‘आपली राष्ट्रीय दांभिकता’ हा मंदार भारदे यांचा लेख भारतीय समाजमनाचे परखड विश्लेषण करणारा आहे. लो. टिळकांनी ‘केसरी’मध्ये स्वातंत्र्यलढय़ासाठी थंड गोळा बनलेल्या मराठी समाजाला प्रेरित केले हे खरे; पण आगरकरांनी स्वातंत्र्याअगोदर समाजसुधारणा अत्यावश्यक असल्याचा आग्रह धरला, तोही चुकीचा नव्हता. सुदैवाने मी स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलो. ५० वर्षे मुंबईत वास्तव्य असल्याने आंदोलने व चळवळी जवळून पाहिल्या. शेती, संस्कृती, सभ्यता आणि सामान्य नागरिक स्वातंत्र्योत्तर काळात जात, धर्म, भाषा आदींच्या हट्टाग्रहामुळे संकटातून जात आहे. कुटुंबसंस्था नष्टप्राय होत चालल्याने जन्माला आलेल्या अपत्याला ‘माणूस’ बनण्यासाठी आवश्यक असलेले संस्कारच लुप्त होत आहेत. सरकार ज्या लोकप्रतिनिधींचे बनते तेच अप्रगल्भ, सत्तालोलुप व भ्रष्ट असतील तर मतदानाचा सार्वत्रिक अधिकार निर्थक ठरतो. अर्थात् तेही ५० टक्क्यांच्याच आसपास होत असल्याने टुकार लोकप्रतिनिधींचीच संख्या वाढत जाणार! धर्मनिरपेक्षतेच्या नावाने धर्माचेच राजकारण करून सरकार चालवले जाते, हीदेखील एक ‘राष्ट्रीय दांभिकता’च होय!

– सुभाषचंद्र निर्मळ

जुन्या आठवणींना तरतरी

विनायक जोशी यांच्या ‘स्वरभावयात्रा’ सदरात गायिका सुमती टिकेकर यांच्यावरील लेख वाचला आणि जुन्या आठवणी दाटून आल्या. मीही संगीतकार एम. जी. गोखले यांच्याकडे व्हायोलिन शिकायला जायची. हा लेख वाचताना गोकुळदास देवजीची वाडी, तो जिना, ती वाद्यांनी भरलेली खोली, गोखले सर, त्यांची पत्नी सारे डोळ्यापुढे येत गेले. क्षणभर मी त्या वातावरणात गेले. सुमती टिकेकर म्हणजे सात्त्विक, सुंदर चेहरा. गिरगावात त्या नेहमी दिसायच्या. गेले ते दिन गेले. परंतु या लेखामुळे आमच्या जुन्या आठवणींना तरतरी आली व क्षणभर का होईना, आम्ही सुखावलो.

– अरुंधती गोसावी, मुंबई</strong>