आज जागतिक अपंग दिन अपंगत्वावर मात करत सुरेखा ढवळे यांचा संघर्ष ‘‘अनेकांना पोलिओमुळे अपंगत्व आलेले असते. माझे तसे नाही. लहान असताना माझ्या मांडीला गाठ आली होती. चौथीपर्यंत मांडी घालणे, इतर मुलांसारखे खेळणे जमत असे. नंतर मात्र ते बंद झाले. इतर मुलांसारखे राष्ट्रगीत आणि प्रार्थनेला उभे राहता येत नाही, खेळता येत नाही याची त्या वेळी फार खंत वाटायची..’’ सुरेखा ढवळे सांगत होत्या.. अपंग संघटनांशी काहीही संपर्क नसताना सुरेखा यांना स्वत:ला अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी रांगेत बराच वेळ ताटकळावे लागले होते. अपंगांच्या नावाखालीही पैशांचा भ्रष्टाचार होतो हेही त्यांना बघायला मिळाले होते. अशा परिस्थितीत आपल्यालाच पुढाकार घेण्याशिवाय पर्याय नाही, हे त्यांना जाणवले आणि त्यांची धडपड सुरू झाली. तेव्हाची ती निराधार अपंग मुलगी आता एका अपंग संघटनेचा पुण्याचा कारभार सांभाळते. सुरेखा दहावीत असताना आईचे निधन झाले. सहा बहिणी आणि एक भाऊ असा त्यांचा परिवार. सोळाव्या वर्षीच त्यांचे लग्न करून देण्यात आले. परंतु लग्नानंतर तीनच वर्षांनी पोटच्या मुलीसह वेगळे राहण्याची वेळ त्यांच्यावर आली. जमीन नाही, हाताला काम नाही आणि अपंगांच्या संघटनांशी काही संपर्कही नाही. त्यामुळे सुरेखा यांनी बांधकामावर काम करायचे ठरवले. त्यांचा डावा पाय उजव्या पायापेक्षा तीन इंचांनी आखूड असल्यामुळे त्यांच्यासाठी हे अवघड ठरणार होते. पण तरी जमेल तसे विटा, वाळू वाहण्यास त्यांनी सुरुवात केली. सुरेखा सांगतात, ‘‘मी खंबीरपणे उभे राहण्याचे ठरवले होते. जेव्हा मला स्वत:ला अपंगत्वाचे 8प्रमाणपत्र घेण्यासाठी थांबून राहावे लागले, तेव्हा ते मला सहन झाले नाही आणि प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम करणाऱ्यांशी माझा थोडा वादही झाला. सुरुवातीला अपंगांसाठीच्या एका कार्यक्रमात काम करताना तिथे पैसे लाटण्याचे प्रकार चालतात हे दिसले. ते मला पटले नाही. पुढे मी आमदार बच्चू कडू यांनी स्थापन केलेल्या ‘प्रहार अपंग क्रांती आंदोलन’ या संघटनेत सहभागी होण्याची निर्णय घेतला. प्रहार संघटनेने आजवर केलेल्या २१ आंदोलनांमध्ये मी उत्साहाने पुढाकार घेतला. पुण्याची जिल्हाध्यक्ष म्हणून मी काम पाहते. गेल्या वर्षी मला राज्य शासनाकडून पुरस्कारही मिळाला आहे.’’ सध्या त्या सकाळी मुलींच्या खासगी वसतिगृहात स्वच्छतेचे काम करतात, तर त्यांचा दुपारनंतरचा वेळ संघटनेच्या कामात जातो. त्यांची मुलगी पदविकेचे शिक्षण घेत आहे. गाडी शिकवणे, मानसिक व आर्थिक पाठबळ देणे यात संघटनेचे राज्य समन्वयक धर्मेद्र सातव यांची मोलाची मदत झाल्याचे सुरेखा आवर्जून नमूद करतात. अपंगांचे प्रश्न काय? अपंगांच्या न्याय्य हक्कांसाठीही त्यांना वारंवार आंदोलने करावी लागत असल्याचे सुरेखा ढवळे यांनी सांगितले. त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न असे * स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या उत्पन्नाच्या ३ टक्के निधी अपंगांसाठी खर्च करणे बंधकारक असूनही त्याची अंमलबजावणी मोजक्याच नगरपालिकांकडून होते. निधीची तरतूद होऊनही तो पडून का राहतो? * राज्यभरातून अपंग व्यक्ती पुण्याच्या अपंग आयुक्त कार्यालयात येतात. तिथे अपंग व्यक्तींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह व पाण्याची सोय का नाही? * कृत्रिम अवयवांचे वाटप शासनातर्फे का केले जात नाही? कृत्रिम अवयव वा अपंग वापरत असलेले ‘कॅलिपर’ तुटले, तर त्यांच्या दुरुस्तीचे केंद्रही पुण्यात नाही. * अनेक गरजू अपंग व्यक्तींची नावे दारिद्रय़रेषेखालील व्यक्तींच्या व अन्न सुरक्षा यादीत समाविष्ट होत नाहीत. असे का? * संजय गांधी निराधार पेन्शन योजनेचा निधी उशिरा जमा होतो. अनेक अपंगांसाठी ते ६०० रुपयेही महत्त्वाचे असतात. सहकारी बँकांवरील र्निबधांमुळे जमा होणाऱ्या निधीसंबंधीही अडचणी आहेत.