गाई-म्हशींसाठी वैरण जास्त प्रमाणात उपलब्ध असल्यास प्रति दहा किलो वैरणीस एक किलो पशुखाद्य कमी देऊन खाद्य खर्चावर नियंत्रण ठेवता येईल. दहा किलोपेक्षा कमी प्रमाणात हिरवी वैरण उपलब्ध असल्यास दूध उत्पादनानुसार दर्जेदार खनिज मिश्रण प्रतिदिनी ३० ते ४० ग्रॅम पशुखाद्यात मिसळून द्यावे.
आधुनिक तंत्रानुसार, बायपास प्रथिन, बायपास फॅट यांच्या वापराने खाद्य कमतरता टाळता येते. खर्चावर नियंत्रण ठेवता येते. याबाबत स्थानिक पशुवैद्याची मदत घ्यावी. निकस चाऱ्याचे (पेंढा, उसाचा वरचा पाला, कडबाकुट्टी, गहू सरमड) पोषममुल्य युरिया, मळी (उसाची), खनिज मिश्रण एकत्र करुन वाढवता येते. युरिया विषारी घटक असल्याने तज्ज्ञाचा सल्ला घेऊनच ते वापरावे. मका, नेपीयरसारखी लांब दांडय़ाची वैरण कुट्टी करुन चाऱ्यासोबत दिल्यास चारा वाया जात नाही.
पाण्याचे महत्त्व : दुधात पाण्याचे प्रमाण नैसर्गिकरीत्या ८५ टक्के असते. दुभत्या गुरांना स्वच्छ पाणी भरपूर प्रमाणात उपलब्ध नसल्यास दूध उत्पादन कमी होते. उन्हाळ्यात थंड पाणी आणि हिवाळ्यात कोमट पाणी दिल्यास हवामानानुसार होणारी दूध उत्पादन घट टाळता येते. पाण्याच्या टाक्यांना दर १५ दिवसांनी चुनासफेदी केल्याने स्वच्छ पाणीपुरवठा होतो. गुरांना पिण्यासाठी पाणी सतत उपलब्ध असावे.
प्रजनन व्यवस्थापन : दूध व्यवसायात नुकसान होण्याचे प्रमुख कारण भाकड गुरांचा संगोपन खर्च हे आहे. नुकसान टाळण्याच्या दृष्टीने गाय दर १३ ते १४ महिन्यांनी आणि म्हैस दर १४ ते १५ महिन्यांनी वीत राहायला हवी. नियमितपणे गुरे विण्याकरिता त्यांना सकस खाद्य, चारा, खनिज मिश्रण द्यायला हवा. खाद्याअभावी दूध उत्पादन करत राहिल्यामुळे गुरे अशक्त होतात. परिणामी प्रजनन समस्या निर्माण होतात.
विल्यानंतर गर्भाशयाचे आरोग्य जिवाणूसंसर्गाने बिघडल्यास गुरे गाभण राहात नाहीत. अशावेळी तज्ज्ञ पशुवैद्याकडून उपचार करून घ्यायला हवेत. तीनपेक्षा जास्त वेळा रेतनक्रिया करूनही गुरे गाभण राहात नसतील, तर पशुवैद्याकडून त्वरित तपासणी करुन घ्यायला हवी. प्रतिजैविके औषधे आणि संप्रेरकांचा वापर करून गुरांची प्रजनन समस्या सोडवता येते. उपचार करूनही गाभण राहात नाहीत, अशी गुरे पुढील संगोपनास ठेवू नयेत.

जे देखे रवी..- शांतता
भाषेचे आविष्कार अनेक असतात. संपादक तडाखेबंद लिहितात, टोमणे मारतात, कधी उघड टीका करतात, पक्षपातही करतात. शेवटी मुद्दा मांडतात. इतिहासकार कोणालाच सोडत नाहीत. एकाच घटनेचे विश्लेषण केले जाते. १८५७ ला झालेले स्वातंत्र्ययुद्ध होते, की शिपाईगर्दी, असा वाद असू शकतो. एकाच पुस्तकाची किंवा चित्रपटाची परीक्षणे अगदी उलट असू शकतात. वध हत्या, खून असे निरनिराळे शब्द एकाच मृत्यूला लावता येतात. राज्यकर्ते कोण, यावर स्वातंत्र्यसैनिक, की बंडखोर, की गद्दार हे ठरते. आजचा पापी उद्याचा संत होऊ शकतो. एक माझा अगदी सच्चा आणि प्रामाणिक सेवक होता. त्याचे नाव होते दुर्योधन. ज्या रामलीला मैदानावर रावणाला जाळतात त्यापासून काही अंतरावर रावणाचे देऊळ असते. एक ना अनेक प्रकाराने विरोधाभास आणि गफलत असते. याचे कारण दृष्टिकोन.
दृष्टिकोनातला कोन हा शब्द वेगळी दिशा दाखवतो. तिथे दोन बिंदूंमधली सरळ रेषा नसते. ‘अहो, या पृथ्वीवर सरळ रेषाच काढता येत नाही. पृथ्वीच मुळात गोलाकार असते.’ थोडक्यात, या विश्वात काही सरळ नसते. प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनाचा आविष्कार असते. झाडावर बसलेला पक्षी आपण बघतो तेव्हा आपण कुठे असतो? आपल्यात, पक्षात, की मध्ये कुठेतरी जिथे प्रकाशाचे किरण असतात तिथे? कोकिळेचे स्वर श्रवणीय असे आपण ठरविलेले असते. ती कोकीळ खरे तर आपल्याला अणूंच्या हालचालींमुळे ऐकू येते. विरोधाभास, हालचाल, गफलती सर्वत्र असतात आणि असाव्या लागतात. तेव्हाच विश्व अवतरते. ते अवतरण्याआधी जे असते ते आणि तेच फक्त शांत शून्य असते, तेही तसे असते. कारण त्या तथाकथित(!) गोष्टीतले ऋणभार आणि धनभार एकमेकांना छेद देऊन गपचीप बसलेले असतात. त्या तथाकथित वस्तूंचा किंवा त्याच्याशी तादात्म्य करण्यासाठी जो भाषेचा रस असतो तो शांत रस अशी कल्पना आहे. इतर आठ रस जगाशी संबंधित हा त्या तथाकथित एकलत्वाशी निगडित जिथून जग प्रसवते या एकलत्वाला इंग्रजीत Singularity  म्हणतात. ‘‘ज्या रसाच्या श्रेष्ठतेसमोर इतर रस ओवाळून टाकावेत, जे सज्जनांच्या बुद्धीचे विश्रांतिस्थान आहे. त्या अपूर्व शांत रसातले हे माझे शब्द एका’’ अशी आळवणी ज्ञानेश्वरांनी केली आहे. काश्मिरीशैव संप्रदायाने हा रस अनावरण केला आणि ज्ञानेश्वर त्या संप्रदायातले. सर्वात गंमत अशी की, विश्वाचे खरे रूप सांगण्यासाठी जो अकरावा अध्याय आहे त्याची दुसरी ओवी म्हणते-
शांत रसाच्या घरा। अद्भुत रस आला पाहुणा।।
जग अद्भुतच. पण ते शांततेतून आले आहे. अद्भुत, या शब्दात अद। भूत असे दोन शब्द आहेत, जे भव झाले ते (भुत) आणि त्याच्या आधीचे (अद).
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस – अवघड मूत्रपिंडविकार : आयुर्वेदीय उपचार-१
गेल्या काही वर्षांत केवळ थोरा-मोठय़ांचेच नव्हे तर खेडय़ापाडय़ातील गरिबांचेही जीवनमान ‘खूप सुधारलेले आहे’ काही मंडळी याला ‘भौतिक प्रगती’ असे मोठे गोंडस नाव देतात. वैद्यकीय व्यावसायिकांच्या दृष्टिकोनातून पाहता ही ‘प्रगती’ अनेक गंभीर विकारांची जन्मदात्री ठरत आहे. भारतात मधुमेह व रक्तदाब वृद्धीचे रुग्ण भूमितीश्रेणीने वाढत आहेत. या दोन रोगांचा घातक परिणाम संबंधितांच्या मूत्रपिंडावर होत असतो; हे फार उशिरा रुग्णांच्या लक्षात येते. दीर्घकाळ नुसती मधुमेहाची औषधे घेणे व नाममात्र पथ्य पाळणे यामुळे आपल्या शरीरातील तीन प्रमुख मर्मस्थानांपैकी मूत्रपिंडाच्या कार्याची दिवसेंदिवस हानी होते.
आपण रोजच्या जीवनात, जीवन रक्षणाकरिता जे अन्न पदार्थ खातो; जे पाणी वा पातळ पदार्थ पितो त्यांचे ठराविक काळात पचन होऊन मल व मूत्र असे दोन प्रकारचे रूपांतर होत असते. यापैकी मलप्रवास तुलनेने सोपा आहे. आपल्या शरीरात मूत्र पुरेशा प्रमाणात सहजपणे निर्माण होणारे ठिकाण म्हणजे मूत्रपिंड किंवा किडनी होय. हा अवयव अत्यंत सोशिक स्वरूपाचा समजला जातो. त्याची तुलना जिवंत पाण्याचे झरे निर्माण करणाऱ्या; खळखळून भरपूर पाणी देणाऱ्या जिवंत विहिरीशीच होऊ शकते. खूपखूप पाणी पिऊन लघवीचे प्रमाण वाढतेच असे नाही. मूत्रपिंड जर आपले काम नीट करेल तर तुम्हा आम्हाला ‘क्रॉनिक रिनल फेल्यूअर’ या ‘सीआर एफ’ विकाराचे भय कशाला?
मधुमेह व रक्तदाबग्रस्त रुग्णांचा भर वारंवार लघवीला जायला लागू नये अशाकरिता मूत्रसंग्राह – लघवीचे प्रमाण कमी करण्यावर भर असतो. त्यामुळे मधुमेहाचीच फक्त औषधे घेऊन आपण मूत्रपिंडाच्या कार्याची हानी करत आहोत इकडे दुर्लक्ष होते. या औषधांच्या जोडीला मधुमेहग्रस्त रुग्णांची सुरवासीन राहणी, मिठाचा व मीठ घटकद्रव्य असणाऱ्या लोणचे, पापड तसेच अनावश्यक फाजील द्रव पदार्थाचे सेवन यामुळे ‘सीआरएफ’ विकार तुम्हाला छळेल यात नवल ते काय?
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत  – १५ ऑगस्ट
१९०७ > कथा, कादंबरीकार भगवंत गांगल यांचा जन्म. मध्यमवर्गीयांचे हृदयचित्र रेखाटणाऱ्या त्यांच्या कथांचे ‘क्षणचित्रे’, ‘शल्ये’ हे त्यांचे संग्रह, तर  ‘पाझर’, ‘रंगाचे घर’ आदी कादंबऱ्या प्रकाशित झाल्या.
१९२१> ‘वीणा’ या साहित्य-मासिकाचे संपादक, कथाकार, अनुवादक उमाकांत नीमराज ठोमरे यांचा जन्म. ‘इन्किलाब जिंदाबाद आणि इतर कथा’, ‘सुखदुख’, ‘कानफाटय़ा’, ‘नेत्रपल्लवी’ हे त्यांचे काही लघुकथासंग्रह, तर ‘चक्रावर्त’, ‘चिक्कवीर राजेंद्र’ या अनुवादित कादंबऱ्या. ठोमरे यांनी बालसाहित्यही लिहिले होते.
१९२२> लोककवी वामनदादा कर्डक यांचा जन्म. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १९४० साली भेटून, पुढे त्यांच्या काही सभांमध्ये गाण्याची संधी वामनदादांना मिळाली होती. त्यांचे चार काव्यसंग्रह त्यांच्या हयातीत प्रकाशित झाले, परंतु ‘सांगा आम्हाला बिर्ला, बाटा, टाटा कुठं हाय रं। तुमचा धनाचा साठा न् आमचा वाटा कुठं हाय रं॥’ हे आक्रमक शब्दांतले समतागीत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे वर्णन करणारी अनेक गीते वा  ‘बाबा तुझ्या मताचे जर चार लोक असते’ हे आजच्या राजकारणावरील टीकागीत, अशी लोकांच्या ओठांवर असणारी कित्येक गाणी, हे त्यांचे संचित!
– संजय वझरेकर