खारट चव म्हटली की आपल्याला प्रथम आठवतं ते मीठ. एखाद्या दिवशी जर भाजीत मीठ घालायचं राहिलं तर ती भाजी कशी लागेल? चवीनं खारट असलेल्या या मिठामुळेच तर पदार्थाची लज्जत वाढते.
सोडिअम आणि क्लोरिन ही मिठातील महत्त्वाची मूलद्रव्ये. जेव्हा मीठ आपल्या जिभेच्या पृष्ठभागावर विरघळते तेव्हा सोडिअम आणि क्लोरिन ही मूलद्रव्ये वेगळी होतात. सोडिअमचं धन प्रभारित आयन आणि क्लोरिनचं ऋण प्रभारित आयन असं विभाजन होतं. आपल्या जिभेच्या शेंडय़ापासून मागे डाव्या आणि उजव्या बाजूला असलेल्या दांडय़ाच्या आकाराच्या रुचिकलिकांवर छिद्रं असतात. सोडिअमचे आयन रुचिकलिकांवरील छिद्रांमधून अगदी लहान अशा रसांकुरांपर्यंत पोचतात. रसांकुर चेतापेशींकडे संदेश देतात. चेतापेशी हा संदेश मेंदूकडे पोहोचवतात आणि आपल्याला खारट चवीची जाणीव होते. मिठातील सोडिअम तसेच पोटॅशिअम ही मूलद्रव्यं खारट चव निर्माण करतात.
आपण पदार्थ तोंडात घातला की सर्वप्रथम विरघळणारे पदार्थाचे रेणू चवीची जाणीव निर्माण करतात. पदार्थ चावायला लागल्यावर नवनवीन स्वादाचे रेणू लाळेमध्ये जमा होतात. लाळेतील विकर प्रथिनांशी रासायनिक क्रिया करू लागतात आणि आणखी नवे स्वादाचे रेणू तयार होतात व वेगवेगळ्या चवींची जाणीव होते. उदा. सॉसमध्ये बुडवून मटारची उसळ भरलेला पॅटिस तोंडात घातला तर सॉस द्रवपदार्थ असल्याने सर्वप्रथम चव लागते ती सॉसची. मग जसजसा आपण सामोसा चावतो, तसतशी ती चव बाहेरच्या आवरणाची किंवा मटारची किंवा उसळीतल्या मसाल्याची न राहता एक एकत्रित परिणाम तयार होतो आणि वेगळी चव लागते. फक्त गोड, आंबट, कडू, खारट असा पदार्थ आपण कधीच खात नाही. या सर्व चवींचे एकत्रीकरण होऊन पदार्थाला विशिष्ट चव प्राप्त होते.
पदार्थाची चव त्यातील रासायनिक घटकांबरोबरच रुचिकलिकांच्या क्षमतेवर अवलंबून असते. रुचिकलिकांची क्षमता माणसाच्या वयावर, त्याला झालेल्या रोगांवरही अवलंबून असते. लहान मुलांमध्ये मोठय़ा माणसांपेक्षा जास्त रुचिकलिका असतात. मधुमेहाने अनेक वष्रे पीडित असलेल्या रुग्णांमध्ये कधी कधी रुचिकलिकांची क्षमता कमी झाल्याने पदार्थाची चव त्यांना नीट लवकर समजत नाही असे आढळून आले आहे. अखेर शेवटी चव ही व्यक्तिसापेक्ष आहे हेच खरं!

मनमोराचा पिसारा: युंग आणि वेदान्त
‘द युंगियन मिथ अ‍ॅण्ड अद्वैत वेदान्त’ हे पुस्तक वाचायला वर्ष लागलं. हळूहळू चघळीत, विचार करीत, चिंतन करीत वाचणं सोपं नव्हतं. नेटानं करावं लागलं. पुस्तक वाचून झालेलं असलं तरी यातील म्हणजे चिंतन- मनन थांबलेलं नाही. कदाचित ते तहहयात सुरू राहील. पुस्तक वाचायला कठीण गेलं असं नाही, कारण त्यातल्या दोन प्रमुख विचारधारा परिचित होत्या. म्हणजे गंगा आणि यमुना यांचे प्रवाह वेगवेगळे, त्यांचा रंगही वेगळा. त्यांच्या संगमानंतर काही काळ त्यांच्या भिन्नतेची जाणीव राहाते, परंतु पुढे पाण्यात पाणी मिसळलं की, या थेंबात गंगा किती, यमुना किती याचा थांग लागत नाही.
