आरती अंकलीकर-टिकेकर यांचे मत ठिपक्यांची रांगोळी काढताना ठिपके हे दिसणारच. पण, रांगोळी काढून झाल्यानंतर ते ठिपके दिसू नयेत याची खबरदारी ही रांगोळी काढणाऱ्याला घ्यावी लागते. संगीतामध्येही असेच काहीसे असते. दोन स्वर म्हणजे आपल्याला संगीत वाटते खरे. पण, या स्वरस्थानांना जोडणारा दुवा म्हणजे संगीत असते, असे मत व्यक्त करीत प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांनी संगीताची साधी-सोपी व्याख्याच सोमवारी उलगडली. वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेत प्रसिद्ध संगीतकार आशुतोष जावडेकर यांनी आरती अंकलीकर-टिकेकर यांची मुलाखत घेतली. घरामध्ये संगीताचे वातावरण असल्याने बालपणापासूनच रागदारी संगीताची आवड निर्माण झाली. रागामध्ये रमण्याची भावावस्था असल्याने चांगलं गायचं हेच ठरविले होते. अभिजात संगीताच्या प्रभावामुळे चित्त शुद्ध होते याची प्रचिती आली, असे सांगून अंकलीकर म्हणाल्या, गुरू-शिष्याचं नातं हे आई-मुलासारखं असतं. मी अनेक गुरूंकडे शिकले असले तरी किशोरीताई आमोणकर यांनाच सर्वश्रेष्ठ गुरू मानते. आवाजाचा लगाव आणि स्वरांमागचा विचार या अनुकरणातून ती भावना केवळ रुजली नव्हे, तर विकसित होत गेली. अनुकरण ही विद्येची पहिली पायरी असते. आत्मशोध नंतर सुरू होतो. संगीतामध्ये रस्ता वेगळा असला तरी शेवटी एकाच ठिकाणी पोहोचायचे असते. म्हणून आपला विचार सक्षमपणे मांडता आला पाहिजे. शास्त्रीय संगीत म्हणजे निर्गुण शक्तीच असते. शब्दांचा आधार न घेता रागाचा भाव हा केवळ स्वरांतून रसिकांसमोर मांडण्याचे अवघड काम गायक करीत असतो. या वेळी त्यांनी ठुमरी गायनाची वैशिष्टय़े आपल्या गायकीतून सादर केली.