कुतूहल      
भाषा, प्रांत, देश जसे बदलत जातात तशी तिथे आढळणाऱ्या सजीवांची व्यावहारिक नावंसुद्धा बदलत जातात. एकाच सजीवाला जगभरातून वेगवेगळ्या नावांनी संबोधलं जात असेल तर त्याची ओळख पटण्यामध्ये अनेक समस्या येतील. सजीवांचा शास्त्रीय अभ्यास करताना वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या शास्त्रज्ञांचाही मोठा गोंधळ उडेल.
सजीवांच्या नामकरणाची ही समस्या कार्ल लीनियस या स्वीडिश शास्त्रज्ञाने कित्येक वर्षांपूर्वीच ओळखली आणि सजीवांना नाव देण्याची एक पद्धती त्याने विकसित केली. या पद्धतीमध्ये सजीवाचं नाव लिहिताना नेहमी दोन शब्दांचा वापर केला जात असल्याने या पद्धतीला ‘बायनॉमिअल नॉमेनक्लेचर’ किंवा ‘द्विनाम पद्धती’ म्हणतात. ‘स्पीशिज फ्लँटेरम’ या आपल्या पुस्तकामध्ये त्याने या पद्धतीची माहिती दिलेली आहे. त्याकाळी विद्वान लोक लॅटिन भाषेमधून संवाद साधत असल्याने या पद्धतीमध्ये लॅटिन नावांचा वापर केल्याचं आढळतं. गंमत म्हणजे कार्ल लीनियसचं मूळ नाव कार्ल व्हॉन लिनी असं होतं. पण, नामकरणाच्या द्विनाम पद्वतीची सुरुवात त्याने स्वत:पासून केली आणि आपलं नाव ‘कार्ल व्हॉन लिनी’ ऐवजी ‘कार्ल लीनियस’ असं दोन शब्दांमध्ये लिहायला सुरुवात केली.
त्याच्या मृत्यूनंतर सुमारे १८० वर्षांनी, म्हणजे १९५६ साली आंतरराष्ट्रीय वनस्पतीशास्त्र परिषदेत शास्त्रज्ञांनी सजीवांना शास्त्रीय नाव देण्याची लिनियस याने विकसित केलेली पद्धती एकमताने स्वीकारली. या द्विनाम पद्धतीतल्या दोन शब्दांपकी पहिला शब्द त्या सजीवाची जात म्हणजे ‘जिनस’ तर दुसरा शब्द त्या सजीवाची प्रजाती दर्शवतो. नावातला पहिला शब्द म्हणजे त्या सजीवाचं नाव असतं तर दुसरा शब्द हे विशेषण असतं. हा दुसरा शब्द त्या सजीवाच्या प्रजातीचं वर्णन करणारा किंवा तो सजीव जिथे आढळतो, तिथल्या भौगोलिक परिस्थितीची माहिती देणारा असतो. उदा. आपल्याला परिचित असलेल्या आंब्याचं शास्त्रीय नाव ‘मँगिफेरा इंडिका’ असं आहे, तर आपलं म्हणजे माणसाचं शास्त्रीय नाव द्विनाम पद्धतीनुसार ‘होमो सेपियन’ असं आहे.  नामकरण करण्याच्या या विशिष्ट पद्धतीमुळे जागतिक स्तरावर सजीवांची ओळख आणि त्यांचा अभ्यास यांच्यात सुसूत्रता आली आहे.
    – प्रिया लागवणकर (डोंबिवली)
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई-२२  office@mavipamumbai.org

