समुद्रात अमाप पाणी असते, पण त्यात विरघळलेल्या क्षारांमुळे ते शेतीत वापरता येत नाही. परंतु मानवाच्या दृष्टीने उपयुक्त असणाऱ्या अनेक वनस्पती समुद्राच्या पाण्याच्या क्षारतेइतकी क्षारता सहन करू शकतात. या वनस्पतींमध्ये नारळ, कॅज्युआरीना, भेंडी (लाकडासाठी लावला जाणारा एक वृक्ष), पिलू (अखाद्य तेलाचा एक स्रोत) आणि खारदलदलीत (मॅन्ग्रोव्ह) वाढणाऱ्या वनस्पती यांचा समावेश होतो. पण या वनस्पती शेतात लावून जर त्यांच्या सिंचनासाठी नियमितपणे समुद्राचे पाणी वापरले तर त्या मरतात, कारण सिंचनानंतर बाष्पीभवनाने जमिनीतले पाणी उडून गेल्यावर मागे उरलेल्या क्षारांची तीव्रता इतकी वाढते की ती वनस्पतींना मारक ठरते. वरील वनस्पतींचे समुद्राच्या पाण्यावर उत्पादन करण्याची एक नवीन पद्धती आमच्या संस्थेने विकसित केली. या पद्धतीत वाळूने भरलेल्या चरांचा वापर केला जातो. हे चर समुद्राच्या पातळीपेक्षा वरच्या पातळीकडून समुद्रापर्यंत येतील अशा तऱ्हेने खणून त्यात वाळू भरली जाते. या वाळूत वर उल्लेखलेल्या वनस्पती लावून त्यांना केवळ समुद्राचे पाणीच दिले जाते, पण ते इतक्या प्रमाणात की ते चरातून वाहात वाहात पुन्हा समुद्रात जाईल इतके. यामुळे पाण्याच्या दोन पाळ्यांदरम्यान बाष्पीभवनाने क्षारता वाढलेले पाणी धुऊन निघते आणि समुद्राचे ताजे पाणी त्याची जागा घेते. समुद्राच्या पाण्याइतकी क्षारता सहन करण्याची क्षमता या यादीतल्या वनस्पतींमध्ये असते. याच प्रयोगात आम्ही चाकवत आणि पालक या पालेभाज्याही लावल्या होत्या. त्यांची पाने इतकी खारट झाली की त्यांची भाजी खाणे अशक्य होते. ही पाने वाळवून जर त्यांचे पीठ केले तर ते आपण मिठाऐवजी आपल्या स्वयंपाकात वापरू शकतो. अशा प्रकारच्या मिठात केवळ समुद्राच्या पाण्यातले क्षारच नव्हेत तर शिवाय पानांमधील जीवनसत्वे, प्रथिने, लोह, फॉस्फरस, आणि अन्य खनिजेही असल्याने हे मीठ साध्या मिठापेक्षा अधिक पोषक असते. समुद्र जवळ आहे पण पाऊसमान कमी अशा ठिकाणी, म्हणजे तामिळनाडूचा किनारा किंवा सौराष्ट्र, अशा ठिकाणी हा प्रयोग जरूर करून पहावा.आनंद कर्वे (पुणे), मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org आजचे महाराष्ट्रसारस्वत : ७ फेब्रुवारी१२७४ > महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधरस्वामी यांचे देहावसान. लोकभाषेत, म्हणजे त्या काळच्या मराठीत ज्ञान देण्यावर त्यांचा भर होता. त्यांची जीवनदृष्टी अगदी साध्या दृष्टान्तकथांतून उलगडणारे ‘लीळाचरित्र’ केशिराजबास व अन्य शिष्यांनी पुढे लिहिले. स्त्रीपुरुष समानतेसारख्या विषयांची चर्चा त्या काळात चक्रधरस्वामींनी सुरू केली होती, असे या ग्रंथातून दिसते. १८८४ > विष्णुभट गोडसे ऊर्फ ‘गोडसे भटजी’ यांनी ‘माझा प्रवास’ हा ग्रंथ लिहून पुरा केला. हा मराठीतील पहिला प्रवासवर्णन ग्रंथ मानला जातोच, परंतु १८५७ चे स्वातंत्र्यसमर व नंतरच्या वातावरणाची प्रत्यक्ष वर्णने त्यात असल्याने, बखरींपेक्षा निराळय़ा इतिहासलेखन शैलीचीही मराठीतील सुरुवात याच ग्रंथाने केली, असे मानले जाते. ‘माझा प्रवास’च्या आवृत्या आजही प्रिय आहेत आणि नुकतेच या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतरही झाले आहे. १९४७ > पत्रकार, चरित्रकार वासुदेव दामोदर मुंडले यांचे निधन ‘काव्हूर ऊर्फ इटलीचा रामदास’, ‘नेपोलियन बोनापार्ट’ , ‘प्रिन्स बिस्मार्क’ यांची भारतीयांना प्रेरक ठरणारी चरित्रे त्यांनी लिहिली होती. स्वा. सावरकरांचे ते समकालीन होते.संजय वझरेकर वॉर अँड पीस : गोवर, कांजिण्याम्हटले तर गोवर कांजिण्या हे विकार क्षुद्र विकार; साथीचे व हवेतील आकस्मिक फेरबदलांमुळे होणारे हे विकार आहेत. पण ज्यांना हे विकार होतात ती मुले अजाण, लहान असतात. त्यांचे आईवडील मुलांच्या काळजीने उगाचच घाबरून गेलेले असतात. त्यामुळेच या विकाराला निष्कारण महत्त्व देऊन हा विकार लांबविला जातो. योग्य व वेळेवर केलेले लहानसे उपचार हा विकार पुन:पुन्हा उद्भवू देत नाही. एके काळी देवी, गोवर, कांजिण्या या विकाराकरिता अंधश्रद्धेमुळे खेडोपाडी नाना दैवी उपचार करीत असत, आजही गोवर, कांजिण्यांकरिता खेडय़ात व काही अंशी शहरात दैवी उपाय चालू असतात. गोवर कांजिण्याची साथ असणे या प्रमुख कारणाव्यतिरिक्त खूप कडक उन्हाळा, लहान बालकांचा शाळेतील वा राहत्या वस्तीतील एकत्र संपर्क सहवास, ताप असताना सौम्य औषधाऐवजी चुकीची व तीव्र औषधे देणे यामुळे गोवर कांजिण्यासारखे विकार होतात, वाढतात, पसरतात. गोवर हा तुलनेने तीव्र विकार पण योग्य विश्रांती घेतली, पथ्यपाणी पाळले तर चार पाच दिवसात आटोक्यात येतो. या रोगात ताप तीव्र असू शकतो, सौम्यही असतो. अंगावर, डोक्यात केसाच्या छिद्राइतके बारीक पुरळ उठते, त्यापूर्वी मसुराच्या डाळीऐवढे डाग टाळूवर, गालावर, ओठाच्या आतील बाजूस येतात. मूल म्लान दिसते. या पुरळात लस नसते. डाग रहात नाहीत. कांजिण्या विकारात प्रथम पुटकुळ्या, पुरळ व नंतर ताप या क्रमाने सुरुवात होते. या पुटकुळ्या प्रथम छातीवर व बाकी अंगावर येतात. कांजिण्या मोठय़ा संख्येने येतात. परिपाठादि काढा सर्वत्र वापरात असणारे हुकमी औषध; गोवर कांजिण्याकरिता सर्वच चिकित्सक देतात. गोवर कांजिण्याकरिता गुलाबाची फुले, मनुका, बाहवा मगज, धने असा काढा किंवा गुलाबद्राक्षासव द्यावे. लहान मुलांना पूर्ण विश्रांती द्यावी. शक्यतो वेगळ्या खोलीत झोपवावे. तापावर लक्ष ठेवावे. गरज पडल्यास प्रवाळ भस्म द्यावे.वैद्य प. य. वैद्य खडीवाले जे देखे रवी.. : जनुकांचा नकाशा..मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होतो तेव्हा तिसऱ्या वर्षांत रुग्णांना तपासण्याची सुरुवात होई त्यात रुग्णांची परिपूर्ण चौकशी केली जात असे. काय होते आहे, कसे आणि कधी सुरू झाले, दुखत असेल तर कशा प्रकारचे दुखते, कळ येते, ठणका मारतो, की सतत मंद दुखतच असते? त्यात कौटुंबिक चौकशी असा एक भाग असे. भाऊ-बहिणी किती, आई-वडिलांना काही आजार आहेत का किंवा कशामुळे वारले, असे प्रश्न विचारायची पद्धत होती, पण शिक्षकांसमोर रुग्णाचा अहवाल वाचून दाखवताना कौटुंबिक चौकशीच्या माहितीत फारसे काही आढळले नाही असाच सारांश निघत असे. हा काळ १९५६-५७ चा, गरीब आणि अशिक्षित रुग्णांच्या सार्वजनिक रुग्णालयांमधला. घरात ढीगभर माणसे. कोण कसा गेला याची काय नोंद ठेवणार? साक्षरता वाढली, कुटुंबे मर्यादित झाली. आजारपणासाठीची चिकित्सा वाढली तसे तसे आपल्या आई-वडिलांना काय झाले होते, आपले आजी-आजोबा कशाने गेले, ही माहिती मिळू तर लागलीच, परंतु पुढारलेल्या देशात प्रत्येक रुग्णाचे जे दस्तऐवज ठेवले जात त्यातल्या माहितीची संगणकांमार्फत छाननीसुद्धा होऊ लागली.आपण आपल्या आई-वडिलांचे मूल असतो तेव्हा त्यांची शरीरयष्टी आपणास मिळते. त्याबरोबरच आपली बलस्थाने आणि आपल्यातला नैसर्गिक उणिवाही आपण या जगात घेऊन येतो याची पुसटशी कल्पना माणसाला होती, पण या नव्या प्रकाराच्या प्रदीर्घ आणि प्रचंड छाननीनंतर रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, स्तनाचा कर्करोग, प्रोस्टेट ग्रंथीचे विकार, दमा, संधिवात, मणक्याची वा इतर सांध्यांची झीज असल्या अनेक व्याधींचे आगमन जनुकांवर ठरते ते सिद्ध झाले. या जनुकांचा नकाशा काही वर्षांपूर्वी काढण्यात आला. जनुकातल्या अणूरेणूंची चित्रे अप्रत्यक्षपणे काढण्यात आली. अप्रत्यक्षपणे म्हणण्याचे कारण असे की, हे अणूरेणू आपल्याला दिसत नाहीत, परंतु त्यांच्यावर काही खास किरण टाकून त्यांच्या सावल्या कशा पडतात यावर हे अंदाज बांधण्यात आले. ज्याच्या आई आणि वडिलांना दोघांना मधुमेह आणि रक्तदाब असेल तर त्याने किंवा तिने समजूतदारपणे आपली राहणी आणि खाणे यावर मर्यादा आपणहून घालाव्यात, नाही तर विधात्याने लिहून ठेवलेले (!) किंवा जनुकांवर अवलंबून असलेले घडेल हे स्पष्ट होत गेले. मूलत: प्रथिनांची बनलेली Carbohydrates चा आहार घेणारी ही जनुके आपल्या शरीररचनेची, शरीरक्रियांची त्यातल्या विकृतींची जनक असतात हे सिद्ध झाले, परंतु ही जनुके स्थिर असतात की काळाच्या ओघात अस्थिर होऊन नवीन अवतार धारण करतात या प्रश्नाचे उत्तर ती बदलतात, उत्क्रांत होतात आणि या उत्क्रांतीतच सजीवांमधील वैविध्य साकार होते हेही आता नक्की ठरले आहे.रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com