जबाबदार कार्यकर्त्यांमुळेच केंद्रात एकहाती सत्ता पक्षातील जुन्यांचा सन्मान राखून नव्यांना संधी दिली पाहिजे, असे मत गोवा-दीव दमणचे भाजपचे प्रभारी रघुनाथ कुलकर्णी यांनी व्यक्त केले. पक्षात जबाबदारीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळेच कमी कालावधीत आपण केंद्रात एकहाती सत्ता मिळवू शकलो, असेही ते म्हणाले. पुणे जिल्हा व पिंपरी शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांसाठी आळंदीत आयोजित शिबिरात ते बोलत होते. लोकलेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, पश्चिम महाराष्ट्राचे संघटनमंत्री रवी अनासपुरे, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे, पिंपरीचे अध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, माजी आमदार दिगंबर भेगडे, रूपलेखा ढोरे, शरद ढमाले आदी उपस्थित होते.कुलकर्णी म्हणाले,की काँग्रेसमुक्त भारत हे ध्येय साध्य करण्यासाठी भाजपचा भौगोलिक व सामाजिक विस्तार करण्याची गरज आहे. सर्व बूथ समित्यांवर सर्व घटकांना सामावून घेतले पाहिजे. त्या-त्या भागातील समाज लोकसंख्येचा विचार करून सर्व जाती-धर्माला प्रतिनिधित्व दिले पाहिजे. आगामी २५ वर्षे भाजपचे सरकार देशावर राहील, हे ध्येय ठेवून प्रत्येक कार्यकर्त्यांने पक्षकार्य केले पाहिजे. बाळा भेगडे यांनी प्रास्ताविक केले. पांडुरंग ठाकूर व धर्मेद्र खांडरे यांनी स्वागत केले. अविनाश बवरे यांनी सूत्रसंचालन केले.