पदांचे गाजर दाखवून भाजपकडून फोडाफोडीचे राजकारण निवडणुकीची तयारी कशी सुरू आहे? इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या आहेत. पक्षाचे विभागनिहाय मेळावे सुरू आहेत. पथनाटय़े, व्हिडीओ सादरीकरणासह सोशल मीडियावर प्रचाराचा भर राहणार आहे. प्रत्येक प्रभागाचे वेगवेगळे मेळावे घेण्यात आले असून त्यातून योग्य पध्दतीने चाचपणी करण्यात आली आहे. त्याचा फायदा निवडणुकीत होणार आहे. निवडणूक मुद्दे काय असतील? पिंपरी-चिंचवड शहरात १० वर्षांत झालेली विकासकामे हाच मुख्य मुद्दा राहणार आहे. यापुढील काळातही विकासाची भरीव कामे केली जाणार असून खऱ्या अर्थाने शहर स्मार्ट होणार आहे. प्रदूषणमुक्त नदी, २४ तास पाणीपुरवठा, अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणे यावर भर राहणार आहे. महापालिकेचे राज्य शासनाशी संबंधित अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी पालिकेला मदत केली नाही. केवळ आश्वासने देत राहिले. महापालिकेतील कारभाराबद्दल.. पिंपरी पालिकेतील कारभार भ्रष्ट आहे, हा विरोधकांचा आरोप राजकीय स्वरूपाचा असून त्यात तथ्य नाही. केवळ आरोप न करता भ्रष्टाचाराचे पुरावे दिले पाहिजेत. अन्यथा, त्या आरोपांमधून काहीच निष्पन्न होणार नाही. महापालिकेच्या कोणत्याही कामामध्ये गैरप्रकार नाहीत. ‘ई-टेंडिरग’ पध्दतीने निविदा काढण्यात येतात. त्या प्रक्रियेत कोणाचाही हस्तक्षेप नाही. पालिकेचे पदाधिकारी पारदर्शक पध्दतीने काम करत आहेत. समित्यांमध्ये सर्वच पक्षाचे सदस्य असतात, तेव्हा ते चुकीच्या कामांना विरोध का करत नाहीत? पक्षातील गळतीचे कारण? राजकारणात प्रत्येकाला काहीतरी हवे असते. भाजपकडे हजारो एकर ‘गाजराची शेती’ आहे. गाजर दाखवूनच त्यांनी राज्याची सत्ता मिळवली, तोच ‘फॉम्र्युला’ ते िपपरी-चिंचवडमध्ये राबवत असून फोडाफोडी करत आहेत. काहींना पक्षात येण्यासाठी दमदाटी होत असल्याचेही ऐकिवात आहे. महेश लांडगे, आझम पानसरे यांनी राष्ट्रवादी सोडल्याचा काही प्रमाणात पक्षावर परिणाम होईल. मात्र, ती उणीव आम्ही निश्चितपणे भरून काढणार आहोत. काँग्रेस- राष्ट्रवादीच्या आघाडीविषयी.. काँग्रेसशी आघाडी करण्याविषयी राष्ट्रवादीची चर्चा सुरू आहे. पक्षाचे नेते अजित पवारही सकारात्मक आहेत. पक्षाची ताकद लक्षात घेऊन जागावाटपाची बोलणी व्हायला हवी. सद्य:स्थितीत काँग्रेसचे दोनच नगरसेवक राहिले आहेत, याची नोंद काँग्रेसने घ्यायला हवी. या संदर्भात, पुन्हा बैठक होणार असून त्यात पुढील चर्चा होणार आहे. राष्ट्रवादीकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे. एकाच जागेसाठी अनेक दावेदार आहेत. मात्र, बंडखोरी होणार नाही, याची पुरेपूर खबरदारी घेतली जाईल.