शेतातून रस्ता जात असल्याने मावळ मधील एका शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन जीवनयात्रा संपवली आहे. ही घटना आज मोरमारेवाडी (जि. पुणे) येथे सकाळी घडली. बजरंग मारुती मोरमारे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरमारेवाडीपासून काही अंतरावर वांडरवाडी असून त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे तेथील नागरिकांनी पाठपुरवठा करून तहसीलदारांकडून रस्ता मंजूर करून घेतला होता. १० फुटाचा रस्ता हा बजरंग मारुती मोरमारे यांच्या शेतातून जात होता. तसेच मोरमारे आणि वांडरवाडीतील नागरिकांमध्ये वादही झाला होता. त्यानंतर दोन दिवसांनंतर त्यांनी विषारी औषध घेतले होते. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. विषारी औषध घेण्याचे कारण मात्र अस्पष्ट असल्याचे कामशेत पोलिसांनी सांगितले आहे. पुढील तपास कामशेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय. एस. पाटील हे करत आहेत.