पिंपरी-चिंचवडमधील देहूरोड परिसरात दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार नुकताच घडला. टोळीत सहभागी होत नसल्याच्या कारणावरुन २ गटांमधे मारामारी झाली. या वादामुळे देहूरोड गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वोफल आणि तामिळ टायगर्स या तामिळी समाजातील दोन टोळ्यांमध्ये देहूरोड भागात वर्चस्वासाठी नेहमीच वाद होताना दिसतो. दिवसाढवळ्या या टोळीतील मंडळी तलवारी, कोयते आणि चाकू घेऊन परिसरात वावरतात. तसेच तरुणांना टोळीत सामावून घेण्यासाठी जीवे मारण्याची धमक्या देखील देतात.त्यामुळे या दोन टोळ्यांमुळे देहूरोड हे गाव गुंडांचा अड्डा बनत चालल्याचे चित्र आहे. रविवारी रात्री याची पुन्हा एकदा प्रचिती आली. अल्बर्ट जोसेफ आणि अविनाश या अल्पवयीन मुलांना वोफल टोळीत सामील होण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यांनी या टोळीत सहभागी होण्यास नकार दिल्याने त्यांना बेदम मारहाणही करण्यात आली. प्रकरण इथेच थांबले नाही, तर वोफल टोळीने काहींच्या घरात घुसून नागरिकांना मारहाण केली. यावळी त्यांनी घरातील पैसे आणि दागिनेही लंपास केले. वारंवार तक्रार दाखल करून देखील पोलिस प्रशासनाकडून या टोळक्यांवर कोणतीही कठोर कारवाई होत नसल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. राजकीय दबावापोटी टोळीतील गुडांना ताब्यात घेऊन सोडले जाते, असा आरोपही येथील नागरिक करतात. मागील सात महिन्यांपासून या टोळ्या देहूरोड गावात धूडघूस घालत आहेत. मात्र, अशा घटनांवर पोलिस प्रशासनाकडून कोणतीही कठोर करवाई होत नाही, त्यामुळं परिसरातील नागरिक दहशतीखाली आहेत. या घटनेनंतर देहूरोड पोलिसांनी संबंधित गुंडांवर कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक मनोहर संकपाळ म्हणाले की, गावात असे वाद नेहमीच होतात. या ठिकाणी परप्रांतीय राहतात, त्यामुळे गुन्हेगारी स्वरूपाचे वातावरण आहे. यापूर्वी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. आम्ही त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करणार आहोत. गावातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रात्री पोलीस गस्त घालत असतात, असेही ते म्हणाले.