मध हा अतिप्राचीन काळापासून परिचित असलेला एक नसíगक पदार्थ. मात्र त्याची व्यापारी पद्धतीने विक्री सुरू झाल्यापासून त्यात भेसळ करण्याची वृत्तीही वाढीला लागली. मग सामान्यांना प्रश्न पडू लागला; शुद्ध मध ओळखायचा कसा? अन्य क्षेत्रांतील व्यक्तींनी ढोबळमानाने शुद्धतेचे निकष सांगितले आहेत; परंतु शुद्धता ओळखण्यासाठी प्रयोग शाळेतील तपासणीच आवश्यक ठरते. त्यासाठीची भारतीय मानक संस्थेने व अॅगमार्कने ठरवून दिलेली मानकेच प्रमाणित व अधिकृत आहेत. मधाच्या व्याख्येनुसार, मध म्हणजे मधसंकलक मधमाश्यांच्या आतडय़ातील व लालोत्पादक ग्रंथीतील स्रावात असणाऱ्या वितंचकांची रासायनिक प्रक्रिया फुलांमधील पुष्परसावर झाल्यानंतर निर्माण होणारा मधुर पदार्थ होय. कामकरी मधमाशी तिच्या पोकळ नळीसारख्या जिभेने फुलांतील पुष्परस शोषून घेते. तो मधमाशीच्या अन्ननलिकेच्या ‘मधसाठवण’ पिशवीत काही काळ साठविला जातो. पुष्परसात संयुक्त शर्करा व काही प्रमाणात फलशर्करा व द्राक्षशर्करा असतात. पाण्याचंही प्रमाण प्रारंभी ८० टक्के असतं. या पुष्परसाचं रूपांतर मधात होण्यासाठी इन्व्हर्टेज, डायास्टेज, ग्लुकोज ऑक्सिडेज कॅटालेज’ अशा विविध वितंचकांची पाचक प्रक्रिया व्हावी लागते. सुक्रोजसारख्या इन्व्हर्टेजची प्रक्रिया त्यातील इक्षुशर्करेवर (सुक्रोज) त्याचप्रमाणे संयुक्त शर्करेवर होऊन शेवटी ग्लुकोज साखर (द्राक्षशर्करा) तयार होते. या घटकांचं मधातील प्रमाण पुढीलप्रमाणे असतं : फलशर्करा- ४० टक्के, द्राक्षशर्करा - ३५ टक्के, सुक्रोज - ४ टक्के, पाणी - २० टक्के, खनिजे, प्रथिने, जीवनसत्त्वे, आम्ले, रंगकण, गंध - एकूण १ टक्का. मधाची शुद्धता तपासून पाहण्यासाठी, मध परीक्षण संसाधनांचा एक संच बनविण्यात आला आहे. सामान्य उपभोक्ता व मधनिर्माता- मधपाळही त्याचा वापर सहज करू शकतो. या प्राथमिक तपासणीनंतर नमुना प्रयोग शाळेत पाठवावा लागतो. शुद्ध मधात द्राक्षशर्करेचे फलशर्करेशी असलेलं गुणोत्तर १:१ किंवा १:३ पर्यंत असतं. द्राक्षशर्करा अधिक असल्यास काही काळाने मधातील साखरेचे घट्ट कण बनतात. पण तो शुद्ध असतो. उन्हात व पाण्याच्या भांडय़ात मधाची बाटली ६०० से. पर्यंत थोडा वेळ गरम केल्यास ते कण पुन्हा विरघळतात. मधातील परागणांमुळे व रंगकणांमुळे मधाला रंग येतो. प्रवाहीपणाही साखरेमुळे व पाण्यामुळे येतो. - क. कृ. क्षीरसागर मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org रामायण गाती.. ‘विद्यापीठ’ होती.. विश्वनाथ सत्यनारायण हे ‘रामायण कल्पवृक्षमु’ या १९७० च्या ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त तेलुगु महाकाव्याची रचना (१९३३ ते १९६१)करीत होते, त्याचवेळी तिकडे कन्नडमध्ये १९६७ चे ज्ञानपीठ-मानकरी कु. वें. पुट्टप्पा तथा ‘कुवेंपु’ हे ‘श्रीरामायणदर्शनम्-’ हे महाछंदातील महाकाव्य (रचनाकाळ १९३९ ते ४५)रचत होते. ग. दि. माडगूळकरांचे ‘गीतरामायण’ १९५५-५६ या काळातील आहे. या निमित्ताने, कुवेंपु यांच्या लोकप्रियतेबद्दल हे थोडे विषयांतर.. कर्नाटकातील प्राथमिक, माध्यमिक पाठय़पुस्तकात कुवेंपुंच्या कविता मोठय़ा संख्येने असतात. म्हैसूर या कर्नाटकाच्या सांस्कृतिक राजधानीत ‘कुवेंपुनगर’ असा एक परिसरच वसवला गेला आहे. येथील रस्त्यांना कुवेंपु यांचे प्रमुख ग्रंथ, त्यांचे घर यांची नावे देण्यात आली आहेत! लेखकाविषयी- ‘कुवेंपुं’विषयी वाटणारा हा भक्तिभाव आहे. त्यांचा बहुमान आहे. कुवेंपु म्हणतात, ‘‘रामायण हे फक्त वाल्मीकीनेच लिहिले, हे म्हणणे बरोबर नाही. रामायण लिहिणारे कित्येक कवी आहेत, एवढेच नाही तर प्रत्येक खेडय़ात रामायण लिहिणारे कवी आहेत.’’ शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे असेल, त्यांनी शिक्षणाविषयी आपले विचार मांडले आहेत. ते म्हणतात- ‘‘विद्या हे सामान्य माणसाला पशुत्वापासून देवत्वाकडे नेणारे एक साधन आहे, मार्ग आहे. मानवाच्या उद्धारासाठी लौकिक विद्या आणि आध्यात्मिक विद्या सारख्याच महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे शिक्षणात दोन्हींचा समावेश करणे अगत्याचे आहे. साहित्याविषयी त्यांच्या मनात आदराची भावना होती. ते म्हणत, ‘‘पोटापाण्यासाठी हवा तर विज्ञान, इतिहास, तत्त्वज्ञान किंवा कुठलाही विषय निवडा, पण भाव-संस्कारासाठी साहित्याचे वाचन-मनन आवश्यक आहे.’’ ‘कुवेंपुं’नी मातृभाषेतून शिक्षण देण्याचा आग्रह धरला, पण काही प्रमाणात इंग्रजी पाहिजेच, असे त्यांचे मत होते. कर्नाटकात राहणाऱ्याला कन्नड भाषा आली पाहिजे, असा आग्रह धरतानाच ते सांगत- ‘‘कन्नडव्यतिरिक्त फक्त इंग्रजी शिकण्यापेक्षा आणखी एक भारतीय भाषा शिका, पाश्चात्त्य भाषा शिका.’’ कन्नड साहित्य सर्वागांनी समृद्ध करणाऱ्या कुवेंपुटप्पा या भारतीय लेखकाला कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्य़ात ‘कुवेंपु विद्यापीठ’ स्थापन करून सन्मानित करण्यात आले आहे. हे विद्यापीठ आजही कार्यरत आहे. - मंगला गोखले mangalagokhale22@gmail.com