कोणत्याही पदार्थाचे गुणधर्म म्हणजे त्याचा रंग, विद्युतवहनशक्ती, उष्णतावहनशक्ती, चुंबकीयशक्ती, प्रकाशपरावर्तन शक्ती, प्रकाश शोषून घेण्याची शक्ती आणि त्यातून ध्वनिलहरी वाहू देण्याची शक्ती हे सर्व काही त्यामध्ये असलेल्या अणू-रेणूंवर असते. मात्र कोणत्याही पदार्थाचे आकारमान ठरावीक आकारमानापेक्षा लहान झाल्यास त्याचे गुणधर्म आकारमानानुसार बदलू लागतात. ठरावीक आकारमानापेक्षा किती असावे हे त्या पदार्थावरसुद्धा अवलंबून असते. नॅनो विज्ञान-तंत्रज्ञान विकासाचा प्रमुख आधार हाच आहे. १९व्या शतकात विकसित झालेल्या आधुनिक पोलादापासून आजच्या अत्याधुनिक ‘स्मार्ट मटेरियल्स’पर्यंत सर्वच पदार्थाच्या विकासाचे प्रमुख सूत्र सूक्ष्म स्तरावर त्यांची संरचना नियंत्रित करणे हेच आहे. याच स्तरावरील रचनेतून त्यांची व्यावहारिक पातळीवर वर्तणूक ठरते. या आण्विक पातळीवर घडणाऱ्या घडामोडींवर नियंत्रण मिळवून हव्या त्या संरचनेचे पदार्थ बनविणे हा नॅनोविज्ञानाच्या विकास प्रक्रियेचा प्रमुख गाभा आहे.
अगदी साधे उदाहरण म्हणजे पदार्थाचा रंग. चांदीचा रंग पांढरा, तर सोन्याचा पिवळा असतो. परंतु सोन्यासारखी पिवळीधम्मक आणि केवळ चांदीचे अणू असणारी चांदी आणि रूबीसारखे दिसणारे लालसर सोने प्रयोगशाळेत शास्त्रज्ञ आता सहजगत्या तयार करताना दिसतात.
पदार्थ द्रवरूप होण्याची प्रक्रिया बहुतेक सर्व पदार्थाचे द्रव, घन किंवा वायू रूपात स्थित्यंतर हे काही ठरावीक तापमानालाच होत असते. मात्र नॅनो आकारमानातील घनपदार्थाचे द्रवरूपात स्थित्यंतर होण्याचे तापमान कित्येक शेकडय़ांनी बदलते. उदारणार्थ सोने सुमारे १०६४ अंश सेल्सिअस तापमानाला वितळते. परंतु ५ नॅनोमीटर आकाराचे सुवर्णकण सुमारे ८०० अंश सेल्सिअस तापमानाला वितळते. परंतु ३ नॅनोमीटर आकाराचे कण २५० ते ३०० अंश सेल्सिअस तापमानालाच वितळतात.
नॅनो कण तयार करण्याच्या अनेक पद्धती हल्ली, विशेषत: रसायनशास्त्राचा उपयोग करून  विकसित होत आहेत. रासायनिक अभिक्रिया करताना वापरलेले द्रव पदार्थ काढून टाकल्यावर उरलेले पुडीच्या रूपातील पदार्थ वेगवेगळ्या कामांसाठी वापरता येतात. त्यांचे पातळ पापुद्रे(थिन फिल्म्स)सुद्धा तयार करता येतात. पाणी आणि तेलाच्या मिश्रणाचा म्हणजे मायक्रोइमल्शनचा वापर करून सूक्ष्म नॅनोकण तयार करण्याचे तंत्रज्ञान बऱ्याच प्रमाणात विकसित झालेले आहे. त्याचे औषध जगतामध्ये खूप महत्त्व आहे.
