गरजेप्रमाणे वायरची योग्य निवड करता येते. १) तांबूस रंगाची इनॅमल्ड वायर विद्युतशास्त्रात महत्त्वाची ठरलेली आहे. ही वायर लवचिक असून सर्व प्रकारच्या वाइंिडगसाठी हिचा उपयोग करतात. तांब्याच्या तारेवर इनॅमल्ड इन्शुलेटिंग रंगाचे अनेक थर देऊन ही वायर बनवलेली असते. ही वायर वेगवेगळ्या जाडीमध्ये मिळते. जास्त प्रवाहाच्या मोटर्स, जनरेटर्स, ट्रान्स्फॉर्मर्स इत्यादीमध्ये जाड व चपटय़ा आकाराच्या कन्डक्टर्स उपयोग करतात. या वायरी तुलनेने महाग असतात. २) जमिनीखाली टाकायच्या वायरीसाठी आर्मर्ड केबलचा उपयोग करतात. या केबलमध्ये मुख्य इन्शुलेशन कागदाचे असते. हा कागद जास्त तापमानात टिकू शकतो. यात मजबूतपणा व रोधकता असेही गुणधर्म असतात. हा कागद मनिला फायबरपासून बनविला जातो व मग तो इन्शुलेशन कम्पाऊंडमध्ये भिजविला जातो. कागदामध्ये हवेतील बाष्प चटकन शोषले जाऊ नये म्हणून त्यावर शिशाच्या किंवा बिटुमेन मिश्रणाचा थर दिला जातो. ३) तांब्याची किंमत दिवसेंदिवस महाग होत चालल्याने आता ओव्हरहेड लाइनकरिता अ‍ॅल्युमिनियम कंडक्टरचा उपयोग करतात. त्यापकी ओव्हरहेड लाइनकरिता अ‍ॅल्युमिनियम कंडक्टर स्टील रीइन्फोर्सड कंडक्टर ऊर्फ एसीएसआर कंडक्टर वापरतात. या केबलमध्ये एकूण सात तारा असतात. त्यापकी कडेच्या सहा तारा अ‍ॅल्युमिनियमच्या, तर मधली तार मजबूत अशा गॅल्व्हनाइज्ड आयर्नची असते. त्यामुळे कंडक्टरची मजबुती वाढते. अ‍ॅल्युमिनियम कंडक्टरवर वातावरणाचा विशेष परिणाम होत नाही. हा कंडक्टर वजनाने हलका असतो, हाताळण्यास सोपा असतो. त्याची निगा राखणे फार सोपे असते. ४) ऑप्टिकल फायबर केबल काचेच्या बारीक तारांनी बनवलेली असते. काचेच्या बारीक तारांवर फ्लॅस्टिक किंवा फायबर फ्लॅस्टिक गुंडाळलेले असते. काचेच्या बारीक तारांची जाडी केसाच्या जाडीपेक्षाही कमी असते. त्यामुळे एका केबलमध्ये बऱ्याच तारा मावतात. त्यातून टेलिफोनचा आवाज न्यायला तसेच पॅनेल वायरिंगसाठी या केबलचा चांगला उपयोग होतो. आवाजाचे रूपांतर इलेक्ट्रिकल सिग्नल्समध्ये व नंतर त्याचे रूपांतर प्रकाशात करून या तारेतून पाठविले जाते. प्रकाश परावर्तनाच्या क्रियेवर ही केबल काम करते.      
अनंत ताम्हणे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग,चुनाभ ट्टी ,मुंबई २२  
office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा.. – एका जनार्दनी
एकनाथ महाराजांच्या भारुडामधील सर्वसामान्य माणसाचं जीवन आणि आधुनिक काळातील आपलं आयुष्य यात फारसा फरक आढळत नाही. अतिशय साधे, नित्य व्यवहारातील शब्द आणि दैनंदिन जीवनातले प्रसंग यांच्या मदतीने त्यांनी ‘भारूड’ लिहिली. अनेक भारुडांमध्ये फक्त शब्दांचं भारूड असल्याचा भास होतो, परंतु ध्यान देऊन शब्दन््शब्द वाचला की अर्थबोध होतो.
जीवन कसं जगावं? याचं तत्त्वज्ञान कठीण शब्द, जटिल संकल्पना मांडून स्पष्ट करावं लागत नाही. जीवन ही जगण्याची कला असते. त्यासाठी मन:पूर्वक विश्वास ठेवून गुरूंकडून शंकानिरसन केलं की जगणं सुकर आणि सुखकर होतं.
