परीक्षेवरुन घरी निघालेले दुचाकीस्वार तरुण पिकअप गाडीच्या धडकेने मृत्युमुखी पडले. पुणे- सोलापूर रस्त्यावर कुंजीरवाडी परिसरात मंगळवारी ही दुर्घटना घडली.

आशीष बाळासाहेब भागवत आणि  त्याचा मित्र बाबुराव महादेव माळी ( दोघे रा. उरुळी कांचन) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पिकअप गाडीचालक संतोष भीमराव देशमुख (वय ३३, रा. बावडा, इंदापूर) याला लोणीकाळभोर पोलिसांनी अटक केली. आशीष आणि बाबुराव हे अभियांत्रिकी शाखेत होते. नोकरी करुन ते शिक्षण घेत होते. मंगळवारी त्यांची पुण्यातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात परीक्षा होती.

परीक्षेवरुन ते दोघे जण दुचाकीवरुन दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घरी निघाले होते. कुंजीरवाडी परिसरात भरधाव पिकअप गाडीने दुचाकीस्वार आशीष आणि बाबुराव यांना धडक दिली. यामध्ये ते दोघे जागीच मृत्युमुखी पडले, अशी माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस  निरीक्षक बंडोपंत कौंडुभैरी यांनी दिली.