स्वयंचलित यंत्रमाग बसवल्यामुळे विणकराचे काम सोपे आणि कमी झाले. त्यामुळे त्याला अधिक यंत्रमाग चालवायला देणे शक्य झाले. साधा यंत्रमाग असताना जो विणकर चार यंत्रमाग चालवायचा, त्याला स्वयंचलित यंत्रमाग असल्यावर १६ ते २४ यंत्रे चालवायला देता येऊ लागली. ही संख्या त्या यंत्रावर चालवल्या जाणाऱ्यात कापडाच्या प्रकारानुसार ठरवतात.प्रत्येक विणकर जास्त यंत्रे चालवत असल्यामुळे उत्पादन वाढते. त्यामुळे दर मीटरमागे उत्पादन खर्च कमी होतो. त्यामुळे नफ्यात वाढ होते. सध्या सर्वच उद्योगात असलेली स्पर्धा लक्षात घेतली तर गुणवत्ता चांगली असणारा उद्योग पुढे जातो. स्वयंचलित यंत्रमागाला सूताचा दर्जाही चांगला लागतो. त्यामुळे स्वयंचलित यंत्रमागावर तयार होणारे कापड गुणवत्तापूर्ण होते. त्याचा पुढील परिणाम म्हणजे निर्यातीसाठीचे कापड स्वयंचलित यंत्रमागावर विणले जाते. जागतिक स्पध्रेत ते फायदेशीर ठरते. स्वयंचलित यंत्रमागाची रचनासुद्धा मजबूत केलेली असल्यामुळे मोडतोडीचे प्रमाण कमी असते. त्याचाही उत्पादन वाढायला हातभार लागतो. विणकराचा कामाचा बोजा कमी झाल्यामुळे आणि स्वच्छता, टापटीप याकडे अधिक लक्ष दिल्यामुळे पण कार्यक्षमतेत वाढ झालेली आहे.याच कारणाने स्वयंचलित यंत्रमागाचे प्रमाण साध्या यंत्रमागाच्या तुलनेत इतर देशांत जास्त आहे. इंग्लंड, अमेरिकेत हे प्रमाण १०० टक्के आहे तर चीन, जपानमध्ये ६० ते ७० टक्के आहे. भारतात मात्र हे प्रमाण जेमतेम २५ टक्के आहे. या यंत्रमागाची भांडवली किंमत जास्त आहे. ही यंत्रे वापरल्यावर होणारी कामगार कपात युनियनला मान्य नाही. इत्यादी कारणांमुळे भारतात हे प्रमाण कमी आहे. इथे आपल्या देशाला सुधारणा करायला वाव आहे. या यंत्रमागावर तयार होणारे कापड दोषरहित असते. त्यामुळे भारतातही निर्यातीसाठीचे बहुतेक कापड अशाच यंत्रमागावर विणले जाते. टप्प्याटप्प्याने हे उत्पादन वाढत आहे, हे चांगले प्रगतीचे लक्षण आहे. भारताला कापडाच्या निर्यातीला जो वाव आहे, या यंत्राच्या वापरामुळे साध्य होऊ शकतो. आपल्याकडे विणकरांची संख्या मुबलक आहे. त्यांना या यंत्रावर काम करणे थोडय़ाशा प्रशिक्षणानंतर, सहज शक्य होईल. आपल्याकडे असलेल्या या विशिष्ट मनुष्यशक्तीचा उपयोग करायला हवा. देशहिताच्या दृष्टीने ते करणे गरजेचे आहे. महेश रोकडे (कोल्हापूर), मराठी विज्ञान परिषद,वि. ना. पुरव मार्ग,चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org संस्थानांची बखर - गोंडल राज्य स्थापना गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील गोंडल हे आजचे एक छोटेखानी शहर, ब्रिटिशराजच्या काळात एक महत्त्वाचे संस्थान होते. जडेजा राजपूत घराण्याचा ठाकोर श्री कुंभोजी प्रथम याने १६३४ मध्ये येथे आपले छोटेखानी राज्य वसविले. कुंभोजी नंतर जरी त्याच्या मुलांमध्ये संघर्ष होत राहिला तरी त्याचा पुढच्या चौथ्या पिढीतल्या कुंभोजी चतुर्थने दोराजी, सराई वगरे परगाणे घेऊन राज्यविस्तार केला. एकोणिसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात गोंडल राज्यकर्त्यांनी कंपनी सरकारशी संरक्षण करार केला. संग्रामजी द्वितीय याच्या मृत्यूनंतर १८६९ साली त्याचा मुलगा भगवतसिंहजी गादीवर आला त्यावेळी तो केवळ चार वर्षांचा होता. लहान वयातच त्याची प्रखर बुद्धीमत्ता पाहून ब्रिटिशांनी त्याला पुढे उच्चशिक्षणासाठी इंग्लंडला पाठविले. भगवंतसिंहाने तिकडे एडिनबरो विद्यापीठातून वैद्यकीय शिक्षण घेऊन रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन, एडिनबरोची फेलोशिप मिळविली. भारतीय संस्थानिकांपकी वैद्यकीय पदवीधर असलेले भगवतसिंह हे पहिलेच संस्थानिक होत. राजेपदावर येताच आपल्या बुद्धीमत्तेची जोड देऊन भगवतसिंहांनी प्रशासकीय सुधारणा करून राज्याचे महसुली उत्पन्न दसपटीने वाढविले, प्रजेवरील सामान्य करात कपात केली. सुतारकाम, बांधकाम, लोहारकामाचे व्यावसायिक शिक्षण देण्याची केंद्रे सुरू केली. वैद्यकीय सेवांमध्ये आधुनिक सोयी निर्माण करून औषधांची उपलब्धता वाढविली. तारघरसेवा, रेल्वे, पक्के रस्ते निर्माण करून भगवतसिंहांनी औद्योगिकीकरणास चालना दिली. भगवतसिंह यांच्या उच्चशिक्षित मुलांपकी डॉक्टर मुलगा राज्याचा प्रमुख वैद्यकीय अधिकारी, इंजिनियर मुलगा सार्वजनिक बांधकाम खाते प्रमुख तर तिसरा मुलगा राज्य रेल्वे प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्या काळात गोंडलचे राजघराणे जसे राज्याच्या कल्याणाचा ध्यास घेऊन झपाटलेले होते! त्यांच्या मृत्यूनंतर राजेपदावर आलेल्या भोजराजसिंहाने १९४८ साली गोंडल संस्थान स्वतंत्र भारतात विलीन केले. सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com