शाहीर साबळे, आशाताई, आर. एन. पराडकर, स्नेहल भाटकर इ. मंडळींनी एकनाथांच्या रचना गायल्या आणि अर्थनिरूपण केलं.
‘विंचू चावला’ हे भारूड शाहीर साबळे यांनी विलक्षण बहारदारपणे सादर केलंय. कित्येकदा कानावर पडलंय, ऐकलंय. त्यामानाने अर्थ सरळ आणि इंगळीरूपी तमोगुण हे प्रतीक वापरल्यामुळे भारुडाचं निरूपण  सुलभ आहे.
अडकायला होतं ते त्यांच्या ‘एका जनार्दनी’ या सिग्नेचर शब्दांवर. त्यातून एकनाथ महाराज गुरूची आठवण ठेवतात आणि अखेरचा ‘टच’ देतात. असा स्पर्श की ज्यातून समग्र भारुडाचा अर्थ नव्यानं उलगडतो.
‘रोडगा वाहीन तुला’ या भारुडात ते म्हणतात-
एका जनार्दनी सगळेच जाऊ दे,
एकटीच राहू दे मला
भवानी आई रोडगा वाहीन तुला.
या भारुडात जवळच्या नातेसंबंधातील किल्मिष आणि क्लेश किती दाहक असतात याचं वर्णन केलंय. केवळ प्रेमावर आधारित संबंधात सार्थक असतं. गळ्यातल्या लोढण्याप्रमाणे जड झालेली ही नाती तोडून मला नि:संग व्हायचंय, असं ते म्हणतात.
तर ‘अरे कृष्णा, अरे कान्हा ’ या भारुडात एका जनार्दनी म्हणे हरि हा गुप्तचि ओळखावा असं आग्रहपूर्वक सांगतात. ‘हरि’ गुप्त असतो, सदाचार, संयम आणि मनोनिग्रह या त्याच्या स्वभावातल्या खुणा पटविण्याकरिता, गुरूचे आशीर्वाद आणि गुरुवचने हवीत. तर विठ्ठलावाचुनी आणिकाचे या रचनेत
‘एका जनार्दनी विठ्ठल भरला
भरूनी उरला पंढरिये’
असं म्हणून विठ्ठलरूपी परमात्म्याची विराट सर्वव्यापकता दर्शवितात.
‘दादला नको ग बाई’मध्ये अखेरीस एका जनार्दनी समरस झाले, पण तो रस येथे नाही असं म्हणतात. ‘विंचू चावला’ या भारुडात ‘किंचित राहिली फुणफुण, शांत केली जनार्दने’ असं सांगतात. ‘सत्य उतारा आणि सत्त्वगुणांचा अंगारा लावा’ असा उपदेश करतात. परंतु तरीही मित्रा, आपल्या मनात तमोगुणाच्या विषाची फुणफुण शिल्लक राहते. दृढनिश्चियीपणा ढळतो, मोहमाया खुणावत राहते अशा वेळी गुरूंच्या आशीर्वचनांमुळे आणि गुरूवरील श्रद्धेमुळे मन शांत होतं. जे उरलंसुरलं पाप असतं, तेही नष्ट होतं. एकनाथांच्या भारुडातली ही शक्ती आणि भक्ती केवळ अद्वितीय .. मनमोर फुलतो तो असा..
 डॉ. राजेंद्र बर्वे  -drrajendrabarve@gmail.com

सफर काल-पर्वाची- सम्राज्ञी  हॅटसेपशूटची कारकीर्द
स्वयंघोषित इजिप्तची राणी (फेरो) हॅटशेपसूट हिने स्वत:त विशेष दैवी गुण असून, देवाज्ञेवरून आपण इजिप्तचे राजे झालो आहोत, हे जनतेत ठसविण्यासाठी मंदिरांच्या भिंतीवर व शिलालेख (ओबेलिस्क) यावर तिच्या आईच्या स्वप्नात येऊन रा अमुनने जो दृष्टांत दिला तो कोरून घेतला. ती स्वत: स्त्री असूनही देवाने तू राजा होशील असा दृष्टांत दिल्याने नेहमी पुरुषी पोषाख करीत असे, सोन्याची खोटी दाढी लावीत असे. इ. स. पूर्व १४७९ मध्ये तिने स्वत: फेरो असल्याची घोषणा केली. लढाया करण्याऐवजी तिने चांगले प्रशासन देण्याचा प्रयत्न केला.
