गिरीश कुबेर यांचा ‘कोणीतरी आहे तिथं!’ हा समाजमाध्यमं आणि त्यातून तयार झालेला ‘माहितीबॉम्ब’ याविषयीचा लेख वाचला. येत्या काळात मनुष्यबळ कशा प्रकारे नियंत्रित केले जाईल, हे या लेखातून कळले. समाजमाध्यमांतील माहितीवर आधारित मनोमिती विश्लेषण पद्धतीने हिलरी क्लिंटन यांच्याकडून राबविण्यात आलेल्या निवडणूक प्रचारतंत्राला ट्रम्प यांनी मागे सारले. आधुनिक शस्त्रांनी सज्ज असणारा शत्रू आणि आपल्याकडील हत्ती-घोडदळ घेऊन लढणारे राजे यांच्यातील लढाईप्रमाणे हे होते. पण हे जे झाले ते सारे ‘गेम थिअरी’ला साजेसेच आहे. या सिद्धान्तानुसार पुढील निवडणुकांमध्ये अनेक देश व पक्ष या केंब्रिज विश्लेषण पद्धतीचा वापर करतील आणि परस्परांच्या प्रचार-परिणामांना निष्प्रभ करत राहतील. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे अशा नव्या तंत्रांमुळे विचारसरणी बाजूला सारून समाजमाध्यमांतून व्यक्त होणाऱ्या लोकांच्या मानसिकतेचा अंदाज घेत धोरणे आखण्याकडे राजकीय पक्षांचा कल वाढू लागला आहे. यामुळे जनमतापेक्षा वेगळा दृष्टिकोन मांडण्याचे धैर्य फारच थोडे राजकीय नेते दाखवू धजतील. - डॉ. सुचिता कृष्णप्रसाद, मुंबई सारेच अनाकलनीय! ‘कोणीतरी आहे तिथं!’ या लेखामुळे ज्ञानात भर पडली यात शंकाच नाही. पण त्याचवेळी काही प्रश्नही निर्माण झाले. जसे की, ही माहिती आताच कशी बाहेर जात आहे? की तशी जाऊ दिली जात आहे? किंवा जाणीवपूर्वक पाठविली जात आहे? तेही भारतासारख्या देशात- जेव्हा विधानसभा, लोकसभा आदी निवडणुका दोनेक वर्षांच्या जवळपास आल्या आहेत तेव्हा! भारतासारख्या देशात जिथे भविष्य पाहूनच दिवसाचे काम सुरू करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे, तिथे आपला व्यापार वाढवण्याच्या उद्देशाने हे होत नसावे, असे समजणे भाबडेपणाचे ठरेल. ज्या एजन्सीज् दोन वर्षे आधीच एखाद्याबद्दल सांगू शकत असतील, की ती व्यक्ती दोन वर्षांत हत्यार खरेदी करू शकते; एवढेच नव्हे तर ती व्यक्ती कधी स्फोटक होईल, याचाही अचूक अंदाज सांगू शकत असतील तर त्यांनी भारतीय मानसिकता ओळखली असेल असे का समजू नये? त्यातही जर एखादे संशोधन (विश्लेषण) बारा-तेराशे लोकांच्या इंटरनेट सवयींचा अभ्यास करून कोणते लोक ‘कडवे’ (म्हणजे कट्टर धार्मिक) असतात, यासंबंधीची माहिती जाणीवपूर्वक भारतीय लोकांत पसरवत असेल तर त्यावर आपल्या ‘त्या’ लोकांनी विश्वास नाही ठेवला तरच नवल. आता तर या लेखातून स्पष्टच झाले आहे की, कोटय़वधी लोकांच्या सवयींचा अभ्यास करून हे निष्कर्ष काढण्यात आलेले आहेत. एवढेच नव्हे तर त्यातले ९५ % निष्कर्ष खरे ठरल्याचेही सिद्ध झाले आहे. अशा वेळी तर त्यांच्या व्यवसायाच्या बरकतीचा अंदाज न लावलेलाच बरा! - सय्यद मारुफ सय्यद महेमूद, नांदेड आधुनिक विज्ञानाचा शाप? ‘कोणीतरी आहे तिथं!’ हा लेख वाचला. लेखात म्हटल्याप्रमाणे काहीतरी असू शकते, असे काहीतरी घडू शकते यावर विश्वास ठेवावा, की आपल्या क्षुल्लक अशा माहितीचा, व्यक्त केलेल्या मतांचा फायदा एखादी व्यक्ती घेऊ शकते याची भीती बाळगावी, हे समजेनासे झाले आहे. आपण सर्वजण अज्ञात अशा एखाद्या मानसोपचारतज्ज्ञाच्या पूर्णपणे नियंत्रणात आहोत असेच वाटू लागले आहे. मी उद्या कसे वागणार, काय करणार किंवा काय करू शकणार, किंवा मी काय करावे याचे पूर्ण नियंत्रण मला माहीत नसलेले, माझ्यापासून हजारो मल लांब असणारे कोणी ठरवणार असेल तर काय करायचे? कदाचित हीच माणसे यापुढे आम्ही काय बोलावे, कसे वागावे, कोणाला मत द्यावे, हे ठरवतील व त्यावर पूर्ण नियंत्रण ठेवतील. आधुनिक विज्ञानाचा हा शाप तर नाही ना? - गजानन रा. कुलकर्णी, ठाणे