छत्रपती शिवाजी महाराज ‘गो ब्राह्मणप्रतिपालक’ नव्हते या विधानानंतर माझ्यावर जातीयवादाचा आरोप करणाऱ्यांच्या मनात काय खदखदत आहे हे दिसून येते, अशी टिप्पणी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी केली. शिवछत्रपती हे गोब्राह्मण प्रतिपालक नव्हते या तुमच्या वक्तव्यामुळे समाज माध्यमांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्याबद्दल काय वाटते, असे विचारले असता पवार यांनी त्या कार्यक्रमात मी काय चुकीचे बोललो, असा प्रतिप्रश्न केला. त्याला ऐतिहासिक आधार आहे. अफझलखान हा शिवरायांनी मुस्लीम होता म्हणून नाही तर स्वराज्याचा, रयतेच्या राज्याचा शत्रू होता म्हणून मारला. इतिहासाचे पुनर्लेखन व्हावे का हे सांगण्यासाठी मी काही तज्ज्ञ नाही. मात्र, या क्षेत्रातील जाणकारांनी चुकीच्या गोष्टी दुरुस्त कराव्यात, असेही पवार यांनी स्पष्ट केले. काश्मीरमधील परिस्थिती चिंताजनक असून सैन्यदलाचे मनोधैर्य उंचावण्यासाठी देशाला पूर्ण वेळ संरक्षणमंत्र्याची आवश्यकता आहे, असे सांगून पवार म्हणाले, काश्मीरमध्ये दररोज जवान मारले जात आहेत. केंद्र सरकारनी त्याबाबत पावले उचलावीत. एकदम पाकिस्तानबरोबर युद्ध करावं असं मी म्हणणार नाही. परंतु ठोस कारवाई करण्याची गरज आहे. पवार कुटुंबातील सदस्यांची अंमलबजावणी महासंचालनालयामार्फत (ईडी) चौकशी केली जात असल्याच्या बातम्या वारंवार येत आहेत, याकडे लक्ष वेधले असता ‘ईडी’ची कारवाई कधी होतेय याची मी वाटच बघतो आहे’, अशी टिप्पणी पवार यांनी केली. माझी दाउदशी मत्री आहे असे आरोप झाले आणि तुम्ही पत्रकारांनीही ते छापले. पुढे काय झाले? सिंचन खात्यामधे सध्या सत्तर हजार कोटींचा घोटाळा झाला असा आकडा तुम्ही चालवता. गेल्या तीन वर्षांत १० ते २० हजार कोटी रुपयांच्या कामांनाच मंजुरी मिळाली, असेही पवार म्हणाले.