तिच्या प्रशासकांपैकी ‘सेनमूट’ या नावाचा स्थापत्यविशारद होता. त्याने व्हॅली ऑफ किंग्ज व व्हॅली ऑफ क्विनस या भागात लक्झर जवळ दल एल बहरी येथे तिचे अप्रतिम मंदिर बांधले. त्यानेच पुढे कर्नाक येथे आमून देवाचे भव्य मंदिर बांधले. तिच्या काळात मध्य पूर्वेतल्या इतर राज्यांशी तिने व्यापार वाढविला.
इजिप्तमध्ये असा समज पिढय़ा न् पिढय़ा चालत आला होता की, राजघराण्यातील विशेष गुणवत्ता असलेले श्रेष्ठ रक्त फक्त राजघराण्यातल्या स्त्रियांमध्ये असते पुरुषांत नाही. त्यामुळे कुठल्याही राजपुत्राला त्याच्या बहिणीएवढे विशुद्ध रक्त दुसऱ्या स्त्रीत मिळत नसे व त्यामुळे इजिप्तमध्ये बहिणीशी लग्न करणे श्रेष्ठ दर्जाचे मानले जाई. हॅटशेपसूट नेफरूरा ही एक कन्या होती, पण तिलासुद्धा ती राजकुमार म्हणून संबोधून पुरुषी पेहेराव करावयाला लावी. तिचा पुतण्या व गादीचा खरा वारस तुथमास तिसरा याला हॅटशेपसूटचा तिटकारा होता. त्याने इ. स. पूर्व १४५८ मध्ये तिला फेरोपदावरून हटवून स्वत: फेरो झाला. त्याच वर्षी ती गूढपणे गायब झाली. तिचा ठावठिकाणा कुठेही लागला नाही. तुथमास तीन याने सर्व शिलालेखांवरून हॅटशेपसूटचे नाव काढून टाकले.

इतिहासात आज दिनांक.. – २४ नोव्हेंबर
१९२९ पहिल्या जागतिक महायुद्धातील फ्रान्सचे पंतप्रधान जॉर्जस क्लेमेन्सो यांचे निधन. वैद्यकीय शिक्षण घेऊन अमेरिकेला प्रयाण केले. फ्रान्समध्ये डाव्या  जहाल गटाचे ते प्रमुख झाले. १८९३ च्या निवडणुकीत ‘पनामा स्कँडल’मुळे त्यांचा पराभव झाला. आल्फ्रेड ड्रायफसच्या पुनर्वसनाविषयी त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळे १९०३ मध्ये ते पार्लमेंटवर सिनेटर म्हणून परतले. १९०६ ते १९०९ आणि १९१७ ते १९२० या कठीण कालखंडात ते देशाचे पंतप्रधान होते. त्यांच्या कणखर नेतृत्वामुळेच प्रथम महायुद्धात फ्रान्सने तग धरला आणि विजयी राष्ट्राचा दर्जा प्राप्त केला. १९१९ च्या पॅरिस शांतता परिषदेचे ते एक प्रमुख होते. जर्मनीच्या संभाव्य धोक्यांपासून फ्रान्सचे रक्षण करणे हेच उद्दिष्टय़ क्लेमेन्सो यांच्या डोळ्यासमोर होते. परंतु या परिषदेच्या मूळ उद्दिष्टालाच हरताळ फासला गेला व युरोपात दुसऱ्या महायुद्धाचे पडघम वाजू लागले. फ्रान्सच्या राजकारणात त्यांना ‘द टायगर’ असे टोपण नाव होते. आपल्या अमोघ वक्तृत्वाच्या जोरावर ते पार्लमेंटमध्ये विरोधकांवर कोसळत असत. त्यातून त्यांना हे टोपन नाव पडले. ते पत्रकार म्हणूनही गाजले. त्यांचे स्वत:च्या मालकीचे वृत्तपत्र होते.
१९३७ कवी, कथाकार, कादंबरीकार केशव तानाजी मेश्राम यांचा जन्म. ते चिंतनशील कवी म्हणून प्रसिद्ध पावले. जुगलबंदी, अकस्मात, चरित हे त्यांचे काही गाजलेले कवितासंग्रह होत.
१९४६ आचार्य जे. बी. कृपलानी यांच्या अध्यक्षतेखाली मेरठ (त्या वेळी ‘मीरत’)  येथे अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चोपन्नावे खुले अधिवेशन प्यारेलाल नगर येथे सुरू झाले.
डॉ. गणेश राऊत – ganeshraut@solaris.in