साठवणुकीसाठी दहा वर्षांपूर्वी राज्य सरकारने शिवकालीन पागोळी विहीर योजना राबविली होती. या योजनेतून उरण तालुक्यातील पिरकोन, वशेणी, पाले, आवरे आणि गोवठणे गावात २११ विहिरी बांधल्या होत्या. या विहिरीत चार महिने पडणाऱ्या पावसाच्या पाण्याची साठवणूक करून त्याचा वापर सध्याच्या पाणी टंचाईच्या काळात केला जात आहे. उरण तालुक्यात चार महिन्यांत २३०० ते २७०० मिलीमीटर पाण्याची नोंद होते. यापैकी ७५ टक्के पेक्षा अधिक पाणी हे पाणी साठवणुकीची सोय नसल्याने वाया जाते. त्यामुळे भरपूर पाऊस, परंतु उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची कमतरता असे चित्र असते. दहा हजार लिटरपेक्षा अधिक पाणी साठवणुकीसाठी टाक्या बांधण्यासाठी शासनाच्या वतीने अनुदान दिले होते. माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन गावंड यांनी उरणच्या पूर्व विभागातील या गावातील पिण्याच्या पाण्याची असलेल्या समस्या सोडविण्यासाठी या योजनेतून पागोळी विहिरी बांधण्यास प्रोत्साहित केले होते. त्यामुळे येथील पाणी प्रश्न थोडय़ाफार प्रमाणात का होईना सुटण्यास मदत झाली. घरावरील छतावर पडणारे पागोळीचे पाणी हे नितळ व स्वच्छ असल्याने ते हवाबंद टाकीत साठविल्याने विहिरीतील पाणी हे शुद्ध राहते. त्यामुळे या विहिरीतील पाण्याचा वापर पिण्यासाठीही करीत आहेत. या संदर्भात उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व्ही. एम. प्रभे यांच्याशी संपर्क साधला असता उरण तालुक्यात २११ पागोळी विहिरी असून भविष्यात अशा विहिरी बांधण्यासाठी योजनेची मागणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. अंगणात पाणी २००५ मध्ये राज्य सरकारने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या परिसरात पडणाऱ्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी येथील नागरिकांच्या घराच्या छतावर पडणाऱ्या पाण्याच्या पागोळ्यांतील पाणी साठवणुकीसाठी अंगणात वा जागा असेल त्या ठिकाणी पागोळी विहिरीची योजना राबविली.