राज्यातील शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संतप्त सवाल केला आहे. आघाडी सरकारवर ३०२ कलम लावण्याची भाषा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना सुप्रिया म्हणाल्या की, राज्यात सध्याच्या घडीला होणाऱ्या आत्महत्येबद्दल आम्ही कुणावर ३०२ चा गुन्हा दाखल करावे, ते फडणवीसांनी सांगावे. सुप्रिया म्हणाल्या की, आघाडीच्या काळात जेव्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना घडत होत्या. त्यावेळी विरोधी बाकावर असणारे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आघाडी सरकारवर ३०२ चा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत होते. आजच्या घडीलाही राज्यात मोठ्या प्रमाणात आत्महत्याच्या घटना घडत आहेत. मात्र, आता मुख्यमंत्रीपदावर असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचे शतकऱ्यांकडे लक्ष नाही. मग आता कुणावर ३०२ चा गुन्हा दाखल करावा, हे फडणवीसांनीच सांगावे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यातील शेतकरी आत्महत्या करत आहेत, शेतीमालास योग्य भाव मिळत नाही, वाढत्या महागाईवर सरकारचे नियत्रंण नाही. याकडे राज्य आणि केंद्र सरकारचे दुर्लक्ष करत आहे. फडणवीस सत्तेमध्ये आले आणि शेतकऱ्यांना विसरले आहेत, असेही सुप्रिया म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या की, सद्या राज्यातील विविध भागात संघर्ष यात्रा काढली जात आहे. हे चांगल्या पद्धतीने होत असल्यामुळे रिकाम टेकडे लोक संघर्ष यात्रेवर टीका करत आहेत, अशा शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधला. या पुढील काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अजून तीव्र लढा उभारला जाईल.असेही त्यांनी सांगितले.