अनैतिक संबंधातून एका तरुणाची धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली आहे. पिंपरी येथील कराची चौकात चेहऱ्यावर वार करून या तरुणाची हत्या करण्यात आली. मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली. या हत्येप्रकरणी तीन संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर अरुण थोरात (वय २८) असे मयत तरुणाचे नाव आहे. सागरचे अर्चना जालिंदर निकम या महिलेशी गेल्या काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. अर्चनाचा जालिंदर यांच्याशी विवाह झाला. जालिंदर हा सव्वा वर्षापासून येरवडा तुरुंगात आहे. लग्नानंतर देखील सागरला अर्चनासोबतचे प्रेमसंबंध कायम ठेवायचे होते. या कारणावरुन अर्चनाच्या भावाने यापूर्वी सागरला मारहाण देखील केली होती. त्यानंतरही सागर कित्येक दिवसांपासून अर्चनाला त्रास देत होता. यामुळे अर्चनाने तिचा भाऊ प्रेम रणदिवे आणि त्याचा साथीदार गणेश रोकडे याच्या साथीने सागरचा काटा काढला. प्रेम रणदिवे, गणेश रोकडे, अर्चना हे तिघेजण ज्यावेळी सागरवर वार करत होते त्यावेळी गणेश कांबळे हा दुचाकीवरुन आजूबाजूला लक्ष देण्यासाठी थांबला होता. सागरचा खून केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, गणेशला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिन्ही आरोपी गुन्हेगारीत सराईत असून त्यांच्यावर इतर ही गुन्हे असल्याचे उघड झाले आहे.

दरम्यान, घटनेनंतर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी घटना घडल्यानंतर अवघ्या ५ तासांत त्यांना लोणावळा येथून ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.