पुण्यातील ‘काका हलवाई फूड्स प्रा. लि.’ची स्थापना १८९२ मध्ये झालेली आहे. गेल्या १२५ वर्षांत मिठाई व्यवसायात या उद्योगाने आपला ठसा उमटवला आहे. काजू कतली, अंजीर बर्फी, साखरी पेढे, काजू गजक, रसमलई, रसगुल्ले आणि महाराष्ट्रीयन चवीचे फरसाण व खारा माल या खाद्यपदार्थासाठी हा उद्योग ख्यातनाम आहे. एवढी वर्षे सलग यशस्वी व्यवसाय करणाऱ्या गाडवे कुटुंबाची सहावी पिढी व्यवसायात कार्यरत आहे. गुणवत्तेमध्ये तडजोड नाही, स्वच्छ आणि ताज्या मालाची विक्री हे सूत्र घेऊन पुण्यासह दुबई, आखाती देशांतही या मिठाईची विक्री होते.

काका हलवाई या व्यवसायाचा प्रारंभ करणारे गाडवे कुटुंबीय मूळचे पुरंदर तालुक्यातील जेऊर गावचे. व्यवसाय सुरु करण्यासाठी पुण्यात आलेल्या मोरप्पाशेठ यांनी सन १८९२ मध्ये या व्यवसायाची स्थापना केली. व्यवसायाला सुरुवात केल्यापासूनच स्वत:च मिठाईचे उत्पादन करुन विक्री करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर कोतवाल चावडी येथे पहिले दुकान सोमनाथशेठ यांनी सुरु केले. सुरुवातीच्या काळात पुण्यातील रसिक मंडळी किलरेस्कर कंपनीचे नाटक पाहून पहाटे घरी जाताना न्याहारीला म्हणून या दुकानातून साखर फुटाणे, खव्याची गोड बर्फी, साखरी पेढे खरेदी करत असत. सोमनाथशेठ यांच्यानंतर त्यांचे बंधू शंकरराव आणि रामचंद्र यांनी सन १९३४ मध्ये मंडई परिसरात जागा विकत घेऊन दुकान सुरु केले आणि व्यवसायाच्या विस्ताराला सुरुवात झाली. त्याच सुमारास काका हलवाई या व्यवसायाने आंबा बर्फी बाजारात आणली. मोरप्पाशेठ यांनी व्यवसायास सुरुवात केल्यानंतर सोमनाथशेठ, शंकरराव, रामचंद्र, लक्ष्मणराव, भरतशेठ, चंद्रकांत, शिवकुमार, महेंद्र, राजेंद्र, रविंद्र, अनिल, अविनाश, सिद्धार्थ, अभिजित, आशुतोष अशा सर्वानी व्यवसायात योगदान दिले असून पुढच्या पिढीतील मंडळीही व्यवसाय उत्तमरीत्या पाहात आहेत. गाडवे कुटुंबातील सर्वाचाच ‘काका हलवाई’ हा ब्रॅण्ड करण्यात हातभार लागला आहे.

foreign women prostitution, prostitution Kharghar,
वेश्याव्यवसायप्रकरणी परदेशी महिलांवर कारवाई
Kaustubh Kalke
बांधकाम व्यवसायिक कौस्तुभ कळके यांच्या अडचणीत वाढ, पूनर्विकास प्रकल्पात फसवणूक केल्याप्रकरणी आणखी दोन गुन्हे
Force Motors out of tractor business news
फोर्स मोटर्स ट्रॅक्टर व्यवसायातून बाहेर
Why is the demand for office spaces increasing in Pune
पुण्यात कार्यालयीन जागांना का वाढतेय मागणी? जाणून घ्या कारणे…

सुरेंद्र गाडवे १९६८ मध्ये या व्यवसायात आले. त्यांनी कुटुंबाचा एकत्रित असलेला व्यवसाय १९७५ पर्यंत केला. त्यानंतर परिवार मोठा असल्याने हाच व्यवसाय स्वतंत्रपणे पुढे नेण्याचा निर्णय घेतला आणि १९७७ मध्ये टिळक रस्त्यावर नवे दुकान सुरु केले. पाच वर्षांतच कर्वे रस्त्यावरील दुकान सुरु झाले. १९८५ मध्ये स्वत:चे उत्पादन असलेली अंजीर बर्फी सुरू झाली. त्यांना अंजीर बर्फीचे जनक म्हणता येईल. कालांतराने फ्लेवर्ड मलई बर्फी, आंबा, गुलकंद, पिस्ता, स्पेशल मलई अशा अनेकविध मिठाईची त्यामध्ये भर पडली. त्या काळी केवळ कराचीमध्ये मिळणारे रसगुल्ले किंवा बंगाली मिठाई उत्पादित करुन त्यांनी ती पुण्यात विक्रीकरिता उपलब्ध केली.

या व्यवसायाबरोबरच १९८६ साली गाडवे कुटुंबाने बांधकाम व्यवसायात पदार्पण केले. मिठाईच्या व्यवसायाप्रमाणेच गुणवत्ता हाच निकष ठेवत एका वेळी एक किंवा दोन प्रकल्पच हाती घेतले. आतापर्यंत त्यांनी सोळा बांधकाम प्रकल्प पूर्ण केले आहेत. १९९१ साली टिळक रस्त्यावरील दुकानाचा विस्तार करण्यात आला.

शालेय वयापासूनच घरातील व्यवसाय पाहून त्याबद्दलचे आकर्षण निर्माण झालेल्या सचिन यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९९४ मध्ये व्यवसाय पाहण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोनच वर्षांत पर्वती येथे एक युनिट सुरु केले आणि १९९९ मध्ये त्याच जागेवर नवी इमारत उभी केली. मिठाई, बर्फी याकरिता लागणारा कच्चा माल (दूध आणि इतर पदार्थ) स्वत: परीक्षण करुन घ्यावेत अशी कल्पना २००६ मध्ये सचिन यांचे सासरे अशोक रेवडकर यांनी दिली. त्यानंतर पर्वती येथेच छोटी लॅब सुरु करुन सचिन यांनी तेथे केमिस्ट रुजू केले. या लॅबमध्ये परीक्षण करताना कच्च्या मालातील अनेक गोष्टी समजत गेल्या आणि माल पुरवठादार देखील चांगला माल देण्याबाबत सतर्क झाले. व्यवसाय वृद्धीसाठी आणि दर्जा टिकवण्यासाठी लॅबची मदत झाली.

सन २००२ मध्ये या व्यवसायाने पौड रस्त्यावर पहिली फ्रॅन्चायजी दिली. त्यानंतर २०१० पर्यंत एकूण बारा फ्रॅन्चायजी कंपनीने दिल्या आहेत. १९९८ नंतर टप्प्याटप्प्याने सचिन यांचे बंधू समीर आणि काका राजेंद्र व रविंद्र यांचे पुत्र अनुक्रमे सिद्धार्थ, अनिमिष आणि अभिजित, आशुतोष हे देखील व्यवसायात त्यांना मदत करत आहेत.

२०१२ मध्ये कंपनीने पुण्याबाहेर विस्तार करण्याचे ठरविले. चिंचवडमध्ये पहिले दुकान सुरु केले आणि तेथील मागणी पाहून एका वर्षांत याच परिसरात शाहू नगर, निगडी, अजमेरा, वाकड अशा चार ठिकाणी दुकाने सुरु झाली. त्यानंतर दोनच वर्षांत चिंचवडमध्ये आणि त्याआधी एक वर्ष धायरी येथील नांदेड सिटी परिसरात कारखाना सुरु करण्यात आला. टप्प्याटप्प्याने हिंजवडी, चाकण, तळेगाव यांबरोबरच बारामतीमध्येही एक दुकान सुरु करण्यात आले.

काजू कतली, अंजीर बर्फी, साखरी पेढे, काजू गजक, रसमलई, रसगुल्ले अशा विशेष मिठाईसाठी हा ब्रँड ओळखला जातो. त्याबरोबरच अन्य ठिकाणी उत्तर भारतीय चवीचा फरसाण मिळत असला तरी काका हलवाईमध्ये मात्र महाराष्ट्रीयन तिखट चवीचा फरसाण उपलब्ध करुन दिला जातो. सध्या टिळक रस्ता, निगडी, कर्वे रस्ता अशी तीन आऊट लेट्ससह फ्रॅन्चायजी दिलेली अशी एकूण वीस दुकाने आहेत. तर, काका हलवाई ग्रुपची म्हणून बत्तीस दुकाने आहेत.

ऑनलाईन विक्रीची मोठी मागणी लक्षात घेऊन काका हलवाईकडून एका ई-कॉमर्स संकेतस्थळाचे काम दिवाळीनंतर हाती घेण्यात येणार आहे. सध्या फ्लेवर्स ऑफ माय सिटी आणि स्विफ्ट इंडी अशा संकेतस्थळांबरोबर कंपनीने भागीदारी केली असून त्या माध्यमातून मालाची ऑनलाइन विक्री केली जाते. गणेशोत्सवात मोदक, दसरा आणि दिवाळीमध्ये लाडू हे भागीदार संकेतस्थळांकडून आणि कुरिअर कंपन्यांमार्फत पोहोचवले जातात.

‘वर्षांनुवर्षे व्यवसाय केल्याने आणि संगणक प्रणालीमुळे विक्री, मागणी यांचा अंदाज येतो. प्रत्येक वर्षी विक्रीत होणाऱ्या चढ-उतारांनुसार बाजारातील परिस्थिती समजून घ्यावी लागते. मिठाई नाशवंत माल असल्याने बाजाराचे लाईव्ह अपडेट्स लागतात आणि त्यानुसार आडाखे बांधावे लागतात, यंदा सणांना कसा ट्रेण्ड असेल याचा अंदाज घ्यावा लागतो. हा अभ्यास आम्ही स्वत: करतो, असे सचिन सांगतात. मिठाईसह सर्व खाद्यपदार्थ बहुतांश यंत्रावरच तयार होत असून स्वयंचलन मोठय़ा प्रमाणावर करत आहोत. प्रत्येक युनिटमध्ये स्वतंत्र लॅब आहे. कच्चा, प्रक्रियेत असलेला आणि तयार झालेल्या मालाची चाचणी वेळोवेळी केली जाते. सध्या दुबई, आखाती देशात मालाची निर्यात होते. आगामी काळात एकच मोठे युनिट करण्याचा मानस आहे. गुणवत्तेशी तडजोड न करणे, स्वच्छता पाळणे, कामगारवर्गाला प्रशिक्षण आणि ग्राहकांना स्वच्छ व ताजा माल देणे हेच यशस्वी व्यवसायाचे गमक आहे, असेही सचिन सांगतात.