नगर जिल्ह्य़ातील खर्डा (ता. जामखेड) येथील सद्गुरू सीतारामबाबा उंडेगावकर (वय ८८) यांचे शुक्रवारी मध्यरात्री पुण्यातील रुबी रुग्णालयात निधन झाल्यानंतर पार्थिव ताब्यात घेण्यावरून व अंत्यविधीच्या ठिकाणाबाबत बाबांच्या भक्तांमध्ये वाद सुरू झाला आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून बाबांचे पार्थिव रुग्णालयातच आहे. अंत्यविधीबाबत निर्माण झालेला तिढा रविवारीही सुटू शकला नसल्याने हा वाद आता थेट न्यायालयापर्यंत गेला असून, बाबांचे पार्थिव ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
उंडेगावकर महाराज गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी निधन झाले. रविवारी खर्डा येथील सीताराम गडावर त्यांच्या समाधी सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, बाबांचे मूळ गाव असलेल्या मराठवाडय़ातील भक्तांनी त्यास विरोध करून बाबांची समाधी मूळ गावी उभारण्याची मागणी करून बाबांच्या पार्थिवाचा ताबा मागितला. बाबांनी बहुतांश कार्य खर्डा भागामधून केले. त्यांचा जन्म परभणीच्या जिंतूर तालुक्यातील सावरगाव येथे झाला. त्यामुळे नगरसह मराठवाडा भागामध्ये बाबांचे मोठय़ा प्रमाणावर शिष्य आहेत.
बाबांच्या पार्थिवाचा ताबा मिळविण्यासाठी मागील दोन दिवसांपासून भक्तांमध्ये वाद सुरू होता. त्यामुळे रुबी रुग्णालयाकडून हे प्रकरण पोलिसांकडे देण्यात आले. दोन्ही गटातील भक्तांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात आपापली बाजू मांडली. मात्र, ही दिवाणी बाब असल्याने पोलिसांनी या प्रकरणामध्ये अधिक हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे बाबांचा अंत्यविधी कुठे होणार व कोणाला त्यांच्या पार्थिवाचा ताबा मिळणार हे रविवारीही स्पष्ट होऊ शकले नाही. आता भक्तांकडून हे प्रकरण दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.
बाबांनी सर्व आयुष्य परमार्थासाठी व्यतीत केले. त्यांनी आजवर ऐंशीहून अधिक मंदिरांची उभारणी केली. भक्तांनी दिलेल्या देणगीतून ते अन्नचळवळ चालवत.