स्वयंपाकासाठी कोणतं तेल वापरावं असा गृहिणींना नेहमीच प्रश्न पडतो. आवश्यक मेदाम्लं मिळविण्यासाठी एकच तेल न खाता काही तेलं एकत्र करून वापरावीत. जागतिक आरोग्य संघटनेनं संपृक्त, मोनो आणि पॉली तेल याचं आदर्श प्रमाण अनुक्रमे १:१.५:१ असं सुचवलं आहे.
स्निग्ध पदार्थातून ऊर्जेबरोबरच आवश्यक मेदाम्लं शरीरास उपलब्ध होतात. लिनोलेईक (ओमेगा-६) व लिनोलेनिक (ओमेगा-३) ही आवश्यक मेदाम्लं मेंदू, हृदय, मज्जासंस्था, ग्रंथी व त्वचा यांच्या आरोग्यासाठी फार महत्त्वाची आहेत. तसेच डोळ्यातील दृष्टीपटाच्या (रेटिना) निर्मितीसाठी या मेदाम्लांची गरज असते. हृदयाची स्पंदनं नियंत्रित ठेवण्यासाठी व रक्तातील कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी करण्यासाठी लिनोलेईक व लिनोलेनिक या मेदाम्लांचा उपयोग होतो. रोगप्रतिबंधासाठी आवश्यक असलेल्या प्रोस्टाग्लांडिन या द्रव्याच्या निर्मितीसाठी या दोन्ही मेदाम्लांची गरज असते. या दोन मेदाम्लांबरोबरच ओलेइक आम्ल, पामिटिक आम्ल इ. आवश्यक मेदाम्लं शरीरात तयार होत नाही. त्यामुळे ती आहारातूनच मिळवावी लागतात.
शरीरांतर्गत होणाऱ्या जैवरासायनिक क्रियांमधे इलेक्ट्रॉन कमी असलेले जे ऑक्सिजनचे रेणू तयार होतात, त्यांना फ्री रॅडिकल्स असं म्हणतात आणि ते शरीराची हानी करतात. फ्री रॅडिकल्स टाळण्यासाठी शरीर अॅन्टिऑक्सिडंट रसायनं तयार करतं; पण ती पुरेशी न झाल्यास अन्नातून मिळवावी लागतात. क आणि इ जीवनसत्त्व आणि लिनोलेनिक (ओमेगा ३) मेदाम्ल ही अशी अॅन्टिऑक्सिडंटस् आहेत जी अन्नातून आपल्या पोटात जातात. पॉली असंपृक्त तेलातील मोहरीचं तेल, ऑलिव्ह तेल, जवस, अक्रोड आणि मासे यामध्ये लिनोलेईक (ओमेगा-६) व लिनोलेनिक (ओमेगा-३)चं प्रमाण जास्त असतं.
याचबरोबर मोनो असंपृक्त तेल (टवाअ) गटातील भुईमुगाचं तेल व तिळाचं तेल यांना महत्त्व आलं आहे, कारण ही तेलं रक्तातील कोलेस्टेरॉल काबूत ठेवायला मदत करतात. तळण्यासाठी तेलाचं तापमान वाढवावं लागतं. तापमान वाढल्यानं त्यातील मेदाम्लांचा नाश होतो. वाढत्या तापमानामुळे पॉली असंपृक्त मेदाम्लात (ढवाअ) बदल होतो म्हणून ती तेलं पदार्थ तळण्यासाठी वापरू नयेत.संपृक्त मेदाम्लातून (रआअ- तूप, लोणी, मटण, खोबरेल तेल इ.) शरीरास अ, क, ड आणि इ या जीवनसत्त्वांचा पुरवठा केला जातो.

प्रबोधन पर्व: मूठभर सत्ताभिलाषी लोक अधिकारहीन झाले तरच राज्यघटना टिकू शकेल
‘‘ज्यांचे सरकारी नोकरीत वर्चस्व आहे किंवा ज्यांना सरकारद्वारा नोकरीविषयक काही विशेष सवलती प्राप्त झाल्या आहेत अशांचा जातिवाचक उल्लेख झाला काय किंवा नाही झाला काय, सारखेच आहे. कारण त्यामुळे त्यांच्या जातिविषयक हितसंबंधांना कोणत्याही प्रकारे बाधा येणार नव्हती. पण एखाद्या कनवाळू अधिकाऱ्यास, इतर मागासलेल्या जातींतील होतकरू व्यक्तींस संधी द्यावीशी वाटली तर त्या व्यक्तीची जात माहीत नसल्यामुळे त्याला ते कार्य करता येणार नाही.. जातिवादाची कीड नष्ट करायची असेल तर ती सरकारी कागदपत्रांतून काढून होणार नाही त्यासाठी शिक्षणाच्या सोयी, सवलती सर्वाना लागू करणे आवश्यक आहे.’’
अशा प्रकारे संविधान सभेत ‘सरकारी कागदपत्रांवरून जातिवाचक उल्लेख रद्द करण्यासंबंधीच्या विधेयकाला’ विरोध करताना (१९४८) डॉ. पंजाबराव देशमुख संविधान सभेतील समारोपाच्या भाषणात (१९४९) म्हणाले होते –
‘‘संविधान सभेने स्वतंत्र व सार्वभौम भारताला साजेशी राज्यघटना अतिशय परिश्रमपूर्वक तयार केली.. आपली राज्यघटना सांसदीय लोकशाही पद्धतीची असून ती अमेरिकन राज्यघटनेपेक्षा ब्रिटिश राज्यघटनेला अधिक जवळची आहे. ही राज्यघटना म्हणजे १९५३ च्या कायद्याची सुधारून वाढविलेली आवृत्ती होय. फक्त गव्हर्नर जनरलऐवजी अध्यक्ष आहे. बाकी प्रांतोप्रांती गव्हर्नर आहेतच. एकीकडे आपण संसदेला सार्वभौम मानले तर दुसरीकडे काही मूलभूत हक्क मान्य करून सांसदीय सार्वभौमत्व मर्यादित केले.. सद्यपरिस्थितीत आमूलाग्र व क्रांतिकारी बदल घडवून आणण्यासाठी काही या तत्त्वाची निर्मिती झाली नसून परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याकरिता त्याची निर्मिती करण्यात आली आहे. पूर्वीच्या अनेकविध राज्य प्रशासन संस्था आपण जशाच्या तशाच ठेवल्या आहेत. त्यामुळे मूठभर सत्ताधीशांच्या हातीच भारताची राज्यसूत्रे राहतील; तर प्रौढ मताधिकाराने काही महत्त्वाचा बदल घडून येऊन मूठभर सत्ताभिलाषी लोक अधिकारहीन झाले तरच ही घटना टिकू शकेल, नाहीपेक्षा ही राज्यघटना म. गांधी यांची राज्यविषयक कल्पना प्रत्यक्षात उतरवू शकण्यास केवळ असमर्थ ठरेल.’’

मनमोराचा पिसारा: अजब है दिल का आलम..
गाण्याची सुरुवात अत्यंत आकर्षक, दिलखेचक म्हणावी अशी. काळ्या गुळगुळीत पत्थरावर पडलेलं प्रतिबिंब सुंदर लकेर घेऊन जिवंत होतं आणि डोळे खिळून आपण पाहत राहतो.
पडद्यावर वहिदा रेहमानचा नेटका चेहरा, पांढराशुभ्र पोशाख आणि विलक्षण भावदर्शी मुद्रा दिसते आणि पुढच्याच फ्रेममध्ये सुनील दत्तचा काळा राकट चेहरा, तलवारकट मिशा आणि जाड भुवयांखालचे भेदक डोळे. संपूर्ण गाण्यात हे दोन रंग अतिशय बोलकेपणानं वातावरणातला तंगपणा, बेहोशी आणि आक्रमकता व्यक्त करतात. या दृश्य पाश्र्वभूमीवर लतादीदींचा दैवी स्वर आपल्याला गच्च पकडून ठेवतो.
गाण्यामधून ‘मुझे जीने दो’मधल्या चित्रपटातल्या कथेच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रसंग साकार होतो. हळूहळू गाण्यातली मदहोशी वाढत जाते आणि या आवेगाची अखेर काही तरी अचानक घडून होणार आहे हे जाणवतं.
दृश्य परिणाम, सूर, संगीत या सर्वाना पोषक ठरणारे साहिरचे शब्द सरताज ठरतात. गाण्यातली नायिका बेकरार आहे. नायकाच्या येण्याची तिला चाहूल लागते आणि तिचे अवघे अस्तित्व कुंठित होतं.
‘आज अजब है दिल का आलम’ असं म्हणून ती त्या झपाटलेल्या मनोवस्थेचं वर्णन करते. विरहाच्या वेदनेनं होरपळणाऱ्या तिच्या नाजूक हृदयावर त्याचे प्रेमाचे दंवबिंदू पडतात. जणू काही पेटून उठलेल्या एखाद्या वणव्यावर अचानक हलकी बारिश व्हावी तशी तिची अवस्था होत्येय.
साहिरने शब्दांची जी किमया साधली ती अजब आहे.
गाण्याची नशा अशी की तिच्या मनातली बेहोशी आपल्या नसानसांत भिनते. या गाण्याचा आस्वाद घेता घेता आपलंही भान हरपतं.
या गाण्यात वहिदाजींचे डोळेच बोलतात असं नाही, तर धीमी चाल आणि हातांच्या नाजूक हालचाली यामधून गाण्याची धुंदी प्रतीत होते.
चित्रपट- मुझे जीने दो, संगीत- जयदेव
गीत- साहिर लुधियानवी

डॉ. राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com