पुण्यातली एखादी प्रसन्न सकाळ, पोटात भूक, पुणेरी मिसळीची आवड आणि किंचित वेळ असेल तर आवर्जून जावं असं ठिकाण. पौड रस्त्यावर आनंदनगरकडून वनाजकडे जाताना कृष्णा हॉस्पिटल ओलांडले की डावीकडे अजंठा एव्हेन्यूकडे जाणाऱ्या रस्त्यावर वळलात की गाडी पहिल्यांदा जागा मिळेल तिथे लावायची. तिथेच 'जय गणेश मिसळ पाव' नावाची एक हातगाडी दिसेल. बाबुराव क्षत्रिय ऊर्फ खत्रीकाका हसतमुखाने तुमचे स्वागत करतात. मिसळीची ऑर्डर दिल्यावर लगेच थोडासा उकडलेला बटाटा, त्यावर सुंदर शिजवलेले कांदेपोहे ,आलं-लसूण, ओला नारळ, सुकं खोबरं यांचे किंचित मीठ घालून केलेले वाटण, ‘पेशल’ मिसळीचा मसाला, त्यात अगदी माफक तेल घालून केलेला रस्सा तुमच्या समोर येईल. त्याच्या जोडीला पाव. मिसळीचा रस्सा संपला तर परत वाढून ते कुठल्याही कोलेजात न शिकवले जाणारे आदरातिथ्य कृतीतून दाखवून देतात. ह्या मिसळीचा खरा USP ते सांगतात तो म्हणजे, चांगले आणि घरगुती पदार्थ वापरलेले असल्याने ही मिसळ खाऊन ग्राहकांना कधी जळजळ ,तिखटाचा त्रास होत नाही. प्रत्येक मिसळ खाणा-याला आवर्जून त्याचा Feedback विचारतात. आपल्याला आवडली हे त्यांना सांगितलं तर त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान बघण्यासारखेच असते. तरीही त्या आनंदात फार गुंतून न राहता पुन्हा नव्या उत्साहात पुढच्या ग्राहकाला मिसळ खाऊ घालण्यात मग्न होतात. पण मला त्यांच्या मिसळीएवढीच अजून एक गोष्ट आवडते ते म्हणजे त्यांची उद्यमशीलता . बरीच वर्षे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी इमानेइतबारे नोक-या केल्या. आपल्या मुलींची, मुलाचे लग्न आणि इतर सगळी कर्तव्ये पार पाडली. आता त्यांचे सगळ्यांचे सुखी संसार बघूनही हा माणूस अजूनही कामाला कंटाळला नाहीये, हे मला तेवढेच आवडते. वयाच्या साठीनंतरही ते पहाटे उठून नियमितपणे मिसळ बनवायच्या उद्योगाला लागतात. मिसळीची पूर्वतयारी करायला त्यांना घरच्या बायकांची मदत असतेच, हे पण ते नक्की सांगतात. घरून मिसळीचा रस्सा आणि पाव आणून ते सकाळी आठच्या आसपास त्यांच्या गाडीवर हजर होतात. मिसळीचा रस्सा सतत गरम करत, त्यांच्याकडे येणाऱ्या सगळ्या स्तरातल्या ग्राहकांशी बोलत दुपारपर्यंत त्यांचा वेळ पण छान जातो. सकाळी आपली घरची कामे आटपून त्यांच्या सौभाग्यवती पण त्यांना मदत करायला गाडीवर हजर होतात. त्यांच्या वयाच्या माणसांसाठी त्यांचे हे निवृत्तीनंतरचे जगणे एक वेगळा आदर्श आहे. त्यांचे ग्राहकांची चौकशी करणे, त्यांच्या चवीची आठवण ठेवणे, हे गुण कुठल्याही दुकानदाराने घेण्यासारखे आहेत. मला त्यांच्यातली ही कार्यशीलता, उद्यमशीलता त्यांच्या मिसळीएवढीच आवडते. आपल्याकडे आयुष्यभर नोकरी करणारे साठीनंतर सहसा फार काम करायच्या फंदात पडत नाहीत. व्यवसाय करायच्या वाट्याला तर शक्यतो जातच नाहीत. खत्रीकाका अशा व्यक्तींपेक्षा फारच वेगळे आहेत. त्यांचा उत्साह आणि चेहऱ्यावरचे हास्य कायमच बघण्यासारखे, अगदी त्यांच्याकडच्या मिसळीवरच्या तर्री सारखे!! - अंबर कर्वे