मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यकर्ता मेळाव्यात आवाहन सत्ता मिळाल्यानंतर दोन वर्षांत केंद्रात व राज्यात जनहिताचे अनेक निर्णय सरकारने घेतल्याचे सांगत उर्वरित तीन वर्षांत देशाचे व महाराष्ट्राचे चित्र पूर्णपणे बदलून जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी तळेगावात बोलताना व्यक्त केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका भाजपलाजिंकायच्या आहेत, त्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे यांच्या पुढाकाराने तळेगावातील सुशीला मंगल कार्यालयात झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, बाबुराव पाचर्णे आदींसह मोठय़ा संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, काश्मीरमध्ये आपले राज्य आले. जिथे काही जनाधार नव्हता, त्या केरळ व तामिळनाडू येथे पक्षाची ताकद वाढली आहे. गेल्या दोन वर्षांत मोदी सरकारने सामान्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. देशाचे चित्र बदलणारा, स्वच्छ भारताचा कार्यक्रम मोदी सरकारने दिला आहे. चंद्रावर, मंगळावर जाण्याचे स्वप्न पाहायचे आणि गावात शौचालय नाही, स्वच्छता नाही, ही विडंबना दूर झाली पाहिजे. आम्ही दोन वर्षांत काय केले, याचा लेखाजोखा मागणाऱ्यांनी गेल्या ५० वर्षांत काय दिवे लावले आहेत. त्यांनी केवळ स्वहित पाहिले, स्वविकास केला आणि आमच्यावर ते आरोप करत आहेत. महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक होत असून जगात कुठेही गेलो तरी गुंतवणुकीसाठी पुण्याला पसंती दिली जाते, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. पुणे जिल्ह्य़ातून राष्ट्रवादीचे घडय़ाळ हद्दपार करण्याचा निर्धार जिल्हाध्यक्ष भेगडे यांनी या वेळी बोलताना केला. बापू भेगडे ‘नॉट रिचेबल’ राष्ट्रवादीचे मावळातील ताकदीचे कार्यकर्ते बापू भेगडे यांच्या भाजप प्रवेशावरून गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत होती. मुख्यमंत्री रविवारी मावळात आल्याने तो प्रवेश होणार का, याविषयी राजकीय वर्तळात उत्कंठा होती. तथापि, भेगडे ‘नॉट रिचेबल’ होते. ते परदेशात असल्याचे सांगण्यात येत होते.