पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक महत्त्वपूर्ण विषय शासनाकडे प्रलंबित आहेत. विकासाचे श्रेय राष्ट्रवादीला मिळू नये, राष्ट्रवादीची वाढ होऊ नये म्हणून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जाणीवपूर्वक अडवणूक करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी चिंचवड येथे बोलताना केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरीतील अनेक विषय निर्णयाविना पडून आहेत. राष्ट्रवादीची कोंडी करण्यासाठीच मुख्यमंत्री निर्णय घेत नाहीत, असा आरोप राष्ट्रवादीच्या आमदारांनी वेळोवेळी केला आहे. िपपरीसह पुण्यातील कामेही होत नसल्याचे सांगत त्यात काकडे यांनी भर घातली आहे. रविवारी राष्ट्रवादीच्या चिंचवडच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली. पुणे, िपपरीतील फाईली मुख्यमंत्री हेतूपूर्वक अडवून धरतात. ‘म्हाडा’च्या एफएसआयमध्ये वाढ करणे, बीडीपी, नव्याने समाविष्ट झालेली ३४ गावे आदींशी संबंधित अनेक कामांचे निर्णय मुख्यमंत्री घेत नाहीत. राष्ट्रवादीची ताकद वाढेल, अशी भीती त्यांना असावी. सत्तेतील मित्रपक्ष मदत करत नाहीत आणि कामे होत नसल्याने विरोधक टीका करतात, अशा अडचणीत आपण आहोत. पुढचे दोन महिने आपल्या हातात आहेत. मोदींचा प्रभाव कायम असल्याने विधानसभा सोप्या नाहीत. आपण जमिनीवर आलो नाही, तर लोक आपल्याला स्वीकारणार नाहीत, असे ते म्हणाले.