महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत नेमण्यात आलेल्या चंद्रशेखर धर्माधिकारी समितीच्या दोन तृतीयांश शिफारशी स्वीकारण्यात आल्या आहेत. या समितीने केलेल्या सर्व शिफारशी स्वीकारण्यायोग्य असून त्या शिफारशींवर संबंधित खात्याशी चर्चा सुरू आहे, अशी माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शुक्रवारी दिली.
पुणे पोलीस आयुक्तालयास शुक्रवारी सकाळी पाटील यांनी अचानक भेट देऊन अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, महाराष्ट्र हे नेहमीच पुरोगामी राज्य म्हणून राहिले आहे. दिल्ली घटनेच्या अडीच वर्षांपूर्वीच महिलांच्या सुरक्षितता व इतर प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी धर्माधिकारी यांची समिती नेमण्यात आली. दीड वर्षे या समितीने राज्यातील विविध भागात जाऊन सखोल अभ्यास करून राज्य शासनाला शिफारशी केल्या आहेत. या शिफारशी विविध विभागाशी संबंधित आहेत. केलेल्या शिफारशीपैकी दोन तृतीयांश शिफारशी स्वीकारण्यात आल्या आहेत. या समितीने केलेल्या सर्व शिफारशी स्वीकारण्याजोग्या आहेत. राहिलेल्या शिफारशींवर चर्चा सुरू आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.