हा हरितगृहाप्रमाणेच शेती व्यवसायामधील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक भाग आहे. याचा वापर उद्यानक्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर केला जातो. उत्तम व्यवस्थापन असलेल्या रोपवाटिकेचा हा अविभाज्य भाग आहे. याची रचना हरितगृहाप्रमाणेच असते. मात्र येथे कर्बवायू, तापमान, आद्र्रता आणि सूर्यप्रकाश या पर्यावरणीय घटकांवर यांत्रिक पद्धतीने नियंत्रण नसते. शेडनेट तयार करताना प्रथम अल्युमिनियम पाईपच्या साहाय्याने उपलब्ध जागेनुसार सांगाडा तयार करून त्यावर पॉलिथिन अथवा नायलॉन धाग्यांची जाळी घट्टपणे चढवली जाते. जाळीच्या छिद्रांचे आकार सूर्यप्रकाशरोधक म्हणजे आतमधील सावलीचे दर्शक असतात. ही जाळी अतिनील किरण प्रतिबंधक असावी, अशी अपेक्षा असते. शेडनेटमुळे आतमध्ये सावली निर्माण होऊन आद्र्रता कायम राहते. रोपवाटिकेमध्ये असणाऱ्या शोभिवंत वनस्पती, सावलीत वाढणाऱ्या झाडांच्या कुंडय़ा तसेच विदेशी वनस्पती ज्या बाहेरच्या वातावरणामधील उष्णता, ताणतणाव सहन करू शकत नाहीत, त्यांना शेडनेटच्या माध्यमातून संरक्षण मिळते. शेडनेटमध्ये असणाऱ्या विविध प्रकारच्या वनस्पतींना फवाऱ्याने पाणी दिले जाते. त्यामुळे आतील आद्र्रता कायम राहते. आणि शोभिवंत वनस्पती, त्यांच्या पानाफुलांचे रंग उठून दिसतात. हरितगृहाप्रमाणे शेडनेट फार खíचक नसते. आणि त्याची उभारणीसुद्धा सहज करता येते. अनेक ठिकाणी शेडनेटसाठी बांबूंचा वापर होतो. जाळी मात्र तीन चार वर्षांनी बदलणे गरजेचे असते. शेडनेटचा उपयोग नेचे, ऑर्ड यांसारख्या अनेक सूर्यप्रकाशाला संवेदनशील असणाऱ्या वनस्पतीची साठवण आणि निगा ठेवण्यासाठी करतात. सध्या अनेक शेतकरी या तंत्रज्ञानाचा उपयोग त्यांना हव्या असलेल्या पिकांच्या रोपनिर्मितीसाठीसुद्धा करत आहेत. शेडनेटमध्ये तयार केलेली रोपे ही निरोगी आणि अतिशय अल्प किमतीत उपलब्ध होतात. पेरणीची वेळ तसेच बियाण्यांमधील फसवणूक सहज टाळता येते. शेडनेटचा वापर व्यापारी तत्त्वावर भाजीपाला, फळभाज्या अथवा फुलशेतीची लागवड तसेच ऊती पद्धतीतून तयार केलेल्या रोपांना सशक्त करण्यासाठीसुद्धा केला जातो. शेडनेट शेतीसाठी शासनाचे अनुदान उपलब्ध आहे. ज्यांना हरितगृह, त्याची किंमत आणि शास्त्रीय व्यवस्थापन आवाक्याबाहेर आहे असे वाटते, त्यांच्यासाठी शेडनेटमधील शेती नेहमीच फायद्याची ठरू शकते. गरीब अल्पभूधारक शेतकऱ्यासाठी शेडनेट हे शाश्वत शेतीचा मंत्र ठरू शकते. - डॉ. नागेश टेकाळे मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org गमाल अब्दुल नासेर विसाव्या शतकातील मध्यपूर्वेतील सर्वात प्रभावशाली नेत्यांपकी एक, अशी गमाल अब्दुल नासेर यांची ओळख आहे. १९१८ साली जन्मलेल्या नासेर यांचे वडील पोस्टमास्तर होते आणि सततच्या बदल्यांमुळे त्यांनी गमालला त्याच्या चुलत्यांकडे- कैरोमध्ये शिक्षणासाठी ठेवले. शालेय जीवनापासूनच राजकीय चळवळीत सहभाग असलेल्या गमाल नासेर यांनी कैरोतील मिलिटरी अॅकॅडमीतून लष्करी पदवी मिळवल्यावर इजिप्तच्या लष्करात सेकंड लेफ्टनंट या पदावर नोकरी केली. या लष्करी नोकरीत असतानाच त्यांनी, त्या वेळी सत्तेवर असलेल्या राजा फरुकची भ्रष्ट राजवट आणि ब्रिटिशांचे वर्चस्व नष्ट करण्यासाठी चळवळ सुरू केली. त्यासाठी त्यांनी तरुण लष्करी अधिकाऱ्यांची एक गुप्त संघटनाही स्थापन केली. सन १९३८ ते १९५२ या काळात लष्करी नोकरी करणाऱ्या नासेर यांनी, १९५२ सालच्या क्रांतीत पुढाकार घेतला. क्रांती होऊन राजा फरुकला पदच्युत करून नजीब इजिप्तचे अध्यक्ष झाले; पण खरी सत्ता नासेर यांच्याकडेच होती. अखेर १९५४ मध्ये नासेर इजिप्तचे पंतप्रधान झाले आणि १९५६ मध्ये इजिप्तचे नवे संविधान तयार झाले. त्यानंतरही नासेर हे सन १९५७ ते १९७० या काळात इजिप्तचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. इजिप्तच्या इस्लामी अरब प्रजासत्ताकाचे ते पहिले आणि सर्वाधिक काळ राहिलेले निर्वाचित अध्यक्ष. इजिप्तच्या सर्वागीण प्रगतीसाठी नासेर यांनी अनेक सुधारणा केल्या. त्यासाठी त्यांनी कैरोमध्ये औद्योगिकीकरण आणि आधुनिकीकरण यावर भर देतानाच, सर्व अरब राष्ट्रांमध्ये एकी निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या कारकीर्दीत भ्रष्टाचाराविरुद्ध मोहीम, स्त्रियांचे हक्क याबाबतीत त्यांनी काही कठोर पुरोगामी निर्णय घेतले. अस्वान धरण प्रकल्पासाठी पाश्चिमात्य देशांकडून कर्ज न मिळाल्याने नासेर यांनी २० जुल १९५६ रोजी सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले. यामुळे अरब जगतात गमाल नासेर यांची लोकप्रियता वाढली. इजिप्त व अरब राष्ट्रांना लष्करी स्थर्य-शांतता लाभावी म्हणून अलिप्ततावादी परराष्ट्र धोरण त्यांनी अवलंबले. त्यामुळे अरब लीगचे सूत्रधार आणि अलिप्ततावादाचे पुरस्कत्रे अशी नासेर यांची ओळख झाली. १९७० साली त्यांचा मृत्यू झाला. - सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com