युरोपच्या पश्चिमेकडचे टोक असलेल्या, अटलांटिक समुद्राकडे तोंड करून बसलेल्या पोर्तुगाल या लहान देशाची राजधानी लिस्बन. सात टेकडय़ांवर वसलेल्या लिस्बनने अनेक वेळा भूकंपाचे मोठे धक्के पचवलेत. या शहराच्या तोंडावळ्यावर विविध संस्कृतींचा प्रभाव जाणवतो. फोनेशियन जमातीच्या लोकांनी ३००० वर्षांपूर्वी येथे प्रथम वस्ती करून या ठिकाणाला नाव दिले ‘अलीस अब्बो’. येथील सुपीक, सुंदर प्रदेश पाहून भुरळ पडलेल्या ग्रीक, काथ्रेजीयन आणि नंतर इ.स.पूर्व २०५ मध्ये रोमन लोकांनी इथे वस्ती केली. पाचव्या शतकात रोमन साम्राज्याच्या अस्तानंतर दोन शतके या प्रदेशात रानटी टोळ्यांचे वास्तव्य होते. ७१४ साली हा भाग उत्तर आफ्रिकेतल्या मूर इस्लामिक लोकांनी घेऊन त्याला नाव दिले लिसाबोना. ख्रिश्चन समाजाच्या लोकांनी हा प्रदेश घ्यायचा प्रयत्न केला, पण चारशे वष्रे लिसाबोनावर मूर लोकांचेच राज्य राहिले. पुढे ११४७ साली चार महिने वेढा देऊन डोम अफोन्सो हेन्रीक याने ही वस्ती ताब्यात घेतली. पुढे अफोन्सो तृतीयने या प्रदेशातील बंदराची उपयुक्तता ध्यानात घेऊन लिसाबोनातच राजधानी केली. वास्को दि गामाने िहदुस्तानाकडे जाण्याचा सागरी मार्ग शोधून काढल्यावर पंधराव्या- सोळाव्या शतकात मसाल्याच्या पदार्थाच्या व्यापाराच्या जोरावर लिस्बनची भरभराट होऊन तेथे एक समर्थ साम्राज्य उभे राहिले. सतराव्या शतकाच्या अखेरीस लिस्बनची वसाहत ब्राझीलमध्ये सोन्याचे साठे सापडले आणि मग लिस्बनचे व्यापारी त्या सोन्याच्या व्यापारावर तुटून पडले. पुढील २५ वष्रे सोने, रेशीम, मसाले यांच्या व्यापाराने संपन्न झालेल्या लिस्बन शहरात मोठमोठे प्रासाद उभे राहून ते युरोपातील सर्वाधिक श्रीमंत शहर बनले. ब्राझील वसाहतीतून मिळणाऱ्या सोन्याच्या किमतीचा पाचवा हिस्सा लिस्बन सरकारच्या तिजोरीत कराच्या रूपाने भरावा लागे. इ.स. १७०० ते १८०० या शंभर वर्षांत १ हजार टन सोने ब्राझील वसाहतीतून काढले गेले. याच काळात ब्राझीलमध्ये हिऱ्याच्या खाणी मिळाल्या. लिस्बनच्या अनेक धाडसी तरुणांनी तिकडे स्थलांतर करून सोने, हिऱ्याच्या व्यापारावर अमाप पसा कमावला. - सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com पर्ण प्रथिन पर्ण-प्रथिनांस पर्णसत्त्व असेही म्हणतात. वनस्पतिशास्त्रामधील हे एक मौलिक संशोधन आहे. काही चारा-पिकांमध्ये प्रथिनांचे प्रमाण ३० टक्क्यांच्या आसपास असते. काही अपवाद वगळता एवढे प्रथिन जनावरांसाठी उपयुक्त नसते म्हणूनच त्यातील काही प्रथिन मूळ अवस्थेतच पानामधून काढून त्याचा वापर आपल्या आहारात केला तर प्रथिन कमतरतेची समस्या दूर होऊ शकते. गरीब राष्ट्रांमध्ये प्रथिन कमतरतेमुळे होणारे कुपोषण इंग्लंडमधील शास्त्रज्ञ डॉ. पिरी यांना कायम अस्वस्थ करत असे. पर्ण-प्रथिन हा त्यावर एक उपाय आहे. या एका ध्येयापोटी त्यांनी १९६५ मध्ये या कल्पनेला फक्त जन्मच दिला नाही तर त्यासाठी लागणारी यंत्रसामग्रीही निर्माण केली आणि अनेक गरीब राष्ट्रांमध्ये हे तंत्रज्ञान पोहोचवले. पर्ण-प्रथिन मिळवण्याची प्रक्रिया सोपी आहे. यांत्रिक पद्धतीने पानांचा लगदा करून विशिष्ट दाबाखाली त्यातील रस काढला जातो. उकळत्या पाण्यात हा रस हळूहळू टाकताना तापमान ८०० से.ला स्थिर ठेवून पृष्ठभागावरील हरित साका गोळा केला जातो. हेच पर्ण-प्रथिन होय. गाळणीच्या साहाय्याने त्याला वेगळे करून सुकवले जाते. उरलेले राखाडी रंगाचे द्रावण नत्रखत म्हणून पिकासाठी वापरतात. पर्ण-प्रथिनांच्या लहान गोळ्या हे कुक्कुटपालनासाठी उत्तम खाद्य आहे. त्यामुळे अंडय़ाच्या आकारात आणि आहारमूल्यांमध्ये वाढ होते. हिरवा रंग व विशिष्ट वास यामुळे हे प्रथिन मानवी आहारात सहज स्वीकारले जात नाही. मात्र काही विकरांचा वापर करून त्यांचा रंग आणि स्वाद बदलू शकतो. पर्ण-प्रथिनांच्या आहार-मूल्यांवर केंद्रीय खाद्य-तंत्रज्ञान आणि संशोधन संस्था म्हैसूर येथे उत्कृष्ट संशोधन झाले आहे. पर्ण-प्रथिने काढल्यानंतर उरलेल्या चोथ्यापासून आंबवलेले पशुखाद्य तयार करता येते. यास मुरघास म्हणतात. हा मुरघास दुभत्या जनावरास दिल्यावर दुधाचे प्रमाण आणि स्निग्धता यामध्ये वाढ होते. शहरामधील घाऊक भाजी मंडईमधील नाशवंत भाजीपाला डम्प्िंाग ग्राऊंडवर कुजून मिथेनची निर्मिती करतो. औरंगाबादच्या विद्यापीठातील प्रा. जोशी यांनी विकसित केलेली भारतीय बनावटीची यंत्रसामग्री मोठय़ा भाजीमंडई परिसरात बसवली तर पर्ण-प्रथिने मिळतीलच शिवाय शहरातील ओल्या कचऱ्याचे ओझेही कमी होईल. - डॉ. नागेश टेकाळे मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org