जे देखे रवी..     ती गोरीपान परिचारिका
माझी पहिली आठवण मी तीन -साडेतीन वर्षांचा होतो तेव्हाची आहे. मला एका जाळी असलेल्या गाडीतून कोठेतरी नेत आहेत आणि मी जोरजोरात रडत आहे अशी ती आठवण आहे. नंतर, मला ज्याच्यावरून खाली उतरता येणार नाही अशा जाळीच्या पलंगावर ठेवल्याचीही आठवण आहे. त्याच पलंगाशेजारी बसून माझे वडील माझी समजूत काढत आहेत, ‘उद्या नक्की घरी जायचं’, असे ते सांगत आहेत. इतक्यात एक पांढरेशुभ्र कपडे घातलेली गोरीपान बाई माझ्या वडिलांना, ‘आता नातेवाईकांची वेळ संपली, तुम्ही घरी जा’ , असे सांगते आहे अशीही त्या प्रसंगाची आठवण आहे. या आठवणी खऱ्या आहेत. १९४२-४३ मध्ये माझे वडील सेंट जॉर्ज या मुंबईच्या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी होते. मला अमांश झाले होते, म्हणून रुग्णालयात ठेवावे लागले होते. पण तो काळ वेगळा होता. रुग्णालयात शिस्त होती. तेव्हा तिथली परिचारिका माझ्या वडिलांना ते वैद्यकीय अधिकारी असूनही वेळेचे भान देत होती. सद्यस्थितीबद्दल न बोललेलेच बरे.
त्यानंतर ५५ वर्षांनी ती आठवण जागी करत मी मुंबईच्या टिळक रुग्णालयातून निवृत्त होताना तेथील शिस्त, टापटीप, स्वच्छता, नीटनेटकेपणा मार्गी लावण्यासाठी एक स्वयंसेवी संस्था काढली. माझे विद्यार्थी आणि शिक्षक दोघांकडून, इतर मित्रांकडून, नातेवाईकांकडून, धर्मादाय संस्थांकडून पाच वर्षांच्या बोलीवर पैसे घेऊन त्याच्या व्याजावर ही संस्था चालवली. अनेक लाख रुपये या कारणी लावले. खिडक्यांना जाळय़ा लावल्या, कारण लोक खिडकीतून कचरा टाकत असत. नातेवाईकांना बसण्यासाठी खुच्र्या दिल्या, ते बसले असताना त्यांना प्राथमिक अशा रोगराईबद्दलच्या कल्पना समजावून सांगण्यासाठी माणसे नेमली, त्यांच्या जेवणाच्या जागेची व्यवस्था केली, भिंतीवर कागद चिकटवू नयेत म्हणून फलक दिले, रुग्णालय स्वच्छ करण्यासाठी संस्थेची माणसे ठेवली, विहीर खणून त्यातले पाणी स्वच्छतागृहांत वापरले. पण टिळक रुग्णालयामध्ये मी स्वत:हून स्वखर्चाने जे करत होतो त्याला जो प्रतिसाद मिळाला त्यानेही आश्चर्यचकित झालो. स्वत:च जेरबंद झालेली नोकरशाही, आक्रमक आणि बेजबाबदार कामगार संघटना आणि उदासीन नगरसेवक यांमुळे माझे काम पुढे रेटणे जवळपास अशक्य झाले. अर्थात त्यामुळे मी नाउमेद झालो असे काही घडले नाही. काही प्रयोग फसतात, काही यशस्वी होतात एवढाच अर्थ त्यातून मी काढला.
याचे कारण मला ज्ञानेश्वरीतील ओवी आठवत होती. ती ओवी म्हणते, यश मिळाले तर फारच बरे, अर्धे राहिले तरी भले. परवा केली नावाच्या एका प्रवासी वार्ताहराने भारताबद्दल लिहिलेला मजकूर वाचत होतो, त्यात तो म्हणतो, ‘ भारताने महासत्ता होण्याचे स्वप्न विसरावे. जगाच्या पाठीवर इतका गचाळ आणि गलिच्छ देश मी बघितलेला नाही’, शेवटी तो लिहितो, ‘ भारतीयांनाच त्याचे काही वाटत नाही, तर मग सुधारणा होणार तरी कशी?’  
रविन मायदेव थत्ते  rlthatte@gmail.com

Health Special, Pregnancy , dohale,
Health Special: गरोदरपणा आणि डोहाळे; किती खावे, काय टाळावे?
Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?