प्रस्तुत लेखकाने हा प्रयत्न केलेला आहे आणि त्यात ती यशस्वी झाली आहे. लेखक कॅरल व्हिटफिल्ड या संशोधकाचा डॉक्टरेटचा प्रबंध असून त्याचं ‘द युंगियन मिथ अ‍ॅण्ड अद्वैत वेदान्त’ असं नाव आहे.
मानसशास्त्रात विशेष करून मनोविश्लेषण पद्धतीमध्ये कार्ल गुस्टाफ युंग हा फ्राइडचा समकालीन आणि सहाध्यायी. युंगने फ्रॉइडच्या मनोविश्लेषण सिद्धान्तात अधिक सखोल चिंतन केलं. पण पुढे त्या दोघांची फारकत झाली. कारण युंगने मनाच्या अबोध पातळीवरील मानसाचे दोन परस्परांमध्ये गुंतलेले विभाग केले. युंगनं असं म्हटलं की, मानवी मनाच्या अबोध पातळीवर व्यक्तिगत अबोध असतो (फ्रॉइड). बालपणातल्या अद्भुत आठवणींच्या खुणा, स्मृती, प्रेरणा आणि ओढ त्यात सामावलेल्या असतात. अबोध मनाची संरचना व्यक्तिगत अनुभवातून होते, तर युंग यांनी समूह अबोध म्हणजे कलेक्टिव अनकॉन्शस अशी संकल्पना मांडली. या समूह अबोधामध्ये केवळ व्यक्तिगत नव्हे, तर (मानवी) वांशिक जाणिवा, अनुभव, भय, प्रेरणादेखील समाविष्ट असतात. वर्षांनुवर्षे मानवी वंशाने घेतलेल्या अनुभवांचे संचित, भय, प्रेरणा विरून जात नाहीत, तर त्या एका पिढीकडून पुढील पिढीकडे संक्रमित होतात.
या प्रेरणा आदिम म्हणजे गेल्या दोन-पाच हजार वर्षांतल्या आधुनिक काळातल्या आठवणींपलीकडच्याही स्मृती घेऊन मानवी बाळ जन्माला येते. म्हणजे मुळातच मुलाची मनाची पोटी कोरी नसते, त्यावर अंधूक स्वरूपात काही मजकूर असतो.
युंग यांनी असंही म्हटलं की, या स्मृती शब्दरूपात नसून चित्र, खुणा, दृश्य प्रतिमा, प्रतीकं अशा शब्दांतील स्वरूपात असतात. यात काही धूसर संकल्पनाही असतात. काही प्रतीकात्मक, सांकेतिक कहाण्या, दंतकथा असतात. त्या कहाणी स्वरूप (चित्र) संकल्पना म्हणजे युंगियन मिथ. मिथ्यकथा, मिथकं! बहुधा या मिथ्यकथा वैभवशाली अथवा पराक्रमी शूरत्वाच्या संकल्पना असतात. ‘देव’ म्हणजे दैवत्व आणि विविध स्वरूपांतील दैवत्व या केवळ चित्रं/प्रतीकं नसून त्या ‘देवांचे’ गुणवर्णनात्मक असतात. युंगने पुढे संशोधन, विचार करून अबोध पातळीवर या समूह प्रबोधनाचे रूपांतर वास्तवात दिसणाऱ्या अनेक चित्रं, शिल्पं, प्रतीकात्मक आकृती (लोगो डिझाइन), आकृतिबंधात आढळते असा सिद्धान्त मांडला. या खाणाखुणांच्या आधारे मानवी मनाचा शोध घेता येतो असं म्हटलं. युंगने वेदान्ताचा प्रत्यक्ष अभ्यास केलेला नसला तरी भारतीय विचार आणि दृश्य परंपरेतील मिथकं आणि आकृतिबंध यांचा अभ्यास केलेला होता. ‘मंडलाकृती’मधली वर्तुळात्मकता त्याला भावली.
वेदान्तामधील देव संकल्पना म्हणजे वेदान्तामधील ‘मनस्’चा अभ्यास. ‘अद्वैत’त्व म्हणजे केवळ चैतन्य आणि रूपबंध यांचे एकत्व नसून ‘मनस’ ही मूळ संकल्पनाच अद्वैतवादी आहे, तर मनाचे बोध-अबोध असे द्विभाजन द्वैतवादी आहे. मी-अहं (स्वची जाणीव) आणि कर्ताकरविता बोधमानस असे द्वंद्व नसून ‘मनस’ एकच असते. मनसची पूर्ण जाणीव म्हणजे स्वत:मधील चैतन्याची अखंड, संपूर्ण जाणीव. (प्रगल्भ बोध) अशी वैचारिक व्यूहरचना आढळते. युंगप्रणीत सिद्धान्ताचे उपयोजन केल्यास या प्रगल्भ बोधाच्या जाणिवेत ‘देव/दैवत्व’ स्वरूपाची मिथकं गळून पडतात असं म्हणता येईल. शिवाय मनाची पाटी स्वच्छ, नितळ होते, फक्त चैतन्याची जाणीव राहते.
