देशाच्या सीमांचे निधडय़ा छातीने रक्षण करताना शत्रूच्या गोळ्यांनी अपंगत्व आलेल्या सैनिकांच्या पोलादी मनगटांना नृत्याची मानवंदना देण्यात आली. बहीण-भावाचे रक्ताचे नाते नसले तरी चाकाच्या खुर्चीवर बसून जीवनाची दुसरी लढाई लढत असलेल्या अपंग सैनिकांना औक्षण करून प्रेमाने लाडूचा घास भरवित रविवारी अनोखी भाऊबीज साजरी करण्यात आली. साईनाथ मंडळ ट्रस्ट आणि सैनिक मित्र परिवारातर्फे खडकी येथील अपंग सैनिक पुनर्वसन केंद्रातील सैनिकांसाठी आयोजित भाऊबीज कार्यक्रमात प्रसिद्ध भरतनाटय़म नृत्यांगना स्वाती दैठणकर, नूपुर दैठणकर यांनी सनिकांना औक्षण करुन त्यांच्याशी संवाद साधला. या माय-लेकीने नृत्यवंदनेतून सैनिकांना अभिवादन केले. केंद्राचे प्रमुख पी. आर. मुखर्जी, कर्नल बी. एल. भार्गव, ट्रस्टचे अध्यक्ष पीयूष शहा, सैनिक मित्र परिवाराचे आनंद सराफ, शंकर निंबाळकर, साहिल केळकर, प्रसाद भडसावळे, सुवर्णा गोडबोले, संगीता मावळे, प्रशांत पंडित, स्वाती रजपूत, संकेत निंबाळकर, नरेंद्र व्यास, नंदा पंडित, गंधाली शहा, कल्याणी सराफ, अनिल दिवाणजी, समृद्धी पाटेकर, पूर्वा देशपांडे उपस्थित होते. या उपक्रमाचे यंदा चौथे वर्ष होते. स्वाती दैठणकर म्हणाल्या,‘ देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांमुळेच आम्ही सुखाने दोन घास खाऊ शकतो, याची आम्हाला जाण आहे. युवकांच्या मनात देशाविषयी आणि सन्याविषयी आपुलकीची भावना जागृत करण्याकरिता आम्ही नृत्यातून नेहमीच प्रयत्न करतो.’ मुखर्जी म्हणाले,‘ अपंगत्व आल्यानंतर सनिकांचे पुढील आयुष्य अवघड असते. त्यामुळे सनिकांसमवेत सण उत्सव साजरे केल्याने त्यांचे मनोबल वाढते. अपंगत्व आले असले तरीही प्रत्येक सनिकामध्ये सकारात्मकता असल्याने कोणत्याही संकटाला ते धर्याने सामोरे जातात. केवळ सैनिकच नाही तर देशातील प्रत्येक जण आपल्या क्षेत्रात योगदान देत देशसेवाच करीत असतो.’ अपंग सैनिक भोपालसिंग चौधरी म्हणाले,‘ आमच्या कुटुंबीयांसमवेत भाऊबीज साजरी केल्याचा आनंद मिळाला. अपंगत्व आले असले तरी आमचे मनोबल खचलेले नाही.’