आजचे महाराष्ट्रसारस्वत        ७ जानेवारी
१८८५ > सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारी विनोदी नाटके लिहिणारे माधव नारायण जोशी यांचा पुण्यात जन्म. शिक्षण वऱ्हाडात झाल्यानंतर त्यांनी दोन पौराणिक नाटकेही लिहून पाहिली, पण रंगभूमीवर ती चालली नाहीत. मग पाश्चात्य नाटककारांचा अभ्यास करून त्यांनी पुढे सुमारे २३ नाटके लिहिली; त्यापैकी ‘म्युनिसिपालिटी’ (१९२५) हे स्थानिक स्वराज्य  संस्थांतील लाचखोरी व बजबजपुरीवर प्रकाश टाकणारे नाटक आजही

ताजे वाटावे. खाडिलकरी पदांचे विडंबन करणाऱ्या ‘विनोद’(१९१६) या नाटकाने जोशींना प्रथम लोकप्रियता मिळाली.
१८८५ > लोकसाहित्याच्या मर्मग्राही संकलक व अभ्यासक डॉ. सरोजिनी बाबर यांचा जन्म. इस्लामपुरातून उच्च शिक्षणासाठी पुण्यात येऊन १९४४ मध्ये त्या बीए झाल्या व पुढे मराठी साहित्यात महिलांचे योगदान या विषयावर त्यांनी पीएच्. डी. मिळविली. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या सदस्य म्हणून त्यांनी ‘कुलदैवत’, ‘दसरा-दिवाळी’ ‘श्रावण-भाद्रपद’ आदी पुस्तके संपादित केली. बालकथांतून त्यांनी अक्कू आणि बक्कू या मानसकन्या साकारल्या, तसेच कवितालेखन आणि कथालेखनही केले.
संजय वझरेकर

वॉर अँड पीस                                                           अरुची घालवण्यासाठी..
अरुचि या विकाराची अनेकानेक कारणे आहेत. त्यातील प्रमुख कारण म्हणजे पोटामध्ये पाचकस्रावांचा अभाव असणे. आपण जेव्हा अन्न पाहतो, त्या वेळेस पोटातील पाचकस्रावांना लगेचच जाग येते व ते आपल्या लहान आतडे या निवासस्थानापासून आमाशयात येतात. हे पाचकस्राव अभावाने असणे किंवा वेळेत आमाशयात न येणे याची विविध कारणे आहेत. अनेक मंडळी अनेक कारणांकरिता उपवास करतात.  वेळ टळून गेल्यावर खूप उशिरा जेवायला बसतात. त्यामुळेही अरुचि लक्षण आपला प्रभाव दाखवतो. याच्या उलट आपल्या पचनाच्या ताकदीबाहेर आपण जेवलो तरीही अरुचि या लक्षणाचा प्रादुर्भाव होतो.  खूप पाणी पिण्याने रुची जाते. मानवी शरीर एकवेळ खूप अन्न पचवू शकते पण खूप पाणी पचवू शकत नाही, असा निसर्गनियम आहे. ज्यांना अरुचि हे लक्षण आहे; ज्यांचा आहार कमी आहे त्यांनी पाणी किंवा चहा, कॉफी, दूध असे द्रव पदार्थ तारतम्यानेच घ्यावे. काही वेळेस परस्परविरोधी गुणधर्माच्या जेवणाने अरुचि हा रोग जडतो.  जुलाब, उलटी, ताप याकरिता चुकीची किंवा फाजील प्रमाणात औषधे घेतल्याने पाचकस्राव बनतच नाही. हवा खराब असणे, आभाळ असणे या बाह्य़ घटकांची भर पडल्यावर अगोदरच अग्निमांद्य असणाऱ्या पेशंटला हा रोग आणखी छळतो.
या रोगाचा सामना करणे तुलनेने सोपे आहे. हे संबंधित रुग्णांनी लक्षात ठेवावे. त्याकरिता आले, लिंबूरसाचे पाचक कणभर मीठ व नाममात्र साखर मिसळून घेतल्यास तात्पुरती चव निर्माण होते. जी व्यक्ती स्थूल आहे तिने किंचित मिरेपूड लिंबाच्या रसाबरोबर जेवणापूर्वी तासभर घ्यावी. ओल्या मिरीचे चारपाच दाणे व त्याबरोबर लिंबाचा रस हे अरुचिवरचे टॉप औषध आहे. नेहमीच्या जेवणात पुदिना, आले व लसूण अशी चटणी असावी. क्षय विकारग्रस्त किंवा जुनाट अरुचि विकाराकरिता आमलक्यादि चूर्ण जेवणाच्या सुरुवातीला अवश्य घ्यावे. भोजनानंतर पंचकोलासव किंवा पिप्पलादि काढा घ्यावा. रुची तत्काळ येते.
इति अलम!   
वैद्य प. य. वैद्य खडीवाले