महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील अध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांची टीका पुरुषी मानसिकतेतून झाली असावी, अशी सूचक भूमिका परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी घेतली. अध्यक्षांच्या टीकेमागचा ‘बोलविता धनी’ कोणी वेगळा आहे का?, असे विचारले असता आपल्यावर झालेल्या आरोपांबाबत वस्तुस्थिती मांडत असून ‘बोलविता धनी’ कोण हे तुम्हीच शोधा, अशी टिप्पणी केली. ज्या व्यक्तीवर टीका करायची ती हजर असायला हवी, या व्यवस्थापनाच्या नैसर्गिक न्यायाचे ‘मॅनेजमेंट गुरु’कडून उल्लंघन झाले, असा टोलाही त्यांनी लगावला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या गेल्या बुधवारी (३० सप्टेंबर) झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शेजवलकर यांनी पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर कडाडून टीका केली. त्यांच्या टीकेचा रोख प्रामुख्याने डॉ. माधवी वैद्य यांच्यावर होता. मोतीिबदूची शस्त्रक्रिया झाल्यामुळे या सभेस अनुपस्थित असलेल्या वैद्य सक्रिय झाल्या असून मंगळवारी त्यांनी अध्यक्षांनी केलेले आरोप वस्तुस्थितीला धरून नसल्याचे सांगितले. प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनील महाजन यांच्यासह डॉ. कल्याणी दिवेकर, दीपक करंदीकर, महेंद्र मुंजाळ आणि प्रमोद आडकर या वेळी उपस्थित होते. परिषदेने गेल्या साडेचार वर्षांत केलेल्या उल्लेखनीय कामाची त्यांनी २१ मुद्दय़ांच्या आधारे मांडणी केली. सर्वाना विश्वासात घेऊन घटनेनुसार कामकाज होत असून पदाधिकारी कोणतेही मानधन न घेता एकदिलाने काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. या सभेमध्ये अध्यक्षांनी केलेल्या निवेदनाची लेखी प्रत मिळावी अशी विनंती केली होती. मात्र, ही प्रत आतापर्यंत देखील मिळालेली नाही. आजीव सभासदांच्या सभेत पदाधिकारी सभेच्या कामकाजाखेरीज बोलू शकत नाहीत, या संकेताचे यंदाही पालन केले गेले. त्यामुळे अध्यक्षांनी केलेल्या टीकेला त्या सभेत उत्तर दिले गेले नाही. मात्र, अध्यक्षांनी केलेल्या आरोपांमुळे संस्थेची आणखी बदनामी होऊ नये या उद्देशातून कोणावरही आरोप न करता केवळ वस्तुस्थिती मांडत असल्याचेही वैद्य यांनी सांगितले. साहित्य महामंडळाचे विषय परिषदेच्या सभेत उपस्थित करीत अध्यक्षांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यामध्ये तथ्य नसल्याचे विजय कोलते यांनी त्या वेळेसच स्पष्ट केले. त्यांच्याकडे आलेली पत्रे त्यांनी संस्थेकडे दिली नाहीत. त्याचप्रमाणे यापूर्वी एकदाही चौकशी का केली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. कार्याध्यक्षांचे अध्यक्षांना प्रश्न परिषदेच्या १०८ वर्षांच्या कार्यकाळामध्ये मी पहिली महिला कार्याध्यक्ष म्हणून काम करीत आहे. महामंडळाचे कामकाज पाहताना परिषदेकडे अजिबात दुर्लक्ष झालेले नाही. आम्ही काहीच काम केले नाही, असा आरोप करणाऱ्यांनी परिषदेसाठी काय केले? कर्तेपणाने काम करताना विश्वस्त निधीमध्ये त्यांनी किती रकमेची भर घातली, असे प्रश्न उपस्थित करून अध्यक्षांनी आपले कर्तव्य तर बजावलेच नाही. उलट सभेमध्ये अविश्वास दाखवून कार्यकारिणीवर घणाघात केला, असेही वैद्य म्हणाल्या. आपण तब्येतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचे प्रा. द. मा. मिरासदार यांनी लेखी पत्राद्वारे कळविले आहे. त्यामुळे अध्यक्षांनी केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.