मुख्यमंत्र्यांचे ‘व्हिजन २०१७’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी पिंपरी-चिंचवड शहरात आले आणि राष्ट्रवादीला खिंडार पाडून गेले. राज्यातील नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप पहिल्या स्थानावर पोहोचल्याचे सांगत आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही अशाच निकालाची पुनरावृत्ती होणार असल्याचे भाकीत त्यांनी केले. पिंपरीच्या ‘लक्ष्य २०१७’ साठी बलाढय़ राष्ट्रवादीशी दोन हात करण्याचे काम भाजप आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांनी सुरू केले आहे, त्यांना मुख्यमंत्र्यांनी पूर्ण पाठबळ दिले आहे. केंद्रात आणि राज्यात असलेली सत्ता, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिश्मा, मुख्यमंत्र्यांची कृपादृष्टी आणि ताकदीचे स्थानिक नेतृत्व आदी गोष्टींमुळे अजित पवारांच्या ताब्यात असलेल्या पिंपरी पालिकेत ‘परिवर्तन’ घडवण्याची भाजपची व्यूहरचना आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पिंपरी-चिंचवडचा धावता दौरा केला. आमदार महेश लांडगे यांच्या भोसरी ‘व्हिजन २०२०’ या अभियानाचे उद्घाटन आणि भाजपचे माजी शहराध्यक्ष एकनाथ पवार यांच्या युवा शक्ती फाउंडेशनच्या कौशल्य विकास कार्यालयाचे उद्घाटन या कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली. या निमित्ताने शहर भाजपमधील वातावरण अक्षरश: ढवळून निघाले. तीन महिन्यांनंतर होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर हा दौरा तसा महत्त्वाचा होता. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रभावक्षेत्रात राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याचे काम भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी सुरू केले आणि नुकतेच भाजपमध्ये आलेल्या आमदार महेश लांडगे यांनी ते आणखी पुढे नेले. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लांडगे यांचे ९ समर्थक नगरसेवक, एका नगरसेवकाचा मुलगा, ११ माजी नगरसेवक आणि नगरसेवकाच्या तोडीचे अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये आले. यापूर्वी, जगताप समर्थकांनी टप्प्याटप्प्याने राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अलीकडच्या काळात म्हणजे पालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपची ताकद मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. २०१२ च्या निवडणुकीत भाजपचे अवघे तीन नगरसेवक निवडून आले होते आणि आता पालिका ताब्यात घेण्याची भाषा भाजपमध्ये सुरू आहे. भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या जशी वाढत जाईल, तसतसे भाजप नेत्यांची डोकेदुखीही वाढणार आहे. यापूर्वी, राष्ट्रवादीकडे इच्छुकांची तोबा गर्दी होत होती. कारण, राष्ट्रवादीचे तिकीट घेतले, की हमखास निवडून येणार, अशी खात्री होती.

आता भाजपचे वारे असल्याने तीच गर्दी भाजपकडे झाली आहे. लढण्यासाठी मर्यादित जागा मात्र इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे उमेदवारी कोणाला द्यायची आणि कोणाची नाराजी पत्करायची, हा नाजूक प्रश्न भाजप नेत्यांपुढे आहे. ज्या जुन्या कार्यकर्त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत पक्षाचे काम केले, त्यांची अवस्था सध्या वाईट आहे. त्यांना हिंग लावून कोणी विचारत नसल्याने उमेदवारी देण्याचा विषयच येत नाही. निवडून येण्याची क्षमता नाही, खर्चाची ताकद नाही, असे सांगत त्यांना बाजूला सारण्यात येत आहे. दररोज नव्यांचा भरणा होत असताना जुन्यांना पद्धतशीरपणे डावलण्यात येत असल्याची भावना पक्षवर्तुळात आहे. त्यात भर म्हणजे भाजप, शिवसेना व रिपाइं यांची महायुती होण्याच्या हालचाली सुरू आहेत. तसे झाल्यास शिवसेना व रिपाइंला काही जागा द्याव्या लागणार आहेत. मग, उरल्या-सुरल्या जागेत भाजपमध्ये प्रचंड संख्येने जमा झालेल्या इच्छुकांचे काय करायचे, महायुतीचे नक्की काय, असे प्रश्न सर्वापुढे आहे. त्यावर सध्यातरी कोणाकडे उत्तर नाही. सत्तारूढ राष्ट्रवादीचा खरा सामना भाजपशी आहे. कारण, केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. शहराच्या तसेच नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे जे विषय आहे, त्याचा अंतिम निर्णय सरकार दरबारीच होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने शहराध्यक्ष जगताप व आमदार लांडगे यांनी, या दौऱ्याच्या निमित्ताने शहरातील प्रश्नांची जंत्री पुन्हा त्यांच्यापुढे मांडली. अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, रेडझोन या कायम प्रलंबित असलेल्या प्रश्नांसह िपपरीला दुय्यम स्थान मिळते. शहरातील ७५ हजार विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पुण्यात जावे लागते. नामांकित शिक्षण संस्थांना जागा उपलब्ध केल्या जात नाहीत. औंध उरो रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालयाची गरज आहे, न्यायालयासाठी जागा हवी आहे, असे अनेक मुद्दे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. िपपरी पालिकेतील भ्रष्ट कारभाराची प्रकरणे भाजपने बाहेर काढली असून त्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश आयुक्तांना देण्यात यावेत, अशी गळही मुख्यमंत्र्यांना घालण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात या प्रश्नांचा आवर्जून उल्लेख केला. वाढते शहरीकरण, अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, रेडझोन, बफर झोन, कचरा डेपो, पाणीपुरवठा, ‘वाय-फाय’ शहर व स्वतंत्र पोलीस आयुक्तालय इतकेच नव्हे तर आळंदीला पाणीपुरवठा अशा विविध प्रश्नांचा ऊहापोह त्यांनी केला. मात्र, ठोस काही विधान केले नाही. मुख्यमंत्री काहीतरी लोकप्रिय घोषणा करतील, अशी अटकळ होती. मात्र, राजकीय फायदा मिळवून देणाऱ्या ‘त्या’ घोषणांसाठी ही योग्य वेळ नसल्याची बाब लक्षात घेतली. शहरात येण्याची ही पहिली वेळ असली, तरी शेवटची नसल्याने यापुढे वारंवार येत राहीन, असे सांगत त्यांनी घोषणाबाजी टाळली. मात्र, येथील प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आपली आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. िपपरीत अजितदादांशी सामना करायचा असल्यास स्थानिक नेत्यांना मुख्यमंत्र्यांचे पाठबळ गरजेचे आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांचा शहर भाजपला काही उपयोग होईल, असे वाटत नाही. अजित पवारांशी ते पंगा घेतील, असे भाजपमध्ये कोणालाच वाटत नाही. मात्र, भाजप-राष्ट्रवादी अंतस्थ युती असल्याची कितीही चर्चा राजकारणात होत असली, तरी पिंपरी पालिकेच्या निवडणुकाजिंकण्यासाठी मुख्यमंत्री स्थानिक नेतृत्वाला अपेक्षित ताकद देत आहेत, असे दिसते. कारण, पिंपरीत परिवर्तन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे ‘व्हिजन’ स्पष्ट आहे.