शैलेश माळोदे (नाशिक) – मराठी विज्ञान परिषद, , वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा – राफाएलचे सफरचंद
गंमत म्हणजे फ्लोरेन्समधल्या ‘उफिची’ वस्तुसंग्रहालयात नजरेतून निसटलेल्या या ‘यंग मॅन विथ अ‍ॅपल’ चित्रानं अखेर जपानमधल्या अुएनो सेंटरमधल्या चित्रप्रदर्शनात दर्शन दिलंच. हे चित्र  डोळ्यासमोरून निसटलं, कारण त्याचा आकार लहानखुरा (१९’’७ १४’’). परंतु जपानमध्ये राफाएलवर उडय़ा पडत होत्या. त्याच्या चित्रांच्या प्रदर्शनाला भली मोठी जपानी रांग होती; परंतु जपानी शिस्तबद्धतेमुळे संपूर्ण प्रदर्शन मनसोक्त न्याहाळायला मिळालं.
राफाएल (१४८३-१५२० म्हणजे) जेमतेम ३७ र्वष जगला. रेनेसाँच्या त्रिमूर्तीमधला मायकेल अँजेलो, लिओनार्दोबरोबरचा तिसरा! अंमळ कमी प्रसिद्ध, इतकंच.
चित्रशैली : हाय रेनेसाँ. म्हणजे या चित्रशैलीच्या परमोच्च बिंदूला पोहोचलेली. कोणी फ्रान्सेस्को मरिअ द देला रोविएर नामक तरुणाचं.
चित्र क्षणार्धात स्तिमित करतं. तारुण्यातली मग्रुरीकडे झुकणारी तिरकस नजर, घट्ट मिटलेले पातळ सरळ ओठ, तिरकी टोपी यांनी चेहऱ्यावरचे भाव आणि स्वभाव चित्रित होतात.
राफाएल अत्यंत सूक्ष्म बारकावे टिपत असे. व्यक्तिचित्रण शैलीत हुबेहूबपणापलीकडे जाणारा मनाचा अवकाश टिपणे हे त्याचे वैशिष्टय़. त्यामुळे मानेभोवती गुंडाळलेला केसाळ मफलर मऊशार वाटतो, पण ज्या सहजपणे तो मफलर त्या तरुणानं खांद्यावर टाकलाय, ते अधिक भावतं. राफाएलच्या चित्रातल्या व्यक्तींच्या हाताची रचना आणि आविर्भाव फार महत्त्वाचा वाटतो. त्या व्यक्तीचं वय चेहऱ्यापेक्षा हातावरून अधिक बोलतं. रेशमी अंगरख्याच्या घडय़ांवरून त्याची श्रीमंतीच नव्हे, तर राजबिंडेपण व्यक्त होतं.
राफाएलच्या चित्रांमधलं आणखी वैशिष्टय़ म्हणजे मान आणि हनुवटीमधला कोन त्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल खूप काही सांगतो. कधी हा कोन ४५ अंशाचा, कधी ९० अंशाचा, तर इथे १२० अंशाचा वाटतो. किंचित उद्दामपणा वाटावा तर निमुळत्या घोटीव हनुवटीमुळे तो उणावतो.
हातात धरलेलं सफरचंद हे त्या चित्राचं नामवैशिष्टय़. त्यानं ते हातात धरलंय, परंतु पकडलंय असं वाटत नाही. त्या सफरचंदाकडे तो निरखून पाहातही नाहीये. क्षणभरात ते सफरचंद तो खाईल, असंही वाटत नाहीये. इथे हे फळ असणं हे केवळ गूढरम्य आहे.
यातली गूढरम्यता सफरचंदाच्या प्रतीकात आहे. सफरचंदाला ज्ञानाचं प्रतीक मानतात. ते त्या तरुणानं नुकतंच हाती घेतलंय. त्या सफरचंदस्वरूप ज्ञानाविषयी त्याचा दृष्टिकोन निश्चित झाला नसला तरी आपल्याला मिळालेल्या या संधीमुळे तो अहंकारी झालाय, असं वाटतं.
खेरीज मुख्य चित्र विषयामागील नैसर्गिक पाश्र्वभूमी (रेनेसाँ काळात ती विशेष श्रीमंत दिसायची) पण इथे तोच भूभाग शुष्क आणि मातकट (केवळ एक झाड) असा दिसतो. राफाएलच्या चित्रातला हा विरोधाभास मुख्य चित्राला अधिक उठावदार नि उत्कट करतो.