‘आमच्या वेदांत सगळं आहे’ असा अभिनिवेश न बाळगता पुस्तक वाचावं. चांगल्या अभ्यासकांसाठी यात मोठं आवाहन आहे.
डॉ. राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com

Mongoose attack on lions animal fight wildlife video viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! मुंगूसानं दिली सिंहांना टक्कर; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
Viral video: Man vomits live worm after complaining of abdominal pain
VIDEO: पोटात दुखतेय म्हणून खाल्लं किडे मारायचं औषध; दुसऱ्या दिवशी व्यक्तीच्या पोटातून बाहेर आली धक्कादायक गोष्ट
What do you do when someone is choking in front of you
तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय
Bhandara Special Aloo Tamatar Rasa Bhaji Recipe
भंडाऱ्यातली बटाटा भाजी चवीला एकदम स्पेशल.. भंडारा स्पेशल भाजीची घ्या झणझणीत रेसिपी

प्रबोधन पर्व: निकषांची बहुविधता ध्यानात घेतली की घाबरायला होत नाही
‘‘सर्व तऱ्हेच्या संगीताला समाजामध्ये एक विशिष्ट जागा असते. आणि या सर्व संगीतांची एकमेकांशी काही स्पर्धा नसते. प्रत्येकजण आपापल्या जागी काम करायला मोकळा असतो; आणि त्या त्या ठिकाणी ते चांगलं किंवा वाईट असं बघता येत असतं. याच्यापेक्षा ते चागंलं, याच्यापेक्षा ते वाईट असं म्हणायला लागलात, की मग पंचाईत होते, आणि ही तुलना करण्याचा मोह होतो आपल्याला. त्याला कारण असं, की एकंदरीने बहुतेकांचा संगीत विचार हा फक्त कलासंगीताच्या बाबतीतच झालेला दिसतो. आणि त्याचेच निकष घेऊन सगळीकडे वावरायचं असा प्रकार चालू असतो.. निकषांची बहुविधता ही ध्यानात घेतली की मग कळतं, की पॉप संगीतानं अमक्या संगीताला धोका आहे, असं म्हणणं काही खरं नाही. आणि समाजाचे एकंदरीत सांस्कृतिक दोल असतात. कधी समाज इकडे झुकतो, कधी तिकडे झुकतो. आपण काय करतो, आपल्या समोरची जी १०-१२ र्वष असतात, जी जमेला धरून विधान करायला सुरुवात करतो. संस्कृतीच्या एकंदरीत जीवनमानामध्ये ५-१० वर्षांच्या कालखंडाला असा कितीसा अर्थ असणार?’’
अशोक दा. रानडे नवनवीन बदलांचा संगीतावर काय परिणाम होतो (मुलाखत-अभिधा, जून १९९८) याविषयी म्हणतात – ‘‘.. म्हणजे समजा, गेल्या पाच वर्षांत एकच कुठलं संगीत समोर आलं, असं आपण म्हटलं तर संस्कृतीच्या  दृष्टीने ते काहीच नाही. आलं काय आणि गेलं काय. आपणच घाबरून जातो. कारण आपल्यासमोरचा कालखंड फार सीमित असतो. आणि म्हणून ज्याला संस्कृतीचा हा प्रवाह ध्यानात येतो, त्याच्या दृष्टीने या सगळ्या गोष्टी घडतच असतात. त्या घडणारच आणि त्या घडायला हव्यातही. कारण त्यामुळे असं दिसतं, की समाजाचे सर्व घटक जिवंत आहेत आणि आपापल्या परीने प्रयत्न करत असतात.. याचा अर्थ, आपण असं म्हणत नाही आहोत, की सगळ्या गोष्टी चांगल्याच असतात. आपण असं म्हणतोय, की सगळ्या गोष्टी घडणं हे स्वाभाविक असतं मग त्याच्यात चांगले-वाईट निकष लागणं वेगळं, पण ते बहुविध लागतात. ’’