गिरीश कुबेर आणि संतोष प्रधान यांनी शरद पवारांची घेतलेली मुलाखत वाचली. ‘मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे बहुभाषिकांचा पगडा आहे, केवळ मराठी मतांवर निवडणुका जिंकता येत नाहीत,’ असे विश्लेषण करताना त्यांनी मराठी माणसाच्या कष्ट टाळण्याकडे असलेल्या कलाकडे अंगुलिनिर्देश केला आहे. नाका कामगार, बांधकामावरील मजूर, भाजीविक्री, इस्त्री, रद्दी, भंगार सामानाची खरेदी-विक्री, मोटारदुरुस्ती, चहाच्या आणि पानाच्या टपऱ्या अशा अनेक व्यवसायांत मराठी माणसे नगण्य आहेत हे खरे; परंतु अगदी पूर्वीपासून बहुतांश गिरणी कामगार, माथाडी कामगार, रेल्वे स्टेशनवरचे बिल्लाधारी हमाल असे अनेक कष्टकरी मराठीच होते. आपल्या कार्यक्षमतेकरता जगभर गाजलेले डबेवालेसुद्धा मराठीच आहेत. दारोदार वणवण भटकून कुरिअर पोहोचवणारी बहुतांश कष्टाळू मुलेही मराठीच आहेत. तीच गोष्ट चित्रपट व्यवसायात सेटवर राबणाऱ्या अनेक कामगारांबद्दल म्हणता येईल. असे असताना पवारांसारख्या अनुभवी नेत्याने केलेले हे विधान आश्चर्यकारक वाटते. मुंबई जेव्हा ७० च्या दशकात कात टाकून सध्याच्या रूपातील आर्थिक राजधानी होण्याकडे पावले टाकू लागली होती तेव्हा महाराष्ट्राच्या एकूणच राजकारणात काही मूलभूत चुका झाल्या (किंवा केल्या गेल्या) असे वाटते. अशा चुका नंतर अगदी कितीही वाटले तरी सुधारता येत नाहीत. मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे ‘महाराष्ट्रात प्रादेशिक पक्षांच्या वाढीवर नेहमीच मर्यादा आल्या आहेत..’ याची मुळे या चुकांत आहेत. त्याची कारणमीमांसा करताना मराठी माणसे कष्ट टाळतात असे सुचवणे बरोबर वाटत नाही.
प्रसाद दीक्षित, ठाणे

संवेदनशील लेख
दासू वैद्य यांचा ‘रस्ता रोको’ हा लेख फारच आवडला. या लेखामध्ये सांगितलेल्या घटना वर्तमानाशी इतक्या सुसंगत वाटतात, की जणू काही आज सकाळचाच अनुभव ते वर्गात आल्याबरोबर विद्यार्थ्यांना वा आपल्या सहकाऱ्यांना सांगत आहेत असे वाटले. विशेषत: ‘आजकाल अपघाताचं काही सांगता येत नाही. या शहरात ट्रक आणि विमानाचेही अपघात झाले आहेत’ तसेच ‘इतक्या मिरवणुका सहन करणारा देश जगात कुठेच नसेल’ यांसारखी विधाने किंवा ‘बहुतेक पोरांच्या आजच्या भविष्यात अचानक धनलाभ व आमच्या भविष्यात संकटातून सुखरूप सुटका’ हे वाक्य व ‘सल्लूची जाहिरात’ ही कल्पना इतकी सुंदर आहे!
लहुकुमार खंडाळे

‘गगनिका’.. माहितीपर, रोचक
गेले वर्षभर सुरू असलेले सतीश आळेकर यांचे ‘गगनिका’ हे सदर अतिशय वाचनीय आहे यात शंका नाही. खासकरून त्यांनी ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाची निर्मिती आणि सादरीकरणाविषयी दिलेली सविस्तर माहिती वाचून तर त्या नाटकाविषयीच्या आमच्या ज्ञानात चांगलीच भर पडली. आळेकरांच्या अप्रतिम लेखांमुळे ‘घाशीराम’बद्दल बरेच काही कळले. याखेरीज त्यांनी लिहिलेले त्यांच्या नोकरीच्या काळातले अनुभव, शिवाय नाटय़लेखन आणि निर्मिती याविषयीचे त्यांचे अनुभव हेदेखील फार दिलचस्प वाटले. असे हे माहितीपूर्ण आणि तितकेच मनोरंजक सदर आता समाप्त होणार, ही गोष्ट जीवाला चटका लावून जाते.
सुधीर देवरुखकर