खंडित प्रक्रिया (बॅच प्रोसेस) : पॉलिस्टर तंतू निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात या प्रकारची प्रक्रिया वापरली जात होती. या प्रक्रियेमध्ये बहुवारिक वाळवून त्याचे लहान चिप्समध्ये रूपांतर केले जाते. नंतर वितळ कताई प्रक्रियेमध्ये या चिप्स पुन्हा वितळवून त्यापासून तंतू तयार केले जातात. या प्रक्रियेचा एक फायदा म्हणजे बहुवारिकीकरण व कताई करणारे कारखाने एकाच ठिकाणी असावे लागत नाहीत. बहुवारिकीकरण करणाऱ्या कारखान्यात फक्त बहुवारिकाच्या चिप्स तयार केल्या जातात. या चिप्स ज्या ठिकाणी तंतूंची निर्मिती करावयाची असते त्या कारखान्यात नेण्यात येतात. परंतु बहुवारिकाच्या वाळलेल्या फिती तोडून, त्याच्या चिप्स करण्याच्या प्रक्रियेमध्ये काही बहुवारिके तुटून, त्यांची लांबी कमी होण्याची शक्यता असते. तसेच वेगवेगळ्या वेळी येणाऱ्या चिप्सच्या दर्जामध्ये काहीशी असमानता असू शकते. आणि यामुळे तंतूचा दर्जा थोडासा खालावतो. शिवाय वितळलेले बहुवारिक आधी थंड करून गोठवणे आणि नंतर कताईच्या वेळी पुन्हा वितळवणे यासाठी जास्त ऊर्जा खर्च होते. याशिवाय चिप्सच्या वाहतुकीचा खर्चही वाढतो. परिणामी या पद्धतीने उत्पादित केलेल्या तंतूंचा उत्पादन खर्च काही प्रमाणात जास्त असतो.     
ब) सलग प्रक्रिया : या प्रक्रियेमध्ये बहुवारिकीकरणाची प्रक्रिया आणि कताई प्रक्रिया एकमेकांस जोडून असतात. बहुवारिकीकरणामध्ये तयार होणारा बहुवारिकाचा वितळलेल्या स्वरूपातील द्राव पाइपद्वारे थेट वितळ कताई यंत्रात नेण्यात येतो आणि तंतूंची कताई करण्यात येते. ही प्रक्रिया कमी खर्चाची असून या प्रक्रियेद्वारा निर्माण करण्यात येणाऱ्या तंतूंचा दर्जाही काही प्रमाणात अधिक चांगला असतो.
सन १९७० नंतर या संबंधित तंत्रज्ञानात खूपच प्रगती झाल्यामुळे एस्टरीकरण, बहुवारिकीकरण आणि कताईप्रक्रिया या सलगतेने केल्या जातात. त्यामुळे होणारे फायदे पुढीलप्रमाणे : सलग प्रक्रियेमुळे उत्पादकता वाढून उत्पादन खर्च कमी होतो, तसेच सलग प्रक्रियेमुळे गुणवत्ता सुधारते आणि सातत्यही येते. या एकत्रित प्रक्रियेमुळे गुणवत्ता नियंत्रण करणे सोपे पडते, म्हणून आज ही प्रक्रिया अधिक प्रमाणात वापरली जाते.

संस्थानांची बखर: पेप्सू
१८०९ सालच्या अमृतसर करारान्वये सीस-सतलज राज्ये, नाभा, सरहिंद, फरिदकोट आणि पतियाळा या राज्यांनी कंपनी सरकारचे संरक्षण स्वीकारले. यातील बहुतेक राज्यांवर काही काळ महाराजा रणजीतसिंगांचे वर्चस्व होते. पतियाळा, नाभा, फरिदकोट आणि जिंद ही संस्थाने शीख संस्थाने म्हणून जरी समजली जात असली तरी जिंद या राज्यात िहदू धर्मीय लोक बहुसंख्य होते. याच प्रदेशातले कपूरथळा हे संस्थान अहलुवालिया घराण्याने प्रशासित होते, पण या राज्यात मुस्लीम समाज बहुसंख्येने होता. मालेरकोटला या राज्याचे शासक होते शेरवानी अफगाण आणि या राज्यातही मुस्लीम समाजाचे आधिक्य होते. तीन शीख बहुसंख्याक संस्थाने पतियाळा, नाभा व फरिदकोट यांना ब्रिटिशांनी प्रतिष्ठेचा तोफ सलामींचा बहुमान दिला होता तर नालागढ आणि कलसिया या राज्यांना हा बहुमान नव्हता. ही सर्व राज्ये स्वतंत्र भारतात विलीन झाल्यानंतर १५ जुल १९४८ रोजी भारत सरकारने ‘पेप्सू’ हा या राज्यांचा नवीन प्रांत तयार करून वरील सर्व संस्थाने त्यांत सामील केली. पतियाळाचे महाराजा यदिवद्रसिंगांना या प्रांताच्या राज्यपालपदी नियुक्त केले गेले. पेप्सू म्हणजे ‘पतियाळा अ‍ॅण्ड ईस्ट पंजाब स्टेट्स युनियन’. पतियाळा, जिंद, नाभा, कपूरथळा, फरिदकोट, कालसिया, मालेरकोटला आणि नालागढ ही आठ संस्थाने जोडून १९४८ साली तयार केलेल्या पेप्सू प्रांताचे मुख्य ठाणे पतियाळा येथे होते. पुढे या प्रांतात सिमला, कसौली, कांदघाट, धरमपूर हे परगाणे अंतर्भूत केले गेले. ग्यानसिंग ररेवाला हे या राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि कपूरथळ्याचे महाराजा जगतजीतसिंग हे उपराज्यपालपदी नियुक्त केले गेले. पुढे १९५६ साली भारत सरकारने आपल्या भाषावार प्रांत रचनेच्या योजनेप्रमााणे पेप्सू प्रांत बरखास्त करून काही बदल करून पंजाब हा नवीन प्रांत तयार केला. पुढे जिंद आणि नामौल हे परगणे हरियाणा प्रांतात तर सोलन, नालागढ हे हिमाचल प्रदेशात समाविष्ट झाले. १९५६ सालच्या नूतन पंजाब विधानसभेतील १८६ सदस्यांपकी ६० सदस्य भूतपूर्व पेप्सूचे आणि १२६ सदस्य पंजाबचे होते.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com