वह्य़ा, पुस्तके पाण्याने भिजून खराब होऊ नयेत म्हणून पारदर्शक प्लास्टिकची फिल्म बाजारात उपलब्ध आहे. सुरुवातीला आच्छादनासाठी उपयोगात येणारे हे प्लास्टिक ‘पॉलिथीन’ नामक प्रकारचे असे. परंतु आता त्याची जागा ‘पीव्हीसी’ (पॉलिव्हिनाइल क्लोराइड) या प्रकाराने घेतली आहे. ‘पीव्हीसी’ची फिल्म निरनिराळ्या जाडीची तयार करता येते. लवचीक असूनही या फिल्मला वळ्या पडत नाहीत, त्यामुळं कव्हरसाठी ही फिल्म उत्कृष्ट असते. या कव्हरमुळे पुस्तकं पावसात भिजत नाहीत व वाळवी किंवा इतर कीटकांपासूनही त्यांचं संरक्षण होतं. या आच्छादन क्रियेला तांत्रिक भाषेत ‘लॅमिनेशन’ असं म्हणतात.
इंग्लंडमधील एका खेडय़ात मोरॅन नावाच्या एका तरुण तंत्रज्ञानाला पुस्तकाची आच्छादनं छापून झाल्यानंतर यांत्रिक पद्धतीनं त्यावर कायम स्वरूपाचं पारदर्शक आच्छादन घालण्याची कल्पना १९५६ साली सुचली. त्या वेळी बाजारात काचेसारखा पारदर्शक असलेला सेलोफेन पेपर मिळत असे. पॉलिव्हिनाइल असिटेटमुळं कागदाच्या पारदर्शकतेत काहीही फरक पडत नाही व पॉलिव्हिनाइल असिटेट लावलेला कागद छापलेल्या कव्हरवर ठेवून बराच वेळ दाब देऊन गरम इस्त्री फिरविल्यास दोन्ही कागद एकजीव झाल्यासारखे होतात. म्हणजेच आच्छादन होऊनसुद्धा आच्छादनाचा निराळा थर दिसत नाही. या क्रियेचं नंतर यांत्रिकीकरण केलं गेलं.
यानंतर जगातील अनेक कंपन्यांनी यावर संशोधन करून आपापल्या पद्धतीची नवीन प्रकारची ‘लॅमिनेशन’ यंत्रे तयार केली. तसेच आच्छादनासाठीही सेलोफेन कागदाला पर्यायी अनेक प्रकारच्या विविध फिल्म्स उपलब्ध झाल्या. यामध्ये पॉलिथीन, सेल्युलस अ‍ॅसिटेट, पीव्हीसी व पॉलिएस्टर यांचा समावेश आहे. सध्या पीव्हीसी व पॉलिएस्टर या दोन प्रकारच्या फिल्म जास्तीतजास्त प्रमाणात वापरल्या जातात.
लॅमिनेशन प्रक्रिया आता कागदापुरती मर्यादित राहिली नसून टिन, ज्यूटचं कापड इ.वरही लॅमिनेशन करणं शक्य झालं आहे. चामडे, मेणकापड यावरही लॅमिनेशन करता येतं. लॅमिनेशनचे आणखीही काही प्रकार आहेत. प्लायवूड किंवा लाकडाच्या फळीवर फोटो चिकटवून त्यावर लॅमिनेशन करण्याची पद्धत आहे.

मनमोराचा पिसारा: मी कंट्रोल -फ्रीक आहे..
मनाशी एकदा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे म्हणून ठरविलं. तुझ्याशी सोडून आणखी कोणाशी बोलणार? पाल्हाळ न लावता नेमक्या शब्दात माझं म्हणणं मांडतो आणि मला काय वाटतं ते सांगतो.
माझं कसंय की कोणाला काम सांगितलं की मी फार अस्वस्थ होतो. अगदी घरातली बारकी-सारकी कामं असोत की बाहेरची थोडय़ाफार निगुतीची असोत, माझं मन त्या कामाकडे धाव घेतं. मनात नाना तऱ्हेचे विचार येतात ते असे..
१) आपण सांगितलेलं काम आपण ठरविलेल्या वेळात होईल की नाही? २) आपल्याला हवं, अगदी हवं तस्सं काम समोरची व्यक्ती करील की नाही? ३) आपण घेतो तितकी जबाबदारी समोरची व्यक्ती घेईल की नाही?
असे विचार मनात आले की, चलबिचल होते. कारण अशा प्रश्नांची नकारात्मक उत्तरंच मिळणार असं वाटतं. या शंका आपण ज्या व्यक्तीवर काम सोपविलं, (सोपविलं की दिलं?) तिच्याकडे बोलून दाखविल्यावर तर ती व्यक्ती काम सोडून देईल, अशी धास्ती वाटते. त्यामुळे मी त्या व्यक्तीवर बारीक लक्ष ठेवून देतो. ती व्यक्ती चुकू नये म्हणून सूचना करतो. काम वेळेत पार पडावं, चांगलं व्हावं म्हणूनच मी सारखा बारीकसारीक बाबतीत काही न काही सुचवीत राहतो.
परंतु, याचा उलटा परिणाम होतो. मी सूचना करीत राहिलो की, समोरची व्यक्ती वैतागते. मी नॅगिंग करतो, मायक्रो मॅनेज करतो असं म्हणतात. असं मला कोणी म्हटलं की माझी चिडचिड होते.
माझ्या मित्रानं तर माझं नाव ‘सासू’ ठेवलंय. म्हणजे ‘सारख्या सूचना’ आणि समोरची व्यक्ती म्हणजे ‘सून’ सूचना नको.
मला वाटलं की मी मला ‘सासू’ का म्हणावं? जरा सखोल विचार केल्यावर लक्षात आलं की मला सगळ्या गोष्टींवर माझा ‘कंट्रोल’ असला पाहिजे, असं वाटतं. मी ‘कंट्रोलफ्रीक’ आहे. दुसऱ्या व्यक्तीला काम सांगितलं म्हणजे आपला कंट्रोल सुटला असं वाटतं आणि मग मी डेस्परेटली तो कंट्रोल मिळविण्याचा प्रयत्न करतो.
कंट्रोल ठेवण्याकरिता, सूचना करतो. माझ्या बारीकसारीक सूचनांकडे दुर्लक्ष केलं की, मला राग येतो. माझी चिडचिड होते.
एकदा समोरच्या व्यक्तीला विचारलं की, माझ्या सूचनांचं पालन तुम्ही लोक का करीत नाही? त्यावर माझा सहकारी म्हणाला, ‘आमच्यावर तुम्ही विश्वास टाकत नाही, आम्हाला काम कसं करायचं? हे समजत नाही आणि समजणारच नाही, असं तुम्ही का गृहीत धरता? सारख्या सूचनांची भुणभुण मागे लावली तर आम्हाला फार क्राउडेड वाटतं. तुम्ही सतत आमच्यावर करडी नजर ठेवून जबरदस्ती करताय असं वाटतं. व्हाय डू यू वाँट टू कंट्रोल अस?
त्याचं बोलणं ऐकून मला राग आला, पण मी काही बोललो नाही. वाटलं, त्या सहकाऱ्यानं डेअरिंग करून सांगितलं त्यावर विचार करायला हवा, कारण मला त्रास होतो आणि माझ्या स्वभावामुळे इतरांना त्रास होत असेल तर मी बदललं पाहिजे.
खूप नातेसंबंधात हे प्रश्न त्रास देत असावेत. प्रत्यक्ष सासू-सून, नवरा-बायको, मुलं आणि पालक, बॉस आणि सहकारी अशा नात्यांमध्ये एकमेकांवर कंट्रोल करण्याची सवय बऱ्याचजणांना असावी. मी तर कंट्रोल -फ्रीक आहे.
पण हे मला सोडून द्यायचंय. सतत कंट्रोल करण्याच्या सवयीमुळे मी कधी रिलॅक्स होऊ शकत नाही. सदैव ‘टेन्स’ आणि अपटाइट! इतका लोकांवर विश्वास टाकता येत नसेल तर स्वत:च सगळी कामं करावी, म्हटलं तर कामं संपत नाहीत. फारच थकवा येतो म्हणून चिडचिड होते.
ते काही नाही, मला सोडून द्यायचीय ही कंट्रोल करण्याची सवय.. थोडं रिलॅक्स राहतो. हळूहळू शिकतील समोरची माणसं.. थोडा वेळ लागेल इतकंच ना!
हुश्श, काय बरं वाटलं! ओझं उतरलंय डोक्यावरून.
तुझा, मी.
डॉ. राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व: आर्येतरांची गणपती ही हनुमानाप्रमाणेच ग्रामदेवता असावी
‘‘गणपती किंवा गणेश म्हणजे गणांचा स्वामी. गण म्हणजे समुदाय अथवा जमात. इंद्राला व ब्रह्मणस्पती या देवाला ऋग्वेदात ‘गणपति’ हे विशेषण वरील अर्थी योजले आहे. ब्रह्मणस्पती हा स्वतंत्र देव इंद्रादिकांसारखा ऋग्वेदात वर्णिला आहे. ऋग्वेदात (११-११२-९) इंद्राला उद्देशून ‘हे गणपती, तू नीट बैस; ज्ञानी वा कवी यांत तू श्रेष्ठ आहेस; तुझ्याशिवाय कोणते कर्म केले जात नाही.’ असे म्हटले आहे. वेदांच्या संहिता व ब्राह्मणग्रंथ यांमध्ये गणपती ही स्वतंत्र देवता म्हणून कोठेही निर्देशिलेली नाही. गणपतीच्या मूर्तीचे वर्णन, ‘तत्पुरुष’, ‘वक्रतुंड’ व ‘दंति’ या विशेषणांनी मैत्रायणी संहितेत आणि तैत्तिरीय अरण्यकातील ‘नारायणोपनिषद’नामक अखेरच्या विभागात आले आहे. मूर्तिपूजकांच्या गरुड, दुर्गा, स्कंद इ. देवतांचाही त्याच संदर्भात निर्देश व वर्णन आले आहे. नारायणोपनिषद, आरण्यकाचा भाग असल्यामुळे त्याचा काल इ.स.पू. सहाव्या-पाचव्या शतकांपर्यंत पोहोचतो. परंतु हे मूर्तिपूजकांच्या देवतांचे निर्देश त्यात मागाहून आले आहेत, असे वा. वि. मिराशी यांचे मत आहे. गणपत्यथर्वशीर्ष ह्य़ा उपनिषदात गणपती देवाच्या मूर्तीचे वर्णन आले आहे. परंतु हेही उपनिषद ईशादी प्राचीन उपनिषदांत इतिहासतज्ज्ञ अंतर्भूत करीत नाहीत.’’
अशी गणेशाची कुळकथा सांगत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी त्याची उत्पत्ती सांगतात –
‘‘गणपती किंवा गणेश ही विशेषणे मुळात रुद्रशिवाची असावीत.. रुद्रशिव हा देव आर्य व आर्येतर अशा वेदकालीन भिन्न संस्कृतींच्या देवघेवीत निर्माण झाला. आर्येतरांच्या विविध प्रकारच्या मूर्तिपूजा व देवता यांचा समावेश होऊन आर्य व आर्येतरांची संस्कृती एकात्म बनू लागण्याच्या काळात, इसवी सनाच्या प्रारंभीच्या शतकांमध्ये, गणपती हा देव आर्येतरांच्या इतर देवतांबरोबरच आर्यानी स्वीकारला असावा. गजाचे मुख असलेल्या या देवाच्या अगदी प्राचीन अशा मूर्ती गुप्तकालीन आहेत, तत्पूर्वीच्या नाहीत; हेही इ.स. पूर्व काळात गजानन हा देव आर्यपरंपरेत समाविष्ट झाला नव्हता, याचेच सूचक आहे. आर्येतरांची गणपती ही हनुमानाप्रमाणेच ग्रामदेवता असावी.’’