‘ब्लू मॉरमॉन’ हे राज्य फुलपाखरू म्हणून निवडण्यात आले खरे, पण अभ्याकांनी त्याची दुसरी बाजू उजेडात आणली आहे. ती म्हणजे हे फुलपाखरू लिंबू व संत्रावर्गीय वनस्पतींवर तण म्हणून जगते. त्यामुळे ते राज्य फुलपाखरू ठरल्यामुळे विदर्भातील संत्राउत्पादकांच्या चिंता वाढण्याची भीतीही अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. राज्य वन्यजीव मंडळाची बैठक गेल्या सोमवारी नागपूर येथे झाली. त्यात ‘ब्लू मॉरमॉन’ला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित करण्यात आले. मात्र, या निर्णयावर फुलपाखरांच्या अभ्यासकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि परिपूर्ण माहिती न घेताच हा निर्णय घेतला असल्याची टीका त्यांनी केली आहे. ईशान्य भारत हे फुलपाखरांचे नंदनवन. तेथील प्रसिद्ध भीमताल तलावाजवळील फुलपाखरू संशोधन केंद्रातील अभ्यासक पीटर स्मेटासेक यांनी याबाबत भूमिका घेतली आहे. विविध पर्यावरण अभ्यासक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ते या गोष्टीचा प्रसार करत आहेत. त्यांची ही भूमिका व्हॉट्स अॅपच्या विविध ग्रुपमध्ये पसरवली जात आहे. पीटर यांनी म्हटले आहे, की ‘ब्लू मॉरमॉन’ ला राज्य फुलपाखरू घोषित करण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय परिपूर्ण अभ्यासावर आधारित नाही. हे फुलपाखरू लिंबू (संत्रा)वर्गीय वनस्पतींवर तण म्हणून जगते. त्यामुळे उत्पादनात घटही येते. या फुलपाखराचा उपद्रव वाढल्यास संत्रा, लिंबू यांचे पीक घेणारे शेतकरी त्याच्या वर नियंत्रण आणण्यासाठी कोणताही मार्ग अवलंबू शकणार नाहीत. या निर्णयाबाबत ज्या कोणी आग्रह धरला असेल, त्यांना वन्यजीवांबाबत फारशी माहिती असल्याचे दिसत नाही. महाराष्ट्राप्रमाणे इतर राज्यांनी तरी अपुऱ्या माहितीच्या आधारे असा निर्णय घेऊ नये. पीटर यांच्यासोबत विदर्भातील काही अभ्यासकही ही माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यात गुंतले आहेत. सरकारच्या निर्णयाचे काय होणार याची कल्पना नाही, पण या फुलपाखराबाबत वस्तुस्थिती तरी लोकांपर्यंत पोहोचायला हवी, अशी प्रतिक्रिया काही अभ्यासकांनी दिली.