लग्नाला अवघे दोन महिने झालेल्या नवविवाहितेची पतीने गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील कात्रजमध्ये घडली. दीपक जाधव असे आरोपीचे नाव असून या घटनेत मृत झालेल्या पत्नीचे नाव ऋतुजा (वय १८) असे होते. चारित्र्यावर संशय घेऊन दिपकने पत्नीचा गळा दाबून ठार केले. या घटनेचा भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई येथील दिपक आणि पुण्याची ऋतुजा यांचा २३ मे २०१७ ला विवाह झाला होता. विवाहानंतर १५ दिवसानंतर दिपकने पत्नीला त्रास देण्यास सुरुवात केली. तो शुल्लक कारणावरून तिला मारहाण करत होता. हे ज्यावेळी ऋतुजाच्या कुटुंबियांना समजले तेव्हा त्यांनी दिपकला समजावले देखील होते. मात्र तरी देखील त्याचा पत्नीवरील अत्याचार सुरुच होता. नागपंचमीच्या सणाला घरी घेऊन जाण्यासाठी बुधवारी ऋतुजाच्या माहेरच्या मंडळींनी दिपकला फोन केला. पण त्याने त्यांचा फोनच उचलला नाही. त्यानंतर ही मंडळी थेट मुलीच्या सासरी पोहोचली. पण त्यांना घराला कुलूप दिसले. यावेळी दिपक हा हडपसरमध्ये मद्यपान करत बसल्याची माहिती त्यांना मिळाली. त्याचा शोध घेऊन त्यांनी त्याच्याकडे ऋतुजा कोठे आहे? याची विचारपूस केली. यावेळी नशेत असलेल्या दिपकने पत्नीला मारल्याचे सांगितले. दिपकच्या या उत्तराने ऋतुजाच्या माहेरच्या मंडळींची पायाखालची जमीनच सरकली. घाबरलेल्या अवस्थेतून सावरत त्यांनी पुन्हा कात्रजच्या घरी धाव घेतली. त्यानंतर दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी त्यांना आपली मुलगी मृत अवस्थेत आढळली. दिपकने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याची तक्रार ऋतुजाच्या माहेरच्या मंडळींनी दिली असून  खुनी पती फरार आहे. त्याचा पोलिस शोध घेत आहेत.