‘‘भारतीय संस्कृती वैज्ञानिक आहे, पण काही लोकांनी तिला बदनाम केले. ज्यांना धर्माचे काही माहीत नाही असे लोक धर्माचा प्रचार करतात. मी धर्म मानतो, पण पाखंड मानत नाही. मी अजून कमीत-कमी पन्नास वर्षे जगेन आणि जगात धर्माचा झेंडा उभारेन,’’ असे प्रतिपादन योगगुरू बाबा रामदेव यांनी गुरुवारी केले. ‘अनेक लोक राशीभविष्य आणि हस्तरेखांना फार महत्त्व देतात. मी आजवर कधीही मुहूर्त पाहिला नाही. जे केले तोच शुभमुहूर्त होता,’ असेही ते म्हणाले.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उभारण्यात आलेल्या ‘रामकुमार-शोभा राठी योग केंद्रा’चे गुरुवारी बाबा रामदेव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी राठी दांपत्यासह रुग्णालयाचे विश्वस्त हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, भारती मंगेशकर, आदीनाथ मंगेशकर, वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर या वेळी उपस्थित होते. ६ हजार चौरस फुटांच्या जागेत उभारलेला हा योग विभाग १ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

बाबा रामदेव म्हणाले, ‘‘सकाळच्या राशीभविष्याला सर्वाधिक टीआरपी असतो. राम आणि रावण, कृष्ण आणि कंस यांच्या राशी एक होत्या. तसेच रामदेव आणि राहुल गांधी यांचीही राशी एक आहे! माझ्या हातावर भाग्यरेखा नसूनही मी अनेकांचे भाग्य बदलले आहे. भूत-प्रेत, शनी, राहू, केतू हे फक्त आपल्यालाच का, आणि चीन, अमेरिका, पाकिस्तान यांना ते का नाहीत? ते असतीलच तर सीमा सुरक्षा दलाऐवजी भुताखेतांचाच वापर करायला हवा. आपण फार अंधविश्वासी असतो. धर्माच्या नावावर याचा धंदा केला जातो. पृथ्वी, सूर्य, चंद्र देवाने बनवले आहे मग त्यांच्यामुळेच बनलेला काळ हा अशुभ कसा असेल! भारतीय संस्कृती वैज्ञानिक आहे, पण काही बाबा कृपा करण्याचा धंदा चालवतात. धर्मात कधीही अवैज्ञानिकता नव्हती.’’ संपूर्ण जीवन हाच योग असून आपण एकाग्रतापूर्वक जे करू तो योग, असेही रामदेव यांनी सांगितले.

‘पाकिस्तानमधील गरिबीमुळे शत्रुत्व’

सातव्या भारतीय छात्र संसदेत ‘बहुराष्ट्रीय कंपन्या तारक की मारक’ या विषयावर रामदेवबाबा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ‘पाकिस्तानमध्ये गरिबी आहे. ही गरिबी दूर झाली तर भारत आणि पाकिस्तानमधील शत्रुत्वही नष्ट होईल,’ असे मत रामदेव बाबा यांनी या वेळी व्यक्त केले. पाकिस्तानमध्ये योगा शिकवण्यासाठी जाणार आहे त्याचप्रमाणे यापुढे पाकिस्तानबरोबरच नेपाळ, बांगलादेश आणि आफ्रिका या देशांमध्येही पतंजलीची उत्पादने उपलब्ध होतील,’ अशी घोषणाही त्यांनी या वेळी केली. रामदेवबाबा म्हणाले, ‘‘पतंजलीची जीन्स देखील येणार का असा प्रश्न हल्ली मला विचारला जातो. पतंजलीची जीन्स का नसावी? विदेशी कंपन्या भारतात येऊन १ रुपया गुंतवतात आणि शंभर रुपये घेऊन जातात. परदेशी कंपन्या त्यांच्याकडे तंत्रज्ञान असल्याचे सांगून आपल्याला मूर्ख बनवतात. तेल, शाम्पू, साबण तयार करण्यासाठी असे काय तंत्रज्ञान लागते? त्यांच्याकडे तंत्रज्ञान असेलच तर ते घेऊ पण उत्पादन भारतातच करू. पतंजलीने आतापर्यंत १ लाख तरुणांना रोजगार दिला असून पुढील पाच वर्षांत १ लाख कोटी रुपयांपर्यंत व्यवसाय करण्याचे उद्दिष्ट आहे.’’

‘विवाह केलात तर पत्नी चांगली हवी’

रामदेव म्हणाले, ‘‘पत्नी चांगली असेल तर माणूस काहीही बनू शकतो, परंतु ती तुमच्याशी चांगले वागत नसेल तर पती नेहमी ताणाखाली राहतो. त्यामुळे अविवाहित राहिलात तर चांगले आणि विवाह केलात तर पत्नी चांगली हवी. पती-पत्नीमध्ये इतके प्रेम हवे की दोन अस्तित्व असूनही मने एक हवीत. याला आदर्श गृहस्थ जीवन म्हणतात.’’