबाइल क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.