मराठीतले पहिले दैनिक ‘ज्ञानप्रकाश’, महात्मा गांधींचे मुखपत्र ‘हरिजन’ जेथे छापले जात होते तो नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी सुरू केलेला आर्यभूषण छापखाना संचालक मंडळाने थेट विक्रीला काढल्याचा आरोप होत आहे. ऐतिहासिक वारशाचा दर्जा मिळालेल्या या इमारतीत बदल करण्यात येत असल्याबद्दल नामदार गोखले यांचे पणतू अॅड. सुनील गोखले यांनी स्पष्ट आरोप केला. दरम्यान, या वास्तूला कोणताही धक्का लावला जाणार नसल्याचे स्पष्टीकरण महाराष्ट्र सहकारी मुद्रणालय या संस्थेचे संचालक अंकुश काकडे यांनी दिले आहे. अॅड. गोखले यांनी आरोप करताना सांगितले, की आर्यभूषण छापखान्याची सध्याची जमीन ही मुळात सर्व्हट्स ऑफ इंडिया सोसायटीची आहे. संचालक मंडळाने जळगाव येथील एका प्रकाशन संस्थेशी संबंधित व्यक्तीला छापखान्याच्या आवारात १५ हजार चौरस फूट जागेवर बांधकाम करण्याची परवानगी दिली आहे. त्या शिवाय या ऐतिहासिक वारसा असलेल्या मूळ वास्तूमध्ये तोडफोड करण्यात येत आहे. सहकार खात्याच्या आणि पुरातत्त्व खात्याच्या परवानगीशिवाय हे बदल करण्यात येत आहेत.‘संचालक मंडळाने केलेले बदलही बेकायदेशीर असून, या संस्थेचे खासगीकरण करण्यासाठी जळगावच्या व्यक्तीशी करण्यात आलेला करार रद्द करण्यात यावा. त्याचप्रमाणे संचालक मंडळ बरखास्त करून त्यांच्यावर कायदेशीर प्रक्रिया सुरू करावी. त्याचप्रमाणे संस्थेची जागा ही मूळ मालक म्हणजेच सर्व्हट्स ऑफ इंडिया सोसायटीकडे देण्यात यावी,’ अशी मागणीही अॅड गोखले यांनी केली आहे.वास्तूला धक्का लावणार नाही’‘‘आर्यभूषण मुद्रणालयाच्या वास्तूला धक्का लावणार नाही, तेथे कोणतेही बांधकाम होणार नाही. मधल्या काळात तेथे चोरी झाल्यामुळे तेथे पत्रे लावण्यात आले आहेत. या उलट नामदार गोखले स्मृति शताब्दीनिमित्त गोखल्यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण केले. महापालिकेला सांगून नगरसेवकांसाठी गोखले यांच्या नावाने उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सुरू केला. जळगावच्या व्यक्तीशी करण्यात आलेला करार हा छापखाना चालू राहण्यासाठी करण्यात आला आहे. त्यामुळे संस्थेला फायदाच होणार आहे, वास्तू जतन करण्यासाठीच होणार आहे. गोखले यांच्या पुतळ्याची दुरवस्था झाली होती, तेव्हा तिकडे कोणीही फिरकले नव्हते, आता संचालक मंडळावर खोटे आरोप केले जात आहेत.’’- अंकुश काकडे (महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयाचे संचालक)