पाहावं तेवढं थोडं होतं, असं झालं. राफाएलचा हा तरुण मला सांस्कृतिक आणि शास्त्रीय पुनरुज्जीवनाचा ,  सु-धारणेकडे जाणाऱ्या समाजाचा प्रातिनिधी वाटतो. ज्ञानाची संधी मिळत्येय, पण त्याचं नेमकं स्वरूप काय? आणि हे सारं कशासाठी? हे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत..
डॉ.राजेंद्र बर्वे -drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व – शेतमालाला वाजवी किमतीं’ची गुरुकिल्ली!
‘‘शेतकरी समाज व बिनशेतकरी ग्राहकवर्ग यांचे हितसंबंध परस्परविरोधी आहेत. शेतकऱ्याच्या शेतीमालास उत्पादन खर्च लक्षात घेऊन वाजवी किंमत दिली तर बिनशेतकरी ग्राहकवर्गाचे राहणीमानावर अनिष्ट परिणाम होईल व त्यांच्या हितसंबंधाला बाध येईल, असा गैरसमज सामान्य माणसापासून तो तथाकथित विद्वानांपर्यंत समाजाच्या अनेक घटकांमध्ये दिसून येतो. परंतु यात खरोखर काही तथ्य आहे का? वस्तुस्थिती याच्या अगदी उलट आहे. आज भारतात अन्नधान्याचे पुरेसे उत्पादन नसल्यामुळे व इतरही दैनंदिन गरजेच्या शेतीमालाच्या तुटवडय़ामुळे महागाई, काळाबाजार, साठेबाजी यांची झळ विशेषकरून मागार व मध्यमवर्गीय गरीब जनतेलाच प्रकर्षांने सोसावी लागते. शेतकऱ्यांना आपल्या मालाची वाजवी व किफायतशीर किंमत मिळू लागली तर शेतीव्यवस्थेतील अगतिकता संपुष्टात येईल. एवढेच नव्हे तर उत्पादनवाढ झपाटय़ाने होऊ लागेल व भारत धनधान्याने समृद्ध होण्यास फारसा कालावधी लागणार नाही. उत्पादनाच्या विपुलतेमुळे गरीब जनतेची व्यापारी, साठेबाज, काळाबाजारवाले यांच्याकडून होणारी पिळवणूक खऱ्या अर्थाने संपुष्टात येईल. उत्पादनवाढीमुळे व शेतकऱ्यांना वाजवी किंमत मिळू लागल्यामुळे शेतकरीवर्ग शेतीत अधिक भांडवल गुंतविण्यास प्रवृत्त होईल. शेतीचे आधुनिकीकरण झपाटय़ाने होऊ लागेल. उत्पादन खर्च आधुनिक तंत्राचा वापर जसजसा होऊ लागेल तसतसा कमी होईल.’’ ‘भारतापुढील कृषिसमस्या-अन्नसमस्या’ (जून १९६५) या पुस्तकात अण्णासाहेब शिंदे लिहितात- ‘‘शेतीउत्पादनवाढीनेच बिनशेतकरी, कामगार यांनाही हल्लीच्या अडचणीच्या अरिष्टातून बाहेर काढणे शक्य होईल. उलट आजची शेतीच्या धंद्यातील अरिष्ट चक्राची परिस्थिती तशीच चालू ठेवणे म्हणजे ग्राहकांची अडवणूक चालू ठेवणे होय. शेतकरीवर्गाच्या उत्पन्नात भर पडली तर देशाच्या औद्योगीकरणाचाही वेग वाढेल. ७० टक्के ग्रामीण जनसमूह हाच खरा कारखानदारीत तयार होणाऱ्या मालाचा ग्राहक आहे. शेतकऱ्यांची विकत घेण्याची ताकद वाढल्यामुळे कारखानदारीच्या विकासाचा ..मार्ग मोकळा होणार आहे’’