आंबेगाव तालुक्यातील डोंगराळ भागातील माळीण गावात बुधवारी सकाळी दरड कोसळल्याने गावाचा मोठा भाग मातीच्या ढिगाऱयाखाली गाडला गेला. आतापर्यंत १७ जणांचे मृतदेह घटनास्थळावरून बाहेर काढण्यात आले आहेत. दोन जखमींना मंचर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाच जण दगावल्याची अधिकृत माहिती दिली आहे.तहसिलदारांनी दिलेल्या माहितीनुसार गावात ६७ घरे होती आणि त्यामध्ये सुमारे १६० लोक राहात होते. यातील बहुतांश लोक मातीच्या ढिगाऱयाखाली सापडले आहेत. घटनास्थळी मातीचा १० ते १५ फूटांचा थर साचल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. गावात मदतकार्य सुरू करण्यात आले असले, तरी पाऊस आणि दुर्गम भाग यामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड घटनास्थळाजवळ असून, परिस्थितीवर ते स्वतः लक्ष ठेवून आहेत.आंबेगाव तालुक्यात भीमाशंकरजवळ डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील दुर्गम भागात माळीण हे गाव वसलेले आहे. गेल्या दोन दिवसांपासून या भागात मुसळधार पाऊस पडतो आहे. त्यातच बुधवारी सकाळी दरड आणि मातीचा मोठा ढिगारा कोसळल्याने गावाचा मोठा भाग ढिगाऱयाखाली गाडला गेला. ही घटना समजल्यानंतर सकाळी नऊच्या सुमारास मदतकार्य सुरू करण्यात आले. पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव, पोलीस अधीक्षक मनोज लोहिया आणि वैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. ढिगारा हटवून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. जखमींना मंचर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर मंचर येथे नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आला असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. मदतकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) दोन तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. एनडीआरएफचे सुमारे ३०० जवान मदतकार्यात गुंतले आहेत. त्याचबरोबर अॅम्ब्युलन्स, जेसीबी यंत्रे आणि इतर सामग्री घटनास्थळी पोहोचली असून, ढिगारा हटविण्याचे काम करण्यात येत आहे. गावातील मंदिर, सभागृह यासह अनेक घरे मातीच्या ढिगाऱयाखाली गेली आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार गावाचा ८० टक्के भाग ढिगाऱयाखाली गाडला गेला आहे. सकाळच्या वेळी अनेकजण घरातच असताना मातीचा ढिगारा कोसळल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.