उद्धव ठाकरे यांचे पनवेलच्या जनतेला आवाहन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गल्लीबोळात जाऊन सभा घेऊन पक्षाचा प्रचार करतात. हे मुख्यमंत्र्यांचे काम नाही. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याचे काम करणे गरजेचे असून चांगले काम असल्यास प्रचाराची गरज भासणार नाही, असा टोल लगावत मुख्यमंत्री व भाजपने केलेल्या संमोहनातून नागरिकांनी बाहेर येण्याची आवश्यकता असल्याचे शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

पनवेल महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेनेने कामोठे वसाहतीमधील पोलीस ठाण्याशेजारील मोकळ्या मैदानात घेतलेल्या जाहीर सभेत ठाकरे बोलत होते. मागील २० वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कळंबोली येथे सभा घेतल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांची सभा झाल्यामुळे या सभेला भरगच्च गर्दी सेनेच्या कार्यकर्त्यांनी केली होती. या सभेत पनवेल जिंकायला आलोय, अशी घोषणा ठाकरे यांनी केली.

अन्यथा शेतकरी प्रश्नावर स्फोट

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यात वातावरण धुमसण्याची वेळ आली आहे. धुमसणाऱ्या ज्वालामुखीचा वेळेमध्ये निचरा झाला नाही तर स्फोट होईल, असेही ठाकरे यांनी विधान केले.