नागरिकांची मते घेताना दिशाभूल; प्रत्येक प्रश्नाला सकारात्मक पर्याय ‘एक पाऊल स्वच्छतेकडे’ असा संदेश देत सुरू झालेल्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत नागरिकांची मते घेताना हेतूत: दिशाभूल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महापालिका प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांबाबत नागरिकांचा अभिप्राय (फिडबॅक) जाणून घेताना त्यांना प्रतिक्रिया देण्यासाठी सर्व सकारात्मक पर्यायच उपलब्ध करून देण्यात आले असून शहर स्वच्छ आहे का, कचरा उचलला जातो का, अशा प्रश्नांच्या उत्तरांसाठी ‘होय’ हाच पर्याय देण्यात आल्यामुळे अशा अनुकूल सर्वेक्षणाच्या माध्यमातून राज्य शासनाने आणि महापालिकेने स्वत:ची पाठ थोपटून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील कचऱ्याच्या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. ती सोडविण्यासाठी महापालिकेच्या स्तरावर विविध उपाययोजनाही केल्या जात आहेत. केंद्र सरकारनेही ‘स्वच्छ भारत’ अभियानाअंतर्गत शहर स्वच्छतेला महत्त्व दिले आहे. या अभियनाची राज्य शासनाच्या पातळीवरून अंमलबजावणी होत असून त्याअंतर्गत महापालिकेकडून योग्य उपाययोजना केल्या जात आहेत की नाही, यासाठी नागरिकांचा अभिप्राय जाणून घेण्यात आला. मात्र हा अभिप्राय जाणून घेण्याची प्रक्रिया ही केवळ फार्स ठरल्याचे दिसून येत आहे. कचरा संकलन, वाहतूक, कचऱ्यावरील प्रक्रिया, घराघरातून उचलला जाणारा कचरा, त्याचे प्रमाण, कचरा वर्गीकरण, शौचालये, वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या सुविधा यासंदर्भातील उपाययोजना आणि नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद या माध्यमातून ही माहिती घेण्यासाठी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली. काही स्वयंसेवी संस्थांचीही त्यासाठी मदत घेण्यात आली. हे सर्वेक्षण करताना महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने क्षेत्रीय कार्यालयांना त्यांच्याकडे असलेल्या नागरिकांचे दूरध्वनी क्रमांक देण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार नागरिकांशी संपर्क साधण्यात आला. तसेच या सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी टोल फ्री क्रमांकही देण्यात आला होता. त्याद्वारेही नागरिकांना सर्वेक्षणात सहभागी होऊन उपाययोजनांबाबत प्रतिक्रिया देता येत होत्या. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाकडून चार ते पाच हजार नागरिकांचे क्रमांक सर्वेक्षणातील पथकांना देण्यात आले. त्यातील काही नागरिकांशी प्रत्यक्ष बोलणे झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र ज्यांनी टोल फ्री क्रमांकावरून सर्वेक्षणाच्या उपक्रमात सहभाग घेतला त्यांना मात्र ‘हो’ उत्तर देण्याशिवाय अन्य पर्यायच ठेवण्यात आला नव्हता. टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर पथकाच्या एका ठरावीक क्रमांकावरून दूरध्वनीवरून हे प्रश्न विचारले जात होते. त्यासाठी १, २, ३ असे विकल्पही देण्यात आले होते. तसेच त्यासाठी ते ते क्रमांक दाबण्याच्या सूचनाही देण्यात येत होत्या. शहराच्या बहुतेक भागातील कचराकुंडय़ा ओसंडून वाहत असतात, उड्डाणपुलांखाली, प्रमुख रस्त्यांवर, चौकांत अस्वच्छता मोठय़ा प्रमाणावर दिसून येते. त्यावर प्रतिक्रिया न विचारता सर्वेक्षणावेळी कचरा योग्य पद्धतीने उचलला जातो का, किती दिवसातून, कशा पद्धतीने उचलला जातो, तक्रारी करता का, त्यांचे निवारण होते असेच प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामुळे शहर स्वच्छ असल्याचे एक प्रकारे नागरिकांकडून वदवूनच घेण्यात येत होते, अशा तक्रारी सर्वेक्षणात सहभागी झालेल्या नागरिकांकडून करण्यात आल्या. तक्रार करण्याची व्यवस्थाच नाही! या सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत प्रत्येक दिवशी पाच हजार अभिप्रायांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांना सहा प्रश्नांची उत्तरे द्यावी लागत होती. तसेच हे प्रश्न सहाशे गुणांचे होते. स्वच्छतेबाबत शहराला चांगले गुण मिळण्यासाठी आटापिटा करून क्षेत्रीय कार्यालयाकंडूनही नागरिकांचे दूरध्वनी क्रमांक सर्वेक्षण करणाऱ्यांना देण्यात आले होते. मात्र सर्वेक्षणात नकारात्मक अभिप्राय देण्याची वा तक्रार करण्याची व्यवस्थाच नव्हती. तशाच पद्धतीचे प्रश्न तयार करण्यात आले होते.