कैखुश्रो बेगम नंतर भोपाळमध्ये तिचा मुलगा नवाब हमीदुल्लाखान याची नवाबपदाची कारकीर्द १९२६ ते १९४९ अशी झाली. भारतीय नरेश मंडळाचा अधिपती म्हणजेच ‘चेंबर ऑफ प्रिन्स’ चा चान्सलर म्हणून त्याने अनेक वष्रे काम पाहिले.
तुलनेने धनिक असलेल्या भोपाळ संस्थानच्या या नवाबाचे मोहम्मद अली जिना आणि गव्हर्नर जनरल माऊंटबॅटन यांच्याशी जवळचे संबंध होते.  पुढे भारताला स्वातंत्र्य मिळून पाकिस्तान स्थापन होणार हे ठरले त्या वेळी, मध्य भारतातील भोपाळ संस्थान पाकिस्तानात विलीन करावे म्हणून जिनांनी नवाबावर मोठा दबाव आणला होता. परंतु नवाबाने अखेरीस आपले राज्य भारतातच विलीन केले.
नवाब हमीदुल्लाची मोठी मुलगी आणि संस्थानाची वारस अबिदा सुलतान हिने मात्र, आपले सर्व हक्क सोडून १९५० साली पाकमध्ये आश्रय घेऊन पाकच्या परराष्ट्र व्यवहार खात्यात नोकरी केली. तिचा मुलगा शाहरियार खान हा पाकीस्तानचा परराष्ट्र सचिव आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा अध्यक्ष होता.
अबिदा सुलतान पाकिस्तानात स्थायिक झाल्यामुळे भारत सरकारने तिची बहीण साजिदा बेगम हिला भोपाळच्या गादीचे वारस ठरवून नवाबपदाचे लाभ त्या वेळच्या कायद्यांप्रमाणे दिले. पुढे साजिदा बेगमशी पतौडी संस्थानचा नवाब इफ्तिकार अली खानचा निका झाला.
भोपाळ गादीला दुसरा वारस नसल्यामुळे साजिदाचा एकुलता एक मुलगा आणि नवाब ऑफ पतौडी, मन्सूर अली खान हाच भोपाळच्या गादीचाही वारस ठरला!
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

कुतूहल – भारतीय वस्त्रोद्योगाचे जगामधील स्थान  (भाग- १)
nav03भारतीय वस्त्रोद्योगाला प्राचीन व समृद्ध अशी परंपरा आहे. आजही देशाच्या आíथक आणि सामाजिक व्यवस्थेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा उद्योग आहे. या उद्योगाचा राष्ट्रीय सकल उत्पन्नात (ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट) चार टक्के, एकूण औद्योगिक उत्पादनात १४% तर देशाच्या निर्यातीत १७% वाटा आहे. वस्त्रोद्योग देशातील ४.५ कोटी लोकांना थेट रोजगार पुरवितो आणि जवळजवळ ५ कोटी लोक अप्रत्यक्षपणे रोजगारासाठी या उद्योगावर अवलंबून आहेत. मूल्यवृद्धीच्या साखळीमध्ये भारतीय वस्त्रोद्योग स्वयंपूर्ण आहे. सुमारे साडेनऊ लाख हेक्टर जमिनीवर कापसाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या उद्योगामुळे आधार मिळतो. भारतीय वस्त्रोद्योगाचा मागांच्या एकूण संख्येमध्ये (सर्व प्रकारचे माग मिळून) जगामध्ये पहिला क्रमांक लागतो तर सूत कताईच्या चात्यांच्या बाबतीत जगामध्ये दुसरा क्रमांक आहे.
 nav02 तागाच्या उत्पादनात (१ अब्ज, ९० कोटी किलो) भारत प्रथम क्रमांकावर आहे तसेच रेशमाच्या आणि कापसाच्या उत्पादनात दुसरा क्रमांक आहे (उत्पादन अनुक्रमे १.५ कोटी आणि १४ अब्ज किलो). याचबरोबर कापसाच्या निर्यातीत भारताचा दुसरा क्रमांक आहे (३ अब्ज ५६ कोटी किलो) तर मानव निर्मित धाग्यांच्या उत्पादनात (२ अब्ज किलो) भारत पाचव्या क्रमांकावर आहे. लोकरीच्या उत्पादनात (५.१ कोटी किलो) जगात आठवा क्रमांक लागतो. चीन, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, हाँगकाँग, तुर्कस्तान, इंडोनेशिया, व्हिएतनाम हे वस्त्रोद्योगामधील जगातील प्रमुख देश आहेत. वस्त्रोद्योगामधे चीनचा प्रथम क्रमांक आहे. चीनच्या तुलनेत भारतीय वस्त्रोद्योग किती पिछाडीवर आहे याची कल्पना दिलेल्या तक्त्यावरून येईल.
चं. द.काणे (इचलकरंजी